\Bझाले मोकळे आकाश\B
जम्मू-काश्मीर केंद्रशासित करण्याच्या निर्णयाचं मनोरंजनसृष्टीतूनही भरभरुन स्वागत झालं. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर, मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी तरुणांशी 'मुंटा'नं संवाद साधला असता, 'आमच्यासाठी प्रगतीची दारं खुली होत आहेत', असं त्यांनी सांगितलं.
राज्यातच घेऊ शिक्षण
जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय जाहीर झाला आणि मुंबईत राहणाऱ्या काश्मीरी तरुणांनीही आनंद व्यक्त केला. मूळचा जम्मूचा असलेला आणि विल्सन कॉलेजमध्ये शिकणारा जतीन खेर म्हणाला, की 'जम्मू-काश्मीरमधील ३७० हटवण्यात आल्यानं आमच्यासाठी प्रगतीची दारं खुली होतील. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे सरकारच्या अनेक योजना कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना आपलं घर सोडून बाहेर जावं लागायचं. पण, आता अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आमच्या राज्यात येतील. त्यामुळे शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सरकारनं स्थानिकांसाठी मात्र काही आरक्षण ठेवावं.' तर व्हीजेटीआयमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणारी म्रीनल गुप्ता म्हणाली, की 'जम्मू-काश्मीरच्या लोकांना पाकिस्तानात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना भारतात सुरक्षित वाटावं म्हणून १९५४ मध्ये कलम ३७० अस्तित्वात आलं. त्यानंतर मात्र कुणी याबाबत विचार केला नाही. या कलमामुळे जम्मूपेक्षा काश्मीरचं वर्चस्व राहिलं. आता हे कलम मोडीत काढण्यात आल्यामुळे स्थानिक राज्यकर्त्यांना मनमानी करता येणार नाही. जम्मू-काश्मीरमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.
संकलन - प्रथमेश गायकवाड, नमिता भोसले