दीपिका पल्लिकलने एशियाड स्पर्धेत मिळवलेल्या पदकानंतर तिची ओळख दिनेश कार्तिकची पत्नी अशी करून देणे, हे विशिष्ट मानसिकतेचे उदाहरण आहे. स्त्रीने कितीही कर्तृत्व सिद्ध केले, तरी ती कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी किंवा ती कोणाची तरी आई आहे, याच ओळखीतून पाहिले जाते. स्वतंत्र ओळख असलेली स्त्री म्हणून तिचा स्वीकार करण्याची मानसिकता का नसावी, या प्रश्नाचे उत्तर अनेक गोष्टींमध्ये दडलेले आहे.
अपर्णा पाटील
सव्वाशे वर्षांपूर्वी हेन्रिक इस्बेनने 'अ डॉल्स हाउस' ही कादंबरी लिहिली. त्यात हेल्मर नोराला म्हणतो, 'इतर कोणत्याही गोष्टींच्या आधी तू कोणाची तरी पत्नी आहेस, कोणाची तरी आई आहेस...'
नोरा त्याला उत्तर देते, 'इतर कोणत्याही गोष्टींच्या आधी स्वत:ची काही ओळख आहे, त्यावर विश्वास ठेवणे मी सोडून दिले आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत तू फक्त एक व्यक्ती आहे आणि तशीच माझीही ओळख व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.'
सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या कादंबरीत हेल्मर जे म्हणतो, ती मानसिकता आजही कायम आहे. दुर्दैवाने नोराने जे प्रयत्न करणार आहे, असे म्हटले होते तो संघर्ष कायम आहे. अशा मानसिकतेची शेकडो उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. जाहीरपणे, खासगीत अनुभवायला मिळतात.
आधुनिक क्रांतीनंतर स्वत:च्या हक्कांविषयी जागरूक झालेल्या स्त्रीला शिक्षण घेण्यापासून ते मतदानाचा हक्क मिळवण्यापर्यंत प्रत्येक अधिकारासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. अजूनही ही हक्कांची लढाई सुरूच आहे; परंतु स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता देण्याची मानसिकता आजही नाही. त्यामुळेच स्त्रीने मिळवलेल्या यशाची तुलना पुरुषांच्या यशाची केली जाते.
तिचे यश मोजण्याचे परिमाण पुरुषांची कामगिरी हेच आहे. आपणही कळत नकळत तसे बोलून जातो. पुरुषांची बरोबरी केली, पुरुषांच्या क्षेत्रात ठसा उमटवला, अशी विशेषणे महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करताना लावली जातात. म्हणजे जे जे क्षेत्र पुरुषांनी आधी सिद्ध केले, ते ते महिला काबीज करत आहेत, असा त्याचा ढोबळ अर्थ असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात पुरुषांची अशी वेगळी क्षेत्र आहेत का आणि असली तरी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने कधी संधी दिली होती का, याचा विचार केला जात नाही. मग जेथे स्त्रियांना आपले योगदान देण्याची संधीच मिळालेली नाही, तेथे पुरुषांशी बरोबरी असणे योग्य आहे का?
सगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांशी बरोबरी केली, असे आपण सहज म्हणतो, तेव्हा कोठेतरी पुरुष हा स्त्रियांपेक्षा अधिक कर्तृत्ववान आहे, अशी मानसिकता आपल्यात नकळत भिनवली जाते. 'माझी मुलगी मुलापेक्षा कमी आहे का,' असे गेल्या काही वर्षांत अभिमानाने म्हटले जाते; पण ते म्हणत असताना मुळात मुलगा मुलीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे आधीच मानले गेले आहे, हे लक्षातही घेतले जात नाही.
जेव्हा एखादीचा स्त्री असा उल्लेख करतो, त्यावेळी ती कोणाची मुलगी आहे, असा विचार पहिल्यांदा केला जातो. त्यानंतर तिला बहीण, आई अशा वेगवेगळ्या नात्यांमध्ये गोवले जाते. त्यावेळी त्या नात्यातून स्त्रीने अपेक्षित असलेली सामाजिक, नैतिक सगळी बंधने पाळावीत, अशी रूढ अपेक्षा आजही बदललेली नाही. एखादीने स्वतंत्रपणे आपली ओळख निर्माण केल्यास ती कायमच कोणाची तरी मुलगी, बायको किंवा आई आहे, असाच तिचा उल्लेख होतो. अशाच मानसिकतेतून स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लिकलचा उल्लेख ती क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी आहे, असा केला जातो. यात कोणाला वावगे वाटत नसेल, तर अनुष्का शर्माचा नवरा विराट कोहली, असा उल्लेख त्याच्या शतकी कामगिरीनंतर का बरे केला नाही?
दीपिका पल्लिकलने मिळविलेले पदक हे तिचे स्वतःचे यश होते. त्या यशाचे भागीदार म्हणून तिने पतीसह सासरची मंडळी, आई-वडिलांसह सगळ्यांचेच आभार मानले. म्हणून ती एका क्रिकेटरची बायको असल्याचा उल्लेख करणे, हे तिच्या त्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचाच प्रकार आहे. हा केवळ तिच्या कर्तृत्त्वालाच कमअस्सल मानण्याचा प्रकार नाही, तर एकूणच स्त्री म्हणून तिची ओळख कशी असली पाहिजे, असा आग्रह धरण्याची ही रीत आहे.
स्त्रीने कसे असले पाहिजे, याचे धडे घालून देण्याचे काम बालपणापासून केले जाते. ते कामही स्त्रीवरच सोपविले जाते. आई, आजीच्या संस्कारांतून 'बाईच्या जाती'ने काय काय करावे, असे सांगितले जाते. वेळप्रसंगी त्याची आठवण करून दिली जाते. कधी ते ठामपणे करायला भागही पाडले जाते. मग तिने स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रश्न येतच नाही. ती ओळख पुढे कुंकू, मंगळसूत्रातही बांधून ठेवली जाते. आडनाव बदलणे, वारस म्हणून नाव लावणे, संपत्तीत हिस्सा मिळणे या वरवर समाजमान्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये दडलेली सुप्त कनिष्ठतेची मानसिकता, ही स्त्री म्हणून तिच्या जगण्याच्या मुळावर येते.
मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरत होता. दहावी-बारावीत नव्वद ते ९९ टक्के मार्क्स मिळवून गुणवंतांच्या यादीत चमकलेल्या मुली नेमक्या जातात तरी कोठे, असा त्याचा विषय होता. बहुतांश मुली करिअर घडवूच शकत नाही, असा काहीसा सूर त्यातून व्यक्त झाला होता. ती काळजीची बाब म्हणायची की शरमेची, या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही; कारण स्थिती अशी आहे, की आधुनिक म्हणाव्या अशा शहरांतही महिलांच्या साध्या नोकरीतील अडचणींचा डोंगर महाप्रचंड आहे. विशिष्ट क्षेत्रात ठरवून उतरून स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रीच्या वाट्याला किती भयानक संघर्ष येत असेल? अशा सगळ्या प्रतिकूल स्थितीत एखादीने मिळालेले यश हे तिच्या वडिलांना, नवऱ्याला किंवा मुलांना देणे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा.
अर्थात, या सगळ्या मानसिकतेची कारणे ही जन्म, देश, धर्म, लिंग अशा सगळ्यांत सापडतीलच. वडिलांचे नाव लावणे, नवऱ्यासाठी कुंकू लावणे, नवरा गेल्यावर ते पुसणे आणि म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे पाहणे, या सगळ्याच गोष्टींमागची मानसिकता तिच्या यशस्वी कारकिर्दीकडे, धाडसाकडे किंवा कणखराकडे दुर्लक्ष करणारी ठरते. त्यामुळे तिचे यश हे नेहमी तिचे ठरत नाही. अगदी शिक्षित, सुसंस्कृत पुरुष अशा मानसिकतेचे गंड बाळगून असतात, की शिक्षित स्त्रिया निर्णय घेऊ शकत नाही. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही तमाम पुरुषांची आहे. ते कधी त्यांचे राखी बांधून घेणारे भाऊ असतात, नाही तर तुला काय कळते त्यातले, असे म्हणणारे पती असतात. त्यामुळे तिची स्वतंत्र ओळख निर्माण कायमच कठीण होते. बंधने, समजुती, संस्कारांचे ओझे यांतून स्वत:च व्यक्तिमत्त्व उभे करणे, हा मोठा टप्पा गाठणे अजूनही शक्य झालेले नाही. अशा भिंती भेदून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रिया कमी नाहीत, त्यांच्यामागे उभे राहणारे पुरुषही आज आहेत. प्रश्न आहे, तो केवळ मानसिकता बदलण्याचा.
aparna.patil@timesgroup.com