अ‍ॅपशहर

लग्नकल्लोळ

सध्याच्या मुलींच्या मनात लग्नाच्या निर्णयावरून प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. करिअरविषयी उच्च ध्येय असणं हे त्यामागील बऱ्याच कारणांपैकी एक आहे.

Maharashtra Times 18 Mar 2017, 2:30 pm
Karuna.Gosavi @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girls canfusion about wedding or career
लग्नकल्लोळ


Tweet : @karunpuriMT

सध्याच्या मुलींच्या मनात लग्नाच्या निर्णयावरून प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. करिअरविषयी उच्च ध्येय असणं हे त्यामागील बऱ्याच कारणांपैकी एक आहे.

सध्या २५ ते ३० वयोगटातील मुलामुलींच्या मनात संभ्रम निर्माण करणारा प्रश्न कोणता असेल, तर लग्न. नोकरी-व्यवसायामध्ये विशिष्ट उंची गाठत असताना ‘लग्न’ हा टप्पा करिअरमध्ये ब्रेक ठरण्याची आणि त्या अनुषंगानं आपल्या स्वातंत्र्य, स्पेसवर मर्यादा येण्याची भीती त्यांच्या मनात निर्माण होत असल्याचं आत्ताचं चित्र आहे. याबाबत विवाहयोग्य टप्प्यात असणाऱ्या तरुण वर्गाचं विवाहपूर्व समुपदेशकांकडे जाण्याचं प्रमाण वाढत असून, यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे.

‘सध्या मुलींमध्ये लग्न केव्हा करावं, का करावं आणि करावं, की करू नये याबाबत खूप गोंधळ आहे. साधारणतः उच्च मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण जास्त आहे; कारण या गटातील मुलींमध्ये शैक्षणिक ध्येय पक्की असल्यानं ती गाठण्यासाठी लग्नामुळे येणारी तडजोड करायला त्या तयार नसल्याचं सध्याचं वास्तव आहे. आजूबाजूला घडणाऱ्या अयशस्वी लग्नाच्या उदाहरणांमुळे त्या आणखी धास्तावतात. असंच आपल्या बाबतीत घडलं तर, या विचारानं त्या लग्नाचा निर्णय घेत नाहीत,’ असं मॅरेज कौन्सेलर स्मिता जोशी सांगतात. जोशी यांच्या मते, २५ ते ३० हाच वयोगट लग्नासाठी योग्य आहे. लग्न हे तडजोडीतून फुलणारं नातं असल्यानं तिशीनंतर बदल स्वीकारण्याची तयारी दाखवली जात नाही आणि परिस्थिती आणखी बिकट बनते.

‘लग्नाचा निर्णय हा विचार करून घेण्याचा असला, तरी त्यामागे अतिविचार करता कामा नये. मात्र, हाच अतिविचार लग्नाबाबत गोंधळ निर्माण करतोय,’ असं कौन्सेलर आणि इमेज कन्सलटंट डॉ. जयश्री फडणवीस यांचं मत आहे. त्या पुढं सांगतात, ‘आज मुली मुलांच्या बरोबरीनं आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत आहेत. लग्न केल्यानंतर या स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती त्यांना असते. मात्र, सगळ्यांच्याच बाबतीत सारखे अनुभव नसतात. ते व्यक्तीगणिक वेगळे असू शकतात याची त्यांना कल्पना येत नाही आणि लग्न नाकारलं जातं. त्यात एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास झाल्यामुळे नातेसंबंधाबाबत ते संस्कार व्हायचे ते होत नाहीत.’

लग्नाचं योग्य वय कोणतं?

२५ ते ३० या वयादरम्यान लग्न केल्यानंतर नात्याची वीण घट्ट होणं, करिअर, मातृत्त्व, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण, आपली निवृत्ती, तोपर्यंत मुलांचं आर्थिकदृष्ट्या स्थायिक होणं आणि निव़ृत्तीनंतरचं आपलं आयुष्य या गोष्टी उत्तम पद्धतीनं मार्गी लागतात. लग्न उशीरा झाल्यास पुढचं सगळं गणित बिघडतं. ज्या-त्या वयात योग्य गोष्टी झाल्यास त्या व्यक्तीगत पातळीवर फायद्याच्या ठरतात, असंही समुपदेशक आवर्जून नमूद करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज