नुकत्याच झालेल्या एका संमेलनाला एक साहित्यिक महाशय जरा उशिरानेच आले, गर्दी पांगल्याचं लक्षात येताच आपल्याला उशीरच झालाय असा साक्षात्कार त्यांना झाला अन् लगबगीने गाडी पार्क करण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला. या महाशयांचा तोल ‘उपाशी’ असल्याने गेला की वजनामुळे गेला हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ डोकावले व लगेचच एकाजवळ गेले त्या श्रोत्याने पाहिले की मोठा माणूस जवळ येतोय, आता हा परिसंवादाचं विचारेल, सकाळी कोणकोणते कार्यक्रम झाले ते विचारेल. महाशयांना आणखी जवळ येताना पाहून तो सावरला व ‘कसं काय’ म्हणून वास्तपुस्त केली तर नेहमीच ‘झेंड्यावर’ पंढरपूर गाठणाऱ्या या साहेबांनी त्याच्या एकदमच जवळ जात त्याला खडा सवाल केला ‘...जेवण शिल्लक आहे का अजून?’ अन् आपल्या प्रश्नाने कावराबावरा झालेल्या श्रोत्याकडे नजरही न टाकता, कोणता परिसंवाद सुरू आहे याची दखलही न घेता या साहित्यिक महाशयांनी भोजनकक्षाकडे धाव घेतली.
जेवण शिल्लक आहे का?
शहरात साहित्यिक चर्चा म्हणजे निष्फळ बाब! तेथे काही जण एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यासाठी तर काही जण किती गर्दी झालीय हे पाहण्यासाठी येतात, काहीजण येतात ते वक्त्यांच्या चुका शोधण्यासाठी तर काहीजण येतात ‘मुफ्त का खाना’ खाण्यासाठी. दिवसभर चालणारे परिसंवाद ही साहित्यिक मेजवानी भलेही नसेल पोट दाबून खाणं मात्र होऊन जातंय ना! मग चला चर्चेला असं म्हणून रिकाम्यापोटी येणारे कमी नसतात.
Maharashtra Times 11 Apr 2016, 4:22 am