न्हाऊन आलेली ही सुंदरी आपले केस वाळवते आहे. एकतर हा प्रसंगच देखणा; त्यामुळे त्याकडे दृष्टी वळली नाही तरच नवल. सौंदर्याचे हे लेणे आपल्याला नक्की काय सुचवत असेल? आणि तिच्या पायाशी असलेल्या पक्ष्याचे काय म्हणणे असेल?
अभिजित थिटे
न्हाऊन आलेली स्त्री, तिचे ते केस झटकणे, त्याचे तुषार उडणे, हे एखाद्या चित्रपटातील रोमँटिक दृश्य. स्वत:शीच गुणगुणत केस झटकणारी सुंदरी हे दृश्य नवीन नाही आणि कधीही जुने होत नाही. अशीच एक ललना मंदिराच्या बाह्य भिंतीवरही दिसते. तिचे नाव कर्पूरमंजरी. ओले केस वाळविणारी सुंदरी, हा विषयच मनोरम असल्यामुळे तिच्या विविध ठिकाणी असलेल्या मूर्तीही शिल्पींनी तितक्याच रसिकतेने साकारलेल्या दिसतात.
गंमत म्हणजे शिल्पींची कल्पनाशक्ती याबाबती दोन पावले पुढे जाते. येथे तिच्या पायाशी एक पक्षी दिसतो. हा पक्षी तिच्या केशसंभारातून उडणारे तुषार आपल्या चोचीत झेलण्याचा प्रयत्न करत असतो. हा चातक आहे. चातक नावाचा पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो. येथे शिल्पकारांनी हे रूपक वापरले आहे. त्या सुंदरीचा केशसंभार एवढा विपुल आणि घनदाट आहे, की त्या पक्ष्याला ते पावसाचे ढगच वाटतात. काही ठिकाणी चातकाऐवजी हंस पक्षी दिसतो. हे दोन्ही पक्षी आणि ही सुंदरी हा साधकांसाठीचा एक संकेत आहे.
न्हाऊन आल्यानंतर केस झटकणे, हे मुळात सुंदर. त्यात ही सौंदर्यवती, मग साधकांना यातून कसला संकेत असणार? हे शिल्प अधिभौतिकाकडे निघालेल्या व्यक्तीला भौतिकात ओढून आणणारे.
चातक हा कल्पनेतील पक्षी. त्याचे रूपक विविध लिखित माध्यमांतही वापरलेले दिसते. ज्ञानेश्वरीमध्येही हा चातक भेटतो. ज्ञानेश्वर म्हणतात, 'चातकाची तृष्णा । भागावी म्हणोन । पाण्यातें धरोन । ठेवी नभ ॥२३१८॥' कर्पूरमंजरीचे रूपक यातून अधिक स्पष्ट होते. या चातकाला ज्ञानाची तहान लागलेली आहे. त्यामुळेच तो इतर कशाकडेही न पाहता तहानेला राहतो. ज्या क्षणी ज्ञानाचा वर्षाव होतो, त्या क्षणी त्याची तहान भागते. तो तृप्त होतो. तशाच प्रकारे गुरूही अशा शिष्याची वाट पाहत असतात. आपल्याकडे असलेला ज्ञानाचा घडा त्यांना अशाच शिष्यावर रिता करायचा असतो. या शिल्पामध्ये कधीकधी चातकाऐवजी हंस पक्षी दिसतो. हा पक्षी नीरक्षिरविवेकासाठी ओळखला जातो. म्हणजे तो दूध आणि पाणी वेगळे करू शकतो, असे म्हणतात.
हे शिल्प दोन संकेत देते. पहिला संकेत वर सांगितल्याप्रमाणे ज्ञान वेचण्याचा आहे. भेसळीतून अस्सल ते शोधून काढण्याचा आहे. दुसरा संकेत खरे काय ते ओळखा, असे सांगणारा आहे. त्या रमणीच्या केशसंभाराला भरून आलेले आभाळ समजण्याची चूक करू नका. फसव्या, मायावी गोष्टी ओळखा. त्या ओळखता आल्या नाहीत, तर सत्याच्या मार्गावरून होत असलेला प्रवास थांबतो. तो भौतिकातच रुंजी घालू लागतो. सत्याची वाट खडतर असली, तरी अंतिमत: तीच योग्य असते. ती कदाचित आपल्याला हवी तशी नसेल, आपल्या दृष्टिकोनातून सुंदर नसेल; कदाचित सुरुवातीला खडतर असेल, आल्हाददायक नसेलही; परंतु त्यावरून निष्ठेने चालणे महत्त्वाचे. कितीही तहान लागली, तरी योग्य तेच घ्यावे. वाट कितीही बदलावीशी वाटली, तरी आपण चालत राहावे. त्यातूनच सत्यापर्यंत पोहोचता येते. साधकाच्या जीवनाचे उद्दिष्ट्य तेच आहे. गर्भगृहात असलेल्या सगुणातील निर्गुणापर्यंत त्याला पोहोचायचे असते. तेथे पोहोचताना येऊ शकणाऱ्या अडथळ्यांकडे हा दिशानिर्देश आहे.
छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाला वेढून राहणारे संकेत देण्याचे हे कसब निश्चितच कौतुकाचे आहे. तत्कालीन शिल्पकार, योजक, संकल्पक या साऱ्यांना दाद द्यायला हवी. मंदिरांकडे फक्त धार्मिक स्थळ म्हणून न पाहता, तेथे येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण आस्तिक असो वा नास्तिक, मंदिरामध्ये भक्तिभावाने जाणारे असू किंवा आपली दृष्टी फक्त अभ्यासकाची असेल किंवा अगदी सहज म्हणून, पर्यटनस्थळी फिरण्यासाठी गेलेले असलो, तरी तेथील शिल्प पाहून निश्चितच थोडा विचार करू लागतो. त्याशिवाय थोडे त्या शिल्पांच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न केला, की ती आपल्याशी बोलू लागतात. मग ती केसाचा पिळा करणारी किंवा केस झटकणारी कर्पूरमंजरीदेखील थोडीशी थांबते. पायाशी असलेल्या किंवा नसलेल्या चातकाकडे अंगुलीनिर्देष करते. 'अरे बाबा, माझ्याकडेच पाहू नकोस. तुला येथे नाही गुंतायचे, पुढे जायचे आहे,' असे सांगते आणि आपण आपल्या ठरलेल्या मार्गाने चालू लागतो, नवे काहीतरी घेऊन. शेवटी ठरलेल्या मार्गाने चालणे आणि मोहाचे क्षण टाळणे महत्त्वाचे. मग आध्यात्म असो, की आपले निहित कर्म.