अ‍ॅपशहर

अमेरिकेत जाऊन राहुल गांधींची मोदींवर टीका

'भारतात हिंसाचर, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या घाणेरड्या राजकारणानं डोकं वर काढलं आहे. हे राजकारण खूपच धोकादायक आहे. देशानं गेल्या ७० वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीला यामुळं खीळ बसू शकते,' अशी जोरदार टीका काँग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

Maharashtra Times 12 Sep 2017, 9:40 am
मटा ऑनलाइन वृत्त । कॅलिफोर्निया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what rahul said on bjp machine his stupidity
अमेरिकेत जाऊन राहुल गांधींची मोदींवर टीका


'भारतात हिंसाचर, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या घाणेरड्या राजकारणानं डोकं वर काढलं आहे. हे राजकारण खूपच धोकादायक आहे. देशानं गेल्या ७० वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीला यामुळं खीळ बसू शकते,' अशी जोरदार टीका काँग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. भारतातील मोदी राजवटीवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. 'माणुसकीचा आधार असलेल्या अहिंसेच्या तत्वाला भारतात धोका निर्माण झाला आहे. द्वेष, क्रोध आणि हिंसाचार वाढला आहे. पत्रकारांचे खून पडत आहेत. दलितांना मारहाण होत आहे. मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना केवळ संशयावरून लक्ष्य केलं जात आहे. नव्या भारतात हे सगळं घडत आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.

नोटांबदीच्या निर्णयावरही त्यांनी प्रहार केला. 'नोटाबंदीचा निर्णय घेताना मुख्य आर्थिक सल्लागार किंवा संसदेचा साधा सल्लाही घेण्यात आला नव्हता. या निर्णयामुळं देशाचा जीडीपी २ टक्क्यांनी घसरला आहे. रोजगार निर्माण होणं थांबलं आहे. आर्थिक विकास जवळजवळ ठप्प झाला आहे. चुकीच्या आर्थिक निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. संपूर्ण अर्थव्यवस्थाच दिशाहीन झाली आहे,' असा दावाही त्यांनी केला.

भाजप हे मशीन

'भाजप ही एक मशीन आहे. या मशीनशी संबंधित हजारो लोक सतत कम्युटरसमोर बसलेले असतात आणि माझ्याबद्दल अपप्रचार करतात. एका सभ्य माणसाच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं आणि हाच सभ्य माणूस सध्या देश चालवत आहे,' असा आरोपही त्यांनी केला.

मोदींनी पीडीपीला बरबाद केलं!

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आम्ही काश्मीरमधील दहशतवाद मोडून काढण्यात यश मिळवलं होतं. मात्र, तिथं पुन्हा एकदा दहशतवादानं डोकं वर काढलंय. मोदी सरकारची धोरणंच यासाठी जबाबदार असल्याचं ते म्हणाले. 'मुफ्तींचा पीडीपी हा पक्ष काश्मिरी तरुणांना राजकारणात आणण्यासाठी पुढाकार घ्यायचा. मात्र, भाजपशी युती झाल्यापासून मोदींनी हा पक्ष बरबाद करून टाकला,' असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज