वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जगभराप्रमाणेच भारतही 'करोना'चा सामना करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'या संकट काळात किंगफिशर एअरलाइन्सवर असलेल्या कर्जाची शंभर टक्के परतफेड करण्यास तयार आहे. त्याचा अर्थ मंत्रालयाने विचार करावा,' असा प्रस्ताव फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे मंगळवारी 'ट्विटर'वरून ठेवला आहे.
बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे. त्याने यापूर्वीही कर्ज फेडण्यास तयार असून, भारतात परतणार नसल्याचे म्हटले आहे. 'किंगफिशर एअरलाइन्सवरील सर्व कर्जाची परतफेड करण्याचा प्रस्ताव मी बँकेपुढे वारंवार ठेवला आहे. परंतु, बँकेकडून पैसे स्वीकारले जात नाहीत आणि सक्तवसुली संचलनालयाकडूनही काही मदत मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या या संकट काळात अर्थमंत्री माझे म्हणणे ऐकतील,' असे मल्ल्या याने 'ट्विटर'वर म्हटले आहे.
तसेच, 'भारत सरकारने देशात लॉकडाऊन केले असून, त्याचा कोणी विचारही केला नव्हता. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. परंतु, लॉकडाऊनमुळे माझ्या सर्व कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. उत्पादन बंद आहे. तरीही आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला घरी पाठविले नाही. कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला दिला जात आहे. या परिस्थितीत सरकारने आम्हाला मदत करावी. तसेच, नागरिकांनी घरीच राहावे. सोशल डिस्टन्स पाळावे. मीही सध्या तेच करीत आहे,' असेही मल्ल्याने म्हटले आहे.