कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तत्काळ शोधायचे, असा अट्टाहास का? काही प्रश्न जटील असतात; त्यामुळे थोडा वेळ घेऊन, प्रश्नाचा, प्रसंगाचा पोत लक्षात घेऊन, समस्या सोडवता येऊ शकते. शिक्षणाने आपण सहनशील, क्षमाशील होतो. स्थिर होतो. फक्त विचारांची बैठक पक्की हवी, ठेहराव हवा. ट्रॅफिक सिग्नलमध्ये पिवळा दिवा असतो. वेग कमी करा, थोडे थांबा, असे सांगणारा तो सिग्नल आणि ठेहराव यामध्ये नक्कीच साम्य आहे.
सुधीर देशपांडे
ठेहराव. फारच अर्थपूर्ण आणि सुंदर शब्द आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये या संकल्पनेला खूपच महत्त्व आहे. कितीतरी वेळा रसिक एकमेकांशी बोलताना आपण ऐकतो, 'अरे, हिच्या गाण्याला काय सुंदर 'ठेहराव' आहे, नाही का?' किंवा काही गायक आपल्या शिष्यांना सांगतात, 'बघ, इथे ठेहराव आहे आणि मग लयबद्ध तान घ्यायची.' संगीतातील हा थांबा तात्पुरता जरी गाण्यात असला, तरी पुढच्या तानेसाठी तो स्थिरता निर्माण करतो. गझलेमध्ये, नाट्यसंगीतात, काही भावगीतांतही या ठेहरावाच्या जागा स्थिरत्व, समतोल आणतात. हा ठेहराव सुचण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे परवाचा प्रसंग.
त्याचे असे झाले, की मी कुणाची तरी वाट पाहत रस्त्यावर उभा होतो. मला ती व्यक्ती तेथे येऊन भेटणार होती आणि आम्ही पुढे जाणार होतो. तेवढ्यात समोरील मॉलमध्ये मला माझी मैत्रीण दिसली. तिचे लग्न झाल्यानंतर प्रथमच दिसली होती. आमची नजरानजर झाली. तिनेही मला हात केला. खूप दिवसांनी दोघे भेटलो होतो. मी तिला कॉफीबद्दल विचारले. शेजारीच एक नवीन कॅफे उघडले होते. तेथे थोडा वेळ बसण्याचे ठरले. मला घ्यायला येणाऱ्या व्यक्तीला मी फोन करून कळवून टाकले. दोन कॉफी ऑर्डर करून आम्ही गप्पा मारू लागलो. एकमेकांची विचारपूस केली. त्यानंतर मी जे काही ऐकले, ते ऐकून सुन्न झालो. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. मी समजावण्याचा थोडा प्रयत्न केला. त्याच मनःस्थितीत एकमेकांना निरोप दिला आणि मी घरी आलो.
ती आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघे माझे चांगले मित्र होते. घटस्फोटामागची कारणे काय, तर तिचे सासू -सासऱ्यांशी न पटणे, एकाच जागी राहणे आणि छोटे छोटे भांडणाचे किस्से. तो माझा मित्रही मातृ-पितृ भक्त असल्याने, त्या दोघांनी ठरवून टाकले, अजून मूल झालेले नाही, तर 'ठहर जाओ.' मी त्या दोघांच्या घरच्यांनाही ओळखत होतो. एवढे टोकाचे पाऊल उचलावे, असे ते मुळीच नव्हते. मी व्यथित झालो होतो. आम्हाला शाळेतले सर सांगायचे, की कुठलीही गोष्ट थांबवणे सोपे असते. ती सुरू करून पुढे निभावणे यात पुरुषार्थ असतो. पुरुषार्थ ही सार्वत्रिक संकल्पना आहे. ती पुरुष असो वा स्त्री, कोणालाही लागू होऊ शकते.
हे सगळे विचार सुरू असताना, शेजारी भावेकाकांनी लावलेली सुंदर नाट्यगीते चालू होती. 'शूरा मी वंदिले'चे सूर कानात पडत होते. ज्याप्रकारे आशाताई समेवर येत, ठेहरावावर स्थिरावून, पुढच्या द्रुतलयीच्या ताना घेत होत्या, तेव्हा वाटले, की नातेसंबंधांचे असेच आहे. कधी कधी थांबायचे आणि मग उंच उडी घ्यायची, ती परत जमिनीवर ठेहराव घ्यायला, स्थिरावायला.
या दोघांच्या लग्नात त्यांच्या स्वतःच्या, दोन कुटुंबांच्या किती आशा, आकांशा आणि अपेक्षा एकवटल्या असतील. काही कारणांवरून सोईस्कर 'ठहर जाओ' म्हणायचे, हे बरोबर नाही. आपल्या समोर येणाऱ्या पेचप्रसंगातून मार्ग काढता येणे, त्यासाठी थोडा वेळ घेणे, विचार करणे, स्थिर होणे, ही ठेहरावाची भूमिका महत्त्वाची नाही का? का सरळ त्या पेचप्रसंगापासून सोयीस्कर पळ काढायचा आणि स्वतःहून निर्मिलेल्या शॉर्टकटचे गोडवे गात बसायचे. कधी कधी माणसांच्या अतिरेकी वागण्यामुळे हे मार्गही निवडावे लागतात; पण हे सर्वसामान्यपणे प्रत्येक वेळी लागू होईलच, असे नाही. आपण कितीतरी सामाजिक संस्थांचे घटस्फोट वाढण्या विषयीची सर्वेक्षण पाहतो, तेव्हा असहनशील, स्वैराचाराचे, आत्मकेंद्रित वृत्तीचे आणि 'ठहर जाओ'चे आवर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा येताना दिसते. जगण्यातील संघर्ष हा समाजाविषयीच्या असहनशीलतेच्या रूपात प्रकट व्हायला लागला, तर ते आपणास परवडणारे नाही. हल्ली पालकही अगदी सुरुवातीपासूनच मुलांना 'आम्ही तुम्हाला तुमची स्पेस देऊ,' असे सांगताना दिसतात. हे अगदीच बरोबर आहे; कारण पूर्वी पारंपरिकतेचे अतिरेकीपण बहुतांश घरात होते. याचा अर्थ असा नाही, की आता दुसरे टोक गाठायचे. आपल्या मनाचा ठेहराव यामध्ये सुवर्णमध्य साधूच शकतो. कायम सोयीच्या मार्गांमुळे झुंजण्याची वृत्ती, समजून घेण्याची मानसिकता संपण्यास सुरुवात होते. या प्रसंगातून, अनुभवातून आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत असतात आणि आपण उन्नत होत असतो.
स्वामी विवेकानंद त्यांच्या भाषणांतून नेहमी सांगायचे, की स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील पुसट रेषा ओळखायला शिका; म्हणजे मग आयुष्य दोलायमान होत नाही. एक सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे मुलांचे, युवकांचे विचारांचे मोकळेपण. कुठल्याही बुरसटलेल्या विचारांची वीण त्यांच्या बुद्धीवर नाही. फक्त नातेसंबंध मग ते घरचे असोत वा वैश्विक, ते जपण्याचे कसब अंगिकारायला हवे. फेसबुक, इन्स्टाग्राम ही साधने तर हवीच; पण लोकांमध्ये जाणे, त्यांच्याशी संवाद साधणे यासाठी मनाचा ठेहराव पक्का हवा. मगच स्थिर डोक्याने आपण विचार करू शकू. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तत्काळ शोधायचे, असा अट्टाहास का? काही प्रश्न जटील असतात; त्यामुळे थोडा वेळ घेऊन, प्रश्नाचा, प्रसंगाचा पोत लक्षात घेऊन, समस्या सोडवता येऊ शकते. नेहमी हात वर करून थांबणे आणि सोयीस्करपणे पेचापासून लांब पळणे, हे नक्कीच उपयोगाचे नाही. अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघायचे आणि मग आयुष्यात चमकायचे, हे कितीतरी वेळा मोठ्या लोकांच्या तोंडी आपण ऐकतो. अगदी तावून सुलाखून नाही; पण एखादा चटका बसला तर काय हरकत आहे? मोठ्या शिक्षणाने आपण सहनशील, क्षमाशील होतो. स्थिर होतो. फक्त विचारांची बैठक पक्की हवी, ठेहराव हवा.
शेजारचे नाट्यगीत संपले होते. मी हातात फोन घेतला. माझा मित्र फोनवर होता. थोडक्यात काय, तर हे विचारमंथन माझा ठेहराव होता. आता तान घ्यायची होती. ती त्याला सुरेल वाटेल की नाही माहीत नाही; पण जीवनगाणे थोडेच आपण 'ठहर जाओ' म्हणून संपणार आहे... नाही का!