स्मिता चव्हाण, बी. के. बिर्ला कॉलेज
अंबरनाथ तालुक्यातील पोसरी या गावी कल्याण येथील बी. के. बिर्ला कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिरात नदीवर बंधारा बांधून 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात आली. हा बंधारा बांधल्याने पोसरी गावाला याचा मोठा फायदा होणार आहे. शिबिराला एनएसएसचे ८५ स्वयंसेवक उपस्थित होते. २४ डिसेंबरपासून राबवलेल्या या उपक्रमात सामाजिक बांधिलकीसोबत श्रमप्रतिष्ठेची मूल्ये आत्मसात करण्यात आली तसेच पोसरी गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून गावाची स्वच्छता केली. जि. प. शाळा पोसरी या शाळेला रंग देण्याचे काम करण्यात आले, त्याचबरोबर गावात रक्ततपासणी शिबीर, योजनांची माहिती आणि व्यसनमुक्ती असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून ग्रामस्थांना जागरुक करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच पथनाट्य स्पर्धा घेऊन पथनाट्यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी पोसरी गावात समाजप्रबोधनाचे काम केले तसेच शिबिरात बी. के. बिर्ला कॉलेजचे संचालक नरेश चंद्र, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि उपप्राचार्य वाडेकर यांनी भेट दिली. 'पोसरी गावातील ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही हे समाजकार्य करू शकलो,' असे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश जायभाये यांनी सांगितले. तसेच, पोसरी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांच्याकडून स्वयंसेवकांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नागेश पवार आणि सोनाली पाटील यांनी सात दिवसीय शिबिरात मोलाचे मार्गदर्शन केले. यामुळे बिर्ला कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर यशस्वी पार पडले.