मेघना कुमरे
हॅलो वाचकांनो. …नमस्ते! काही लेखांमधून मी 'मटा' वाचकांच्या भेटीला आले असले तरी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच भेटतेय. या मालिकेत आपण आयुष्यात यशोशिखर गाठायचे असेल तर योग्य आहाराला मित्र बनविणे किती गरजेचे आहे याची चर्चा करूयात. तसा विचार करणे सुरू करूयात. सध्या माणसाची जीवनशैली कमालीची बदलली आहे. जगण्यातील बदलांसह माणसाने खाण्यातही बदल स्वीकारले आहेत. आणि स्वीकारल्या आहेत खाण्याच्या चुकीच्या सवयी. पोटाची आणि पचनशक्तीची किती परीक्षा पाहतो आपण! ती पाहतोच पाहतो, पण या नादात नवे त्रासही लावून घेतो.
सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. यंदाचे उद्दिष्ट होते, 'हर घर पोषण व्यवहार'. अर्थात घरोघरी पोषण काळजी. सप्टेंबर महिना संपला. ऑक्टोबर सुरू झाला आहे. पोषण हा विषय सततच्या काळजीचा विषय आहे. यंदाच्या पोषण महिन्याचे खास पंचसूत्र होते. एक : पहिले एक हजार दिवस. दोन : अॅनेमियारहित भारत, तीन : पौष्टिक आहाराचे महत्त्व, चार : व्यक्तिगत स्वच्छता आणि पाच : डायरिया नियंत्रण. मुलांची पहिल्या एक हजार दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक वाढ खूप वेगाने होते. मूल गर्भावस्थेत असल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत उत्तम प्रकृती, उत्तम पोषण, चांगले वातावरण आणि चांगल्या काळजीची गरज असते. आई आणि बाळाला जास्तीत जास्त चांगले पोषण उपलब्ध करून द्यायला हवे. त्यांची काळजी घ्यायला हवी. आईला गरोदरपणी कॅल्शियम आणि पूरक लोह जेवणातून तसेच औषधांद्वारे मिळाले पाहिजे. आईने सहा महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान करायला हवे. सहा महिन्यांनंतर मुलांना स्तनपानासोबत वरचे जेवण द्यायला हवे. व्हिटॅमिन-ए नवव्या महिन्यात द्यावे, असे पोषण महिन्यांतर्गत सांगण्यात आले.
गर्भवती आई आणि बाळाला पोषणयुक्त आहार कोणता, असा प्रश्न हमखास पडतो. कडधान्य प्रकारात ज्वारी, तांदूळ, नाचणी, बाजरी, डाळी तसेच हिरव्या पालेभाज्या जसे की मेथी, पालक, चवळी, सरसा, बीट, गाजर, पिवळ्या आणि नारंगी रंगाची फळे-भाज्या, जसे आंबा, पपई आदी. मांसाहार घटकात अंडी, मटण, मासे. दूध, दुधाचे पदार्थ, नट्स, सहज उपलब्ध होणारे कुटकीचे लाडू, आंबटचोखा, करवंद, आवळा, बोर, राजगिरा लाडू बाळाच्या आणि आईच्या आहारात हवे. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याला दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये गाजर, पालक, कोहळे, दुधीभोपळा, दोडके असायला हवे. मांसाहार चालत असेल तर अंडी, मांस, मासे आहारात हवे. सोबतच जेवणात एक चमचा तूप, तेल, लोणी हवे. पदार्थ कमी साखर, कमी मीठ आणि कमी मसाले असलेले हवेत. एकावेळी एकच पदार्थ द्यावा. मग वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांची सवय मुलांना लावावी. एक लक्षात घ्या, मुलांना बिस्कीट, चिप्स, ज्युस, खूप तळलेले तसेच गोड पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट देऊ नका. अॅनेमिया कमी करण्यासाठी लोहयुक्त पदार्थ आहारात हवेत. जसे की डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळ, दूध, दही, पनीर, अंडी, मांस, मासे. यामुळे बाळ सुदृढ होते, त्याचा मेंदू तल्लख होतो. याबरोबरच जेवणामध्ये व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थ हवेत. जसे की, आवळा, लिंबू, पेरू, मिर्ची असे पदार्थ हवेत.
लहान मुलांमध्ये डायरियाचा धोका सतत असतो. यामुळे वजन कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मुले अशक्त होतात. बाळाला डायरिया झाला असेल तर आईने स्तनपान जास्त करावे. बाळ सहा महिन्यांपेक्षा मोठे असेल तर स्तनपानासोबत जेवण द्यावे. ओआरएस द्यावे. अधिकाधिक तरल पदार्थ द्यावेत. झिंक दोन आठवडे द्यावे. डायरियाचा त्रास थांबला असला तरीही.
डायरिया थांबवायचा असेल तर आपल्याला व्यक्तिगत स्वच्छतेवर भर द्यावाच लागेल. पाणी नेहमी उकळूनच प्यायला हवे. जेवताना आपण सहसा हात स्वच्छ धुवत असतो. जेवण तयार करताना धुतो का, हाही विचार करायला हवा; नव्हे कृतीत आणायला हवे. मुलांना भरविताना तसेच स्तनपान करतानाही ही काळजी घ्यायलाच हवी. लहान मुलांचे हातही वेळोवेळी स्वच्छ धुवायला हवेत. स्त्रियांनी पाळीच्या वेळी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. या गोष्टी तशा साध्याच. साध्याच म्हणून दुर्लक्ष होणाऱ्या. तसे होऊ नये. बदलांची सुरुवात स्वत:पासून हवी. खुदको बदलो, जमाना जरूर बदलेगा!!