शनिचरीने आतापर्यंत बरेच काही सहन केलेले असते. तिच्या डोळ्यांत टिपूसही आलेला नसतो. आता मात्र हा धक्का सहन होत नाही. ती रडू लागते, शोक करू लागते. छाती पिटून घेऊ लागते आणि त्याच वेळी मोठे मालक मृत्यू पावल्याची बातमी येते. जमीनदाराच्या मृत्यूच्याच दिवशी एका नव्या रुदालीचा जन्म झालेला असतो.
- प्रसाद नामजोशी
ही गोष्ट आहे शनिचरीची. शनिवारी जन्मलेल्या, जन्मत:च अशुभ घेऊन आलेल्या एका मुलीची. या जगात ज्या दिवशी तिने डोळे उघडले, त्याच दिवशी तिच्या बापाने मिटले. आई नाटक कंपनीतील कोणाचा तरी हात धरून पळून गेली. आता उरले काय आयुष्य तिचे? जगायचे कसेबसे, पडेल ते काम करत. गोरागोमटा रंग होता ते एक बरे होते. नाहीतर राजस्थानमधील वाळवंटात कुठल्याशा खेड्यात, जमीनदाराच्या आश्रयाने गावकुसाबाहेर राहणाऱ्या या मुलीच्या आयुष्याची इतिश्री कोठे झाली असती, ते काही वेगळे सांगायची गरजच नव्हती. शनिचरीचे असे झाले नाही. नियतीने तिच्या आयुष्यासाठी काही निराळाच मार्ग ठरवला होता.
या शनिचरीचे लग्नसुद्धा झाले. असेना का नवरा दारुडा आणि सासू खाष्ट. कुंकवाला धनी असणे आवश्यक होते. तसा तो मिळाला. वर एक मुलगाही झाला. अर्थात, त्यासाठी काही विशेष कर्तृत्वाची गरज नसतेच. मुळातच शनिवारी जन्मलेल्या या पांढऱ्या पायाच्या शनिचरीच्या आयुष्यात, आणखी घडण्यासारखे तरी काय होते म्हणा? नाही म्हणायला तिखट नजरेच्या तिच्या डोळ्यांवर जमीनदाराच्या मुलाची नजर पडलीच. आवडली त्याला ती. त्याने तिला आपल्या डोळ्यात डोळे घालून बघायला भाग पाडले.
आपल्याला आवडलेल्या, हव्या त्या स्त्रीला उचलून हवेलीवर आणणाऱ्यांपैकी काही लक्ष्मणसिंह नव्हता. त्याचा बाप त्यापैकीच होता; पण तो होता मरणासन्न अवस्थेत. आज जातो की उद्या अशी अवस्था; पण जात मुळात चिवट. त्यामुळे जात नव्हता! गोदान, ब्राह्मणभोजन वगैरे सोपस्कार चालू होते. आपल्यामागे कोणीही शोक करणार नाही याची खात्रीच असल्यामुळे, शेजारच्या गावातून त्याने एक रुदालीसुद्धा मागवून ठेवली होती.
भिकनी ही एक व्यावसायिक रुदाली होती. कोणीही मोठा माणूस मेला, की त्याच्या तिरडीपाशी जाऊन रडारड करणे, हाच व्यवसाय. चांगले पन्नास रुपये घेई ती असे रडण्याचे आणि ऊर बडवण्याचे दहा वेगळे. अर्थात, हा निरोप घेऊन येणाऱ्याला दोन-पाच रुपये दलाली देई ती. आता व्यवसाय म्हटल्यावर या गोष्टी आल्याच. शनिचरीला मात्र या गोष्टी आवडत नसत. पैसे घेऊन हुकमी रडणे भिकनीला कसे काय जमते बुवा? कारण शनिचरीच्या आयुष्यात रडण्यासारखे अनेक प्रसंग आले होते; पण तिच्या डोळ्यात कधी टिपूसही आलेले नव्हते. जन्मल्याबरोबर बाप मेला, आई पळून गेली. सासू आजारी, ती मेली तेव्हा नवऱ्याचा पत्ता नव्हता आणि दारुडा नवरासुद्धा एक दिवस प्लेगच्या साथीत मेला. पुढे मुलगा मोठा झाला; पण तो काहीच करत नव्हता. नाही म्हणायला एका बाजारबसवीच्या घरी दारू पिऊन पडून राहायचे कार्य मनोभावे केले त्याने काही दिवस. पुढे तिलाच बायको म्हणून घरात घेऊन आला. तिला हाकलावे, तर तिच्या पोटात याचे पोर! शनिचरीने घेतले सांभाळून; पण नातू होणार हा आनंदही फार काळ टिकला नाही. दोघींच्यात विस्तव जात नसे. झालीच एकदा हाणामारी. मग काय, रागाने ती गेली निघून आणि पोर टाकले पाडून. तिकडे मुलगाही पळून गेला घरून; पण शनिचरीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही. सगळे अश्रू आटून गेले होते तिचे.
भिकनीने मात्र तिला आपले रडण्याचे रहस्य सांगितले. एक औषध डोळ्यात घातले, की येते रडू बरोबर. घालते बोट शनिचरीच्या डोळ्यांत; पण तरीही डोळे पाणावत नाहीत तिचे. तू होतेस का रुदाली? बघ, चांगला धंदा आहे. भिकनीच्या या कल्पनेला शनिचरी बिचारी नाही म्हणते. एवढे प्रसंग आपल्यावर येऊनही डोळे कोरडे आहेत आपले. 'मोले घातले रडाया, नाही आंसू नाही माया' हे काही आपल्याला जमणार नाही हे तिला माहिती आहे. भिकनीपाशी शनिचरी आपले मन मात्र मोकळे करत जाते. आपली कथा मोकळ्या मनाने ती भिकनीला सांगते. तिच्यावर मोहित होऊन लक्ष्मणसिंहाने तिला हवेलीत काम दिले. तेथे एवढे मोठे वाहते पाणी तिने पहिल्यांदाच बघितले होतं. त्या पाण्यात हात-तोंड धुताना आयुष्यात काहीतरी मोठी घटना घडल्याचे तिला वाटते. हे कमी म्हणून की काय लक्ष्मणसिंहाच्या मुलाच्या उष्टावणप्रसंगी तिला गायची संधीही मिळते. आपण हलक्या जातीचे आहोत आणि वर अपशकुनी; त्यामुळे एवढ्या चांगल्या प्रसंगी गाणे योग्य होणार नाही, असे ती सांगून बघते. नकोच आपली सावली नव्या जीवावर! पण लक्ष्मणसिंह दिलदार आहे आणि नव्या विचारांचाही. जलसा रात्री होईल, तेव्हा सावलीबिवली काही पडणार नाही, असे सांगून तो शनिचरीची शंका निकालात काढतो.
शनिचरी गाते. 'एक बुंद कभी पानीकी मोरी अखियोंसे बरसाए... दिल हूम हूम करे, घबराये...' आपल्या डोळ्यांतून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडत नाही, ही गोष्ट तिला आता डोळ्यात कुसे टोचावे तशी टोचते आहे. गाण्यातून ते भाव बाहेर पडतात. ती रात्र तिच्यासाठी महत्त्वाची ठरते. लक्ष्मणसिंह तिला तिच्या घराजवळची जागा बक्षिस देतो. ती रात्र आणखीही एका कारणासाठी महत्त्वाची ठरते, जिचा उल्लेख ती भिकनीपाशी करत नाही; पण त्या दिवसानंतर ती हवेलीत कधी गेलेली नाही हे भिकनी ओळखते. एखाद्या आईने मुलीचं अंत:करण ओळखावे तसे. भिकनी तिच्या आयुष्याच्या गोष्टी ऐकता ऐकता शनिचरीची वेणी घालते, तिला जेवू घालते. आपण दोघी रुदाली होऊन एकत्र राहू, असे सांगतेसुद्धा.
त्याच रात्री भिकनीला शेजारच्या गावातून बोलावणं येते, भीमदाताकडून. हा कोण? भिकनी सांगते मी तुझीच कहाणी ऐकत होते आजवर, माझ्याकडेही सांगण्यासारखे खूप आहे; पण आल्यावर सांगेन, असे म्हणून मोठ्या जमीनदाराच्या मृत्यूची वाट बघत कंटाळलेली भिकनी शेजारच्या गावात जाते. वडिलांच्या मृत्यूनंतर लक्ष्मणसिंह गाव सोडून जाईल अशी आवई उठल्यामुळे, त्याला शेवटचे म्हणून भेटायला शनिचरी जाते. खूप वर्षांनी ती पुन्हा एकदा हवेलीत पोचते. लक्ष्मणसिंहाशी सुखदु:खाच्या चार गोष्टी करते. तो अजूनही तसाच आहे. तिच्यावर आजही त्याचे प्रेम आहे. तिला आपल्याकडे बघून डोळ्यात डोळे घालून बोलायला सांगतो. त्याच्यामुळेच ती मान वर करून जगायला शिकलेली आहे; पण तेवढ्यात एक बातमी येऊन थडकते. भीमदाताला भेटायला गेलेल्या भिकनीच्या मृत्यूची बातमी आणि त्यासोबत तिचा मृत्यूशय्येवर पडून शनिचरीसाठी दिलेला निरोप. भिकनी म्हणजेच एकेकाळी पळून गेलेली शनिचरीची आई आहे! शनिचरीला धक्का बसतो. आतापर्यंत तिने बरेच काही सहन केलेले असते. तिच्या डोळ्यांत टिपूसही आलेला नसतो. आता मात्र हा धक्का सहन होत नाही. ती रडू लागते, शोक करू लागते. छाती पिटून घेऊ लागते आणि त्याच वेळी मोठे मालक मृत्यू पावल्याची बातमी येते. जमीनदाराच्या मृत्यूच्याच दिवशी एका नव्या रुदालीचा जन्म झालेला असतो.
एका वेगळ्या पार्श्वभूमीची कथा सांगून चित्रपट संपतो आणि आपल्या मनात रेंगाळत राहते भूपेन हजारिकांचे संगीत. चित्रपटासारख्या ताकदवान दृकश्राव्य माध्यमाची छाप तो बघून झाल्यावरही त्याच्या संगीतापुरतीच उरावी हा फक्त योगायोग आहे, की दिग्दर्शकाचे संगीतकाराविषयीचे समर्पण? संगीतात गाठलेल्या उंचीपर्यंत चित्रपटाला पोचवण्यात दिग्दर्शकाला मर्यादा आली, की असे घडू शकते. अर्थात, संगीताचा भाग दृश्यबद्ध करताना दिग्दर्शिका कोठेही कमी पडत नाही, याचीही नोंद येथे केली पाहिजे. हे अस्सल संगीत आणि अभिजात कथा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण केलेल्या चित्रपटाचे श्रेय तिला दिले पाहिजे.
रुदाली (हिंदी/ १२८ मिनिटे/ १९९३)
कथा : महाश्वेतादेवी
पटकथा, संवाद, गीते : गुलझार
दिग्दर्शिका : कल्पना लाजमी
कलाकार : शनिचरी- डिम्पल कपाडिया, भिकनी- राखी, लक्ष्मणसिंह- राज बब्बर
(डिम्पलला अभिनयासाठी, समीर चंदाला कला दिग्दर्शनासाठी आणि सिम्पल कपाडियाला वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार)