अ‍ॅपशहर

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युद्ध; पाक मंत्र्याला ज्वर

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांमधील अस्वस्थता कायम असून, दोन्ही देशांमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मोठे युद्ध होईल, असा जावईशोध पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांना लावला आहे. दरम्यान, पाकिस्तानने कराचीकडे येणारे तीन हवाई मार्ग चार दिवसांसाठी बंद केले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 29 Aug 2019, 12:17 pm
वृत्तसंस्था, इस्लामाबाद

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नेत्यांमधील अस्वस्थता कायम असून, दोन्ही देशांमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मोठे युद्ध होईल, असा जावईशोध पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांना लावला आहे. दरम्यान, पाकिस्तानने कराचीकडे येणारे तीन हवाई मार्ग चार दिवसांसाठी बंद केले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीर मुद्द्यावरून भारताला आडकाठी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर, जी-७ परिषदेवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा द्विपक्षीय संबंध असल्याचे मान्य केले होते. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये अस्वस्थता असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आण्विक युद्धाची भाषा वापरली होती. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये रशिद यांनी पुन्हा युद्ध होणार असल्याचे भाकित केले आहे. 'काश्मीरमधील संघर्षाचा निर्णायक क्षण आला असून, दोन्ही देशांमधील हे शेवटचे युद्ध असेल. जीना यांनी भारतातील मुस्लिमविरोधी भावना खूप आधीच ओळखले होते. भारताबरोबर चर्चा होण्याची शक्यता वाटते, ते मूर्ख आहेत,' असे पतंगही रशीद यांनी रावळपिंडी येथे पत्रकारांशी बोलताना उडवले.

कराचीचे तीन हवाई मार्ग बंद

पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतुकीचे तीन मार्ग पाकिस्तानने चार दिवसांसाठी बंद केले आहेत. हे मार्ग २८ ते ३१ ऑगस्ट या काळासाठी बंद असतील, असे पाकिस्तान सरकारने जाहीर केले. भारतासाठी सर्व हवाई मार्ग बंद करणे व अफगाणिस्तानला जाणारा भूमार्गही करण्यावर मंगळवारीच पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला. भारताने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानने भारतासाठी सर्व हवाईमार्ग पाच महिने बंद केले होते.

आमसभेतही काश्मीरचा मुद्दा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये काश्मीरचा मुद्दा उकरून काढणार, हे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर इम्रान खान काश्मीरचा मुद्दा जोरकसपणे मांडतील, असे सुतोवाच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले. भारताने शिमला करार एकतर्फीपणे मोडला असून, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा भंग केल्याचा कांगावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, भारतासाठी हवाईक्षेत्र बंद करण्याविषयी अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज