सिंगल असणे म्हणजे काय, हे पुणे शहरात आल्यानंतर मला समजले. या सिंगल असण्याने मला बऱ्याच गोष्टी शिकविल्या. लोकांचा स्वभाव पुरेपूर समजला. एखाद्या वेगळ्या शहरात आलेली मुलगी, तीही सिंगल, म्हणजे संधी, असे समजणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी गरजेचा असलेला कठोरपणाही येथे शिकता आला.
अॅड. कविता शिवरकर-कलगुटकर
'जगण्यासाठी पुणे हे सर्वांत सुंदर शहर' ही बातमी नजरेस पडली आणि पुणे या शब्दावर माझी नजर स्थिरावली. आयुष्याचा खूप मोठा काळ मी येथे घालविला. पुणे म्हणजे माझ्या मनाचा खास कप्पा. एखाद्यासाठी ते फक्त एक शहर असू शकते. माझ्यासाठी एक विश्व आहे. त्या विश्वात अनेक कालखंड आहेत आणि त्या प्रत्येक कालखंडात आठवणींचे अनेक ऋतू आहेत.
दोन-तीन बॅगा घेऊन २००२च्या जुलै महिन्यात, रिमझिम पाऊस सुरू असताना मी बारामतीहून पुण्यात दाखल झाले. स्वारगेट ते लॉ कॉलेज हा रिक्षाचा प्रवास करताना भली मोठी होर्डिंग आणि सिग्नल बघून वाटले होते, किती गोंगाट आणि गर्दी आहे येथे. लॉ कॉलेजच्या त्या हिरव्यागार कॅम्पसमध्ये प्रवेश केला, तेव्हा शांत आणि नयनरम्य ठिकाणी आल्याची जाणीव झाली. या शहराची परस्परविरोधी रूपे मनाला खूप भावली. आई-वडिलांपासून पहिल्यांदा दूर, अनोळखी शहरात आले होते. हॉस्टेलची ती पहिली रात्र आठवली. स्वप्नांमुळे किंवा घरच्या आठवणींमुळे डोळे सारखे भरून यायचे; त्यामुळे पापण्या रात्रभर चिकटल्या नव्हत्या. त्यावेळी रेडिओ मिर्ची नुकतेच सुरू झाले होते. कॉलेज सुरू व्हायला काही दिवस होते. नवीन रूममेट्सशी जुजबी ओळख आणि हॉस्टेलचे वेळापत्रक सांभाळताना या अनोळखी शहरात रेडिओने जवळच्या मित्रासारखी साथ दिली. मोबाइल नसल्यामुळे हॉस्टेलच्या लायब्ररीत व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, रणजीत देसाई, शांता शेळके आणि हरिवंशराय बच्चन यांच्याशी घट्ट मैत्री झाली. हॉस्टेल आणि कॉलेजमधील अंतर सुरुवातीचे काही दिवस पी.एम.टी.ने आणि चालत पार केले. नंतर घरून सायकल मागवली. पुण्यातील सायकल ट्रॅकवरून मी भरपूर सायकल चालवली. जवळपास निम्मे पुणे मी सायकलवरून पाहिले.
आमच्यासाठी रेडिओ कात टाकून पुन्हा तरुण झाला होता. हॉस्टेलच्या वॉचमन काकांपासून ते मेसपर्यंत, कॅफेटेरियापासून ते बाहेरच्या चहा टपरीपर्यंत, कॉलेज कँटिनपासून ते पार्किंगपर्यंत सगळीकडे तो ऐकू यायचा. रूमच्या बाल्कनीतून रात्री शांत; पण झगमगाट करणारे पुणे दिसायचे. अगदी सिंहगडपर्यंत नजर जायची. मनातील हितगुज करायची ती वेळ अफलातून होती. मराठी शाळेतून शिक्षण केल्यामुळे इंग्रजीमधून कायदा शिकण्याचा प्रवास खडतर होता; पण निभावून नेता आला. हॉस्टेल जीवनात जिवाभावाचे मैत्र मिळाले. कॉलेज-कँटिन-लायब्ररी-हॉस्टेल-पुणे भटकंती यामधे कॉलेजची पाच वर्षे कशी सरली ते समजलेच नाही. मी पुण्याच्या प्रेमात पडले आणि येथेच वकिली सुरू केली. मला वाटले होते, की आपल्याला फक्त कायद्याची पदवी मिळाली; पण त्यासोबत एक 'सिंगल' असा टॅगही मिळाला होता.
