अ‍ॅपशहर

विथ फुल रिस्पेक्ट भाई...

वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी नसतात असा काही वाहनचालकांचा समज असतो. पण अशा वाहनचालकांचा आदरपूर्वक सत्कार करत आणि गोड शब्दांत त्यांना ‘धडा’ शिकवण्याचा एक अनोखा उपक्रम संघवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकताच राबवला. त्यांच्या या गांधीगिरीविषयी…

Maharashtra Times 24 Mar 2017, 2:59 am
अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanghavi college
विथ फुल रिस्पेक्ट भाई...


वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी नसतात असा काही वाहनचालकांचा समज असतो. पण अशा वाहनचालकांचा आदरपूर्वक सत्कार करत आणि गोड शब्दांत त्यांना ‘धडा’ शिकवण्याचा एक अनोखा उपक्रम संघवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकताच राबवला. त्यांच्या या गांधीगिरीविषयी…

तुम्ही बाइकवर आहात. समोरचा सिग्नल लाल असल्याने तुम्ही थांबलाय. पण मागून येणारा कारचालक मात्र सिग्नल न पाळता वेगाने निघून जातो…गाडी चालवणारा चालक मोबाइल फोनवर बोलत असतो, त्याने सीटबेल्ट लावलेला नसतो. अशी अनेक उदाहरणं तुम्ही-आम्ही आजुबाजूला सतत पाहत असतो. असे नियम न पाळणारे वाहनचालक पाहिले की त्यांचा ‘सत्कार’च करायला पाहिजे असं मनात येतं. हीच गोष्ट विलेपार्लेच्या ‘द्वारकादास संघवी इंजिनीअरिंग कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी केली. त्यांच्या ‘ट्रिनिटी’ या फेस्टिव्हलअंतर्गत त्यांनी ‘वाहन चालक जागृती अभियान’ अभियान नुकतेच राबवलं. या फेस्टिवलचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे. या अंतर्गत सिग्नलवर नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचा फुलं किंवा हार देऊन ‘सत्कार’ केला जात होता.

सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान या तिन्ही गोष्टींचा संगम ट्रिनिटी या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाला. फेस्टचा सामाजिक उपक्रम म्हणून हे ‘वाहन चालक जागृती अभियान’ रविवार, १९ मार्चला जुहू आणि विलेपार्ल्यातल्या अनेक ठिकाणच्या सिग्नल्सवर राबवण्यात आलं. त्याअंतर्गत, नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता. जुहू, विलेपार्ले, कूपर हॉस्पिटलचा सिग्नल, जवळपासच्या शाळा-कॉलेजांजवळील सिग्नल्सवर या उपक्रमासाठी टीम ट्रिनिटीमधले विद्यार्थी उभे होते. सिग्नल लाल असताना वाहन थांबल्यावर अगदी मोजक्या शब्दांत वाहतुकीचे अनेक नियम यादरम्यान वाहनचालकांना समजवून सांगण्यात आले.

कुणी उद्दाम वाहनचालक एखाद्या नियमाचे उल्लंघन करतो आहे असं आढळल्यास त्या व्यक्तीला फुलं किंवा हार देऊन त्याचा सत्कार करण्यात येत होता. उपरोधिक शैलीत वाहतुकीचे नियम समजावून सांगण्याच्या विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचं अनेक वाहनचालकांनीही कौतुक केलं. वाहतूक सुरळीत चालावी यासाठी कार्यरत असणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंडवसुली करणाऱ्या पोलिसांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं.

आजच्या धावपळीच्या जमान्यात अनेक लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. सिग्नल न पाळणं, वेगाने गाडी चालवणं या गोष्टी करत नियमांच उल्लंघन सर्रास होत असतं. त्यामुळे अपघातही होत असतात. म्हणून अशा वाहनचालकांना नियमांची जाणीव करून देण्याचं काम विद्यार्थ्यांनी केलं. यामुळे अपघात कमी होऊ शकतील, असं कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरी वासुदेवन यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज