वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आपण पुढची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. मात्र आपण राजकारणातून सन्यास घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उमा भारती या केंद्रीय मंत्रिमंडळात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. निवडणूक लढवण्याऐवजी पुढील दीड वर्षात अयोध्येत राममंदिराची उभारणी आणि गंगा नदीच्या सफाईच्या मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीय करणार असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. सत्ता सोडून आपण गंगा नदी आणि प्रभू श्रीराम यांच्यासाठी अडीच हजार किमीची यात्रा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनीही आरोग्याच्या कारणामुळे पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. त्या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.