हॉस्टेल सोडले आणि राहण्यासाठी घराची शोध मोहीम राबविण्यात आली. इस्टेट एजंटपासून घरमालकांपर्यंत आणि सोसायटीच्या अध्यक्षांपासून शेजारपाजारपर्यंत सगळीकडे पहिला प्रश्न विचारला गेला, 'सिंगल का?' एका मालकाला म्हटले, 'सिंगल नाही. अजून दोन मुलीही सोबत राहणार आहेत.' त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, 'त्याही सिंगल का?' मी म्हटले, 'छे! त्या माझ्यासोबत राहणार आहेत; त्यामुळे त्याही सिंगल नाहीत.' हे ऐकून एजंटचे डोळे पांढरे झाले. मला बाजूला बोलवून त्याने 'सिंगल' या शब्दाचा व्यापक महिमा सांगितला आणि मी धन्य झाले. घर मिळाले आणि तो म्हणाला, 'मॅडम माझ्यामुळे तुम्हाला घर मिळाले, नाही तर कुठलीही सोसायटी सिंगल लोकांना घर देत नाही.' त्यानंतर कामवाली बाई आणि कचरा उचलणारा यांनीही सिंगल लोकांकडे काम करायचे असल्याने पैसे आगाऊ मागितले. माझा कचरा मी उचलेन, असे सांगितले. नियमित पगारात काम करा, नाहीतर मी दुसरी बाई बघते, असे कामवालीलाही सांगून टाकले. पुढे ते घर सोडले आणि त्या एजंटला पकडले. एका आठवड्यात दुसरा फ्लॅट बघून दे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे, असे त्याला खडसावले, तेव्हा बरोबरच्या सगळ्याच सिंगल मंडळींना माझा आधार वाटला. त्यानंतर कोथरूडमध्ये एका प्रेमळ काकांच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. काकांनी माझ्यावर त्यांच्या नातीसारखा जीव लावला. नंतर त्या सोसायटीचे पुनर्निर्माण सुरू होणार असल्यामुळे तेही घर सोडावे लागले. एका खोलीचा चौथ्या मजल्यावरचा फ्लॅट लिफ्ट नसल्याने कोणी घेत नव्हते. मी तो घेतला. सिंगल मी आणि तो सिंगल रूम फ्लॅट. भाडे जास्त होते. मी काही दिवसांतच पुण्याच्या एका ग्रुपवर जाहिरात टाकली. त्यातून एक सिंगल मुलगी सोबत म्हणून मिळाली. ती नुकतीच लंडनहून आली होती. 'सिंगल ही शिवी नाही, काहीतरी करून दाखविण्याची ती संधी आहे,' असे ती सांगायची. मूळची बंगाली होती; पण मराठी आणि उर्दू छान बोलायची. काही दिवसांतच चांगली किंमत मिळाल्यामुळे मालकांनी तो फ्लॅट विकला. नंतर खूप सुंदर फ्लॅट मिळाला. दिवसाची पहिली बेल वाजली, की वर्तमानपत्र यायचे. दुसऱ्या बेलला दुधाची पिशवी, तिसऱ्या बेलला कामवाल्या मावशी दूध आणि पेपर घेऊन आत यायच्या. माझी जिमची गडबड आणि रूममेट्सची बस पकडायची गडबड. आम्ही तीन सिंगल मुली आणि तीन खोल्यांचा फ्लॅट.
हळूहळू कोर्टातही जम बसत गेला, तशी एक स्कूटी घेऊन टाकली. वर्तमानपत्रांत माझ्या केसेसच्या बातम्या यायच्या. त्याची दखल पुण्यात आणि माझ्या गावी अभिमानाने घेतली जायची. यादरम्यान पुण्यातील अनेक कुटुंब जोडली गेली. घरापासून दूर, तरीही घरी असल्याची जाणीव या सगळ्यांनी करून दिली. सिंगल असूनही संपन्न वाटायचे. संध्याकाळी कोर्ट संपले, की विरंगुळा म्हणून फर्ग्युसन रस्ता, एम.जी. रोड होते. पुण्यातील चहाच्या टपऱ्यांवर एकदातरी कटिंग मारली होती. घटस्फोटाच्या केसेस चालवताना परिस्थितीने सिंगल झालेल्या आणखी काही व्यक्ती आणि वल्लींना भेटले. मी पाहिलेल्या या शहरातील गर्दीतल्या मुखवट्याआडचे चेहरे हळूहळू का होईना; पण स्पष्ट दिसत गेले. काही चेहरे सिंगलपणाचे 'क्लिअर टायटल' घेऊन होते, तर काही नात्यांमधे अडकूनही सिंगलच होते.
क्षेत्र कोणतेही असो, सिंगलपणाची नको त्यांना, नको इतकी काळजी असते. आत्तापर्यंत वास्तविक जगातील सिंगल टायटल कमी होते, म्हणून त्यात सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनचे ग्रुप्स आले. आत्ताआत्तापर्यंत वास्तविक जीवनातली घुसखोरी, थोडे कडक बोलून थांबविता यायची. या ग्रुपमुळे कोणाकडेही नंबर जायचा आणि रात्री-अपरात्री मेसेज सुरू व्हायचे. कडक बोलून, दम देऊन काही जण ऐकायचे नाहीत. अशावेळी सायबर सेलकडे तक्रारही केली. एकाला धडा दिला, की आजूबाजूचे दहाजण सुधारायचे. काहीवेळा काहीजण निर्लज्जपणे वागायचे. 'मॅडम, सोशल मीडियावरचा फोटो मस्त आहे,' असे कोर्टातही सांगायचे. काही चौकस बहादूर सांगायचे, 'मॅडम, तुम्ही काल रात्री ऑनलाइन होता.' एखादा अति शहाणा म्हणायचा, 'काल तुमचे लास्ट सीन अमुक वाजता होते.' त्यांना काय सांगू? टायपिस्टला ड्राफ्टिंग पाठविले, की मेसेज पाठवून ठेवायचे. म्हणजे सकाळी कोर्टात पोहोचेपर्यंत तो आपले काम करून ठेवायचा; पण या लोकांना हे कोणी सांगायचे? मुळात मी कोणाला का बांधील राहावे. माझे जगणे आहे आणि माझी मर्जी. अशा लोकांमुळे आम्ही सोशल होणे, सोशल मीडियाचा वापर करणे का थांबवायचे?
मी सिंