हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, डॉ. जिल गांधी म्हणतात की, सॅच्युरेटेड फॅटचा जास्त प्रमाणात वापर आणि स्वतःला चांगल्या हेल्दी फॅटपासून दूर ठेवल्याने अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यांच्या मते, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे लोक बॅड कोलेस्टेरॉलने समृध्द खाद्यपदार्थांचे सेवन करतात जे शरीराला पचवण्यास भरपूर त्रास होतो. अशा खाण्यापिण्याच्या सवयींचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल
फास्ट फूड टाळा पण तूपाचं मात्र अवश्य सेवन करा
आजकाल बहुतेक लोक अति कोलेस्टेरॉलचा वापर करत आहेत, जे फास्ट फूडमध्ये पुरेश्या प्रमाणात आढळते. डॉ.गांधींच्या मते फास्ट फूड टाळले पाहिजे. खरं तर, सर्व फास्ट फूड पाम तेलाच्या डेरिव्हेटिव्हजने भरलेले असतात, जे पदार्थ शरीर योग्यरित्या पचवू शकत नाही. शरीराच्या आत असलेले हे कोलेस्टेरॉल प्रत्यक्षात खूप निरोगी, हेल्दी आणि तंदुरुस्त दिसणाऱ्या लोकांमध्ये कार्डियाक अरेस्टची शक्यता वाढवते. पण लक्षात ठेवा तेल खाणं टाळायचं ठेवावं पण तूप खाणं अजिबात सोडू नये.
हेल्दी फॅटचं सेवन करा
डॉक्टरांचे म्हणणे आहे की हेल्दी फॅटचं अजिबात सेवन न करणं देखील कार्डियाक अरेस्टची शक्यता वाढवण्यासाठी जबाबदार आहे. वास्तविक, वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी लोक स्वतःला हेल्दी फॅट पासून दूर ठेवतात. तर प्रत्यक्षात असे केल्याने तुम्ही हृदयाला मात्र अडचणीत आणू शकता.
हृदयाचा कोणताही रोग असल्यास तूप नक्की खा
आयुर्वेद तज्ञ सल्ला देतात की तुम्हाला हृदयरोग असला तरीही तुमच्या आहारात तूप किंवा हेल्दी फॅट असणे अत्यंत चांगले असते. कारण ते धमन्यांना वंगण म्हणजेच चिकटपणा, तेलकटपणा देण्यास मदत करतात आणि त्यांना मऊ आणि ओलसर ठेवतात. हे महत्वाचे आहे, कारण जर तुमचा रक्तदाब वाढला तर तुमचे शरीर दाब शोषण्यास सक्षम असले पाहिजे. त्यामुळे हेल्दी फॅट जसे की साजूक तूप सुद्धा मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे.
या गोष्टीपासून चार हात लांब राहा
आयुर्वेदाचं असं माननं आहे की हृदयाचा आपल्या भावनांशी खोलवर संबंध आहे. डॉ. गांधींच्या मते, पॅरासिम्पेथेटिक सिस्टीम विचारांशी इतकी जवळून जोडलेली आहे की थोडीशी चिंता किंवा नाखुश होणं देखील रक्तदाबात (blood pressure) त्वरित बदल घडवून आणू शकते. त्या पुढे स्पष्ट करतात की आपल्या भावनांचा निरोगी पद्धतीने सामना करणे खूप महत्वाचे आहे कारण तणाव आणि मानसिक आरोग्य हृदयाच्या आरोग्याशी अगदी जवळून जोडलेले आहे. याचाच अर्थ तुम्ही मानसिकदृष्ट्या जितके खुश, समाधानी, खंबीर, निर्भिड असाल तितकं तुमचं हृदय हेल्दी राहिल.
हा बहुआयामी मंत्र जरुर पाळा
तारुण्यात हृदयविकार होण्यामागे पाच प्रमुख कारणे यापूर्वीही समोर आली आहेत. वैद्यकीय भाषेत याला 'फाइव्ह एस' म्हणतात. यात ताण (स्ट्रेस), धुम्रपान (स्मोकिंग), साखर (शुगर), मिठ (सॉल्ट) आणि बैठी जीवनशैली (सिडेंट्री लाइफस्टाइल) हे हृदयाचे पाच शत्रू आहेत. या पाच शत्रूंना दूर ठेवले तर हृदविकाराला दूर ठेवता येते. आरोग्य बहुआयामी मंत्र आहे. कामाच्या घाईगडबडीत हृदयाचाच काय तर शरीराच्या कोणत्याही अवयवाचा विसर पडू नये. चालणे, फिरणे, धावणे, रोजची कामे करणे, ताण कमी करणे, नियमित व्यायामाची सवय लावणे हे निरोगी आरोग्याचे मेरूमणी आहेत. त्यामुळे निष्काळजीपणा न करता आहार, विचार, दिनचर्या, व्यायाम आणि ताणतणावमुक्ती ही पंचसूत्री पाळली तर 'दिलसे' दीर्घायुषी जगता येते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण निरोगी अन्न खाल्ले पाहिजे. आयुर्वेदानुसार तुमच्या प्रकृतीवर म्हणजेच कफ, पित्त, वात, याच्या आधारानुसार तुम्ही हृदयाच्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. डॉ. गांधी वात असलेल्या लोकांसाठी अश्वगंधा आणि अर्जुन यासारख्या औषधी वनस्पती, पित्त प्रकृती असणा-या लोकांसाठी आवळा आणि अननस आणि कफ असलेल्या लोकांसाठी दालचिनी आणि त्रिफळा घेण्याची शिफारस करतात. आयुर्वेदानुसार व्यायाम, योग्य आहार आणि तणावापासून मुक्त राहणं हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावू शकते. तज्ञांनी लोकांना त्यांच्या जीवनशैली मध्ये वर दिलेले हे छोटे छोटे बदल करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून संपूर्ण आरोग्य हृदया सोबतच सुदृढ राहू शकेल.