अ‍ॅपशहर

धागा माणुसकीचा

अनेक कॉलेजांच्या कॅम्पसमध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं राख्याविक्री होतेय. पण, या राख्या आहेत त्या नेहमीपेक्षा जरा वेगळ्या. आदिवासी महिलांनी तयार केलेल्या, दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या किंवा विशेष मुलांनी (स्पेशल चाईल्ड) तयार केलेल्या राख्या बऱ्याच कॉलेजांमध्ये विकल्या जात आहेत.

Maharashtra Times 25 Aug 2018, 9:06 am
प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakhi8


अनेक कॉलेजांच्या कॅम्पसमध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं राख्याविक्री होतेय. पण, या राख्या आहेत त्या नेहमीपेक्षा जरा वेगळ्या. आदिवासी महिलांनी तयार केलेल्या, दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या किंवा विशेष मुलांनी (स्पेशल चाईल्ड) तयार केलेल्या राख्या बऱ्याच कॉलेजांमध्ये विकल्या जात आहेत. या माध्यमातून त्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. हे अनोखे बंध घट्ट करण्याची जबाबदारी घेतलीय ती विविध कॉलेजच्या एनएसएसच्या चमूंनी. एनएनएसच्या या टीम्स संपूर्ण कॉलेज पालथं घालत एकीकडे राख्या विकत घेण्यासाठी समस्त 'ताईं'ना तर लाडक्या बहिणींसाठी चॉकलेट्स, गिफ्ट्स घेण्यासाठी 'भाऊ'वर्गाला आवाहन करताना दिसत आहेत.

रुईया कॉलेजचं एनएसएस युनिट मालाडच्या 'के अँड के व्होकेशनल रिहॅबिलिएशन सेंटर'मधल्या मनोरुग्ण आणि शारीरिक व्यंग असलेल्या मुलांनी बनवलेल्या राख्या अगदी वाजवी दरात रूईयाट्सना विकत आहेत. या राख्यांसोबतच बहिणींना आवडू शकतील असे इअररिंग्स, किचेन्स, चॉकलेट्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व वस्तूंची विक्री धडाक्यानं झाली असून, त्या सध्या 'आऊट ऑफ स्टॉक' आहेत. या सर्वातून होणारी कमाई या दोस्तांसाठी खर्च करण्यासाठी ती त्या संस्थेकडे सुपूर्द केली जाणार आहे. डहाणूकर कॉलेजचे विद्यार्थी रोटरॅक्ट क्लबच्या मदतीनं 'बंधन' उपक्रम राबवत आहेत. विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांची विक्री हे विद्यार्थी करत असून, यातून जमा होणारी सर्व रक्कम या स्पेशल चाईल्ड विद्यार्थ्यांच्या पालनपोषणासाठी वापरली जाईल.

वसई-विरार भागातल्या काही आदिवासी महिलांनी एक पाऊल पुढे टाकत धाग्याच्या साथीनं थेट केरळवासीयांना मदत करण्याचं ठरवलं असून, त्याला साथ दिलीय ती विरारच्या विवा कॉलेजने. या आदिवासी महिलांनी स्वतःच्या हाताने बांबूपासून बनवलेल्या राख्या, तसंच सफाळे येथील 'वंदे मातरम' या मतिमंद मुलांच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या राख्या एनएसएस ग्रुप विकतोय. यातून जमा होणारा पैसा केरळसाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. मुंबईतल्या अनेक कॉलेजांनी हा मदतीचा विडा उचलला असून अनेकांनी हा माणुसकीचा धागा जपला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज