अ‍ॅपशहर

Sri Lanka Violence: श्रीलंकेत हिंसाचार थांबेना; जमावाकडून खासदाराची हत्या, राजपक्षेंचे घर पेटवले

Mahinda Rajapaksa House Burnt In Sri Lanka: भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती बिघडत चालली आहे. काल रात्री सरकारविरोधी जमावाने एका खासदाराची हत्या केली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2022, 11:10 am
कोलंबो: वाढणारी महागाई आणि जनतेने सुरु केलेले आंदोलन यामुळे श्रीलंकेतील परिस्थीती आता नियंत्रणाबाहेर जात आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर देखील देशातील परिस्थिती शांत झाली नाही. आंदलोनकर्त्यांनी हिंसाचार थांबवला नाही. हिंसाचाराच्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झालाय, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये राजपक्षे यांच्या पक्षाच्या एका खासदाराचा समावेश आहे. देशातील परिस्थिती अत्यंत खराब होत चालली असून गृहयुद्धाची शंका व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम श्रीलंकेत हिंसाचार
Sri Lanka Violence


वाचा- दानिश सिद्दीकी यांना दुसऱ्यांदा पुलित्झर; करोना लाटेतील फोटोंनी अश्रू अनावर होतील

श्रीलंकेतील सरकारने परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदीचा कालावधी बुधवारपर्यंत वाढवला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. इतक नाही तर पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयातून आंदोलकांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. महिंदा राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या हजारोच्या जमावाने कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार्यालयाजवळ असलेल्या ट्रकला आग लावली. देशात संचारबंदी लागू असताना देखील राजपक्षे यांचे समर्थक घरांवर आणि अन्य मालमत्तेवर हल्ले करत आहेत.


राजधानी कोलंबोत हिंसक घटना सुरू झाल्यानंतर राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिला होता. महिंदा यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे छोटे बंधू गोटाबाय राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. देशात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरुप तेव्हा आले जेव्हा सरकारच्या बाजूने असलेल्या जमावाने सरकारविरोधी जमावावर हल्ला केला. सरकारने राजीनामा द्यावा यासाठी एका महिन्यापासून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलकांनी ताबा घेतलाय. राजपक्षेच्या समर्थकांनी सोमवारी सकाळी महिंदा यांची भेट घेतली आणि पद न सोडण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर सरकारचे समर्थन करणाऱ्यांनी विरोध करणाऱ्यांवर हल्ला चढवला.

आंदोलन का आणि कधी सुरू झाले...

श्रीलंकनं अर्थव्यवस्था (Shri Lanka Economic Crisis) डबघाईला आल्यानंतर देशभरात राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होतं. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात येण्यास राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आणि आंदोलकांनी केला होता. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात आणीबाणी लागू केली होती.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवंलूबन आहे. करोना विषाणू संसर्गाच्या काळात पर्यटन बंद असल्यानं अर्थव्यवस्था संकटात आली होती. श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कर्ज देण्यासाठी ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. मात्र, सध्या श्रीलंकेकडे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं परकीय चलन आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, संरक्षण मंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद राजपक्षे कुटुंबाकडे असल्यानं आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी कॅबिनेट बैठक घेऊन शुक्रवारपासून आणीबाणी लागू केली होती. श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. चीननं श्रीलंकेला मदतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नव्हतं.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख