आज या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टरांनी खास आपल्यासाठी दिलेले मुलमंत्र जाणून घेऊया. हे मूलमंत्र आहेत आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आणि सुरक्षित जीवनासाठी! कोरोना हा जणू आता आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे आणि त्यासोबतच आता अजून काही काळ आपल्याला जगायचे आहे. अशावेळी काय काय खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया फिजिशियन आणि डायबेटोलोजिस्ट डॉक्टरांकडून!
जंक फूडचा नाद सोडा
या काळात सामान्य नागरिकांनी अधिकाधिक पौष्टिक आणि सात्विक आहारावर भर दिला पाहिजे असे डॉक्टर सांगतात. जंक फूड किंवा फास्ट फूड हे चवीला जरी चांगले असतात पण ते शरीरासाठी किती घातक असतात हे आपण सर्व सुद्धा जाणतोच आणि तरी त्यांच्या आहारी जाणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. शिवाय अशा आहारामुळे आपला रोजचा घरचा आहार कमी होत जातो. आपल्या जेवणाच्या वेळा चुकतात, तो आहार नकोसा वाटू लागतो आणि मग हळूहळू कालांतराने शारीरिक समस्या सुरु होतात, ज्या दीर्घकाळ पाठलाग करू शकतात.
(वाचा :- या 120 किलो वजनाच्या मुलीला लागायचे XXL साइजचे कपडे, 'या' ट्रिक्सच्या मदतीने घटवलं 30 Kg वजन!)
व्यायामच आहे आरोग्याचा पाया
जो व्यक्ती व्यायाम करत नाही तो व्यक्ती सुदृढ राहू शकत नाही असे डॉक्टर स्पष्ट सांगतात. त्यांच्या मते अशा व्यक्ती बाहेरून जरी निरोगी वाटत असल्या तरी आतून मात्र त्यांच शरीर तेवढे सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे दिवसातून अर्धा तास का होईना पण व्यायाम करावा. सूर्यनमस्कार किंवा दंड जोर बैठका असे साधेसोपे व्यायाम केले तरी चालतील. पण व्यायाम सोडू नये. व्यायामामुळे शरीर निरोगी राहण्याची हमी मिळते. त्यामुळे चांगला आहार घेण्यासोबतच रोज चांगला व्यायाम करण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे.
(वाचा :- ‘ही’ सात फळं खाल्ल्याने पावसाळ्यात तुम्ही पडणार नाही आजारी, रोगप्रतिकारक शक्तीही होईल दुप्पट)
व्यसनांना दूर लोटा
धुम्रपान आणि मद्यपान जरी करायला कुल वाटत असले तरी ते आरोग्याला किती हानिकारक आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या आहारी जाणे टाळा. शक्य असेल तर कधीच धुम्रपान वा मद्यपान करू नका, कारण त्यामुळे कोणाचेही भले झाले नसल्याचे डॉक्टर सांगतात. एखादी मज्जा म्हणून केलेली गोष्ट सवयी मध्ये परावर्तीत होऊन कित्येक शरीरे उध्वस्त झाल्याचे अनुभव डॉक्टरांना आहेत. त्यामुळे व्यसन करायचे असेल तर चांगल्या सवयींचे करा ज्यामुळे शरीराला अधिकाधीक फायदा होईल आणि तुमचे जीवन अधिक निरोगी राहील.
(वाचा :- Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत 'या' भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?)
मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष
आपल्या आयुष्यात पहिल्यांदा हा लॉकडाऊनचा काळ आला आहे आणि या काळात स्वत:च्या मनाशी व मनस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं हे अजूनही आपल्याला नीट माहित नाही. त्यामुळेच की काय गेल्या 2 वर्षांत डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. अशावेळी आपली मनस्थिती उत्तम कशी राहील हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी योग करणे, स्वत:ला सतत आनंदी ठेवणे यावर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. जेवढे तुम्ही खुश आणि निश्चिंत राहाल तेवढा हा काळ अधिक चांगला जाईल.
डॉक्टरांना सहकार्य करा
आता डॉक्टर असे का म्हणतात तर त्यांना वाटते की जर लोकांनी स्वत:च स्वत:ची अधिकाधिक काळजी घेतली तर कोरोना विषाणूवर आपण मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवू शकतो आणि कोरोना विषाणू सोबत जगून देखील तो आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. सध्या लोक अजूनही निष्काळजीपणे वागत आहेत आणि साहजिक याचा भार आरोग्य व्यवस्थेवर आणि डॉक्टरांवर येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना जर खरंच डॉक्टरांच्या अथक कार्याची जाण असेल तर त्यांनी स्वत:चीच काळजी घ्यावी, जेणेकरून ते सुदृढ राहतील आणि हॉस्पिटल मधील डॉक्टररांच्या कामाचा भार कमी होईल. तसेच डॉक्टर सुद्धा सुरक्षित राहतील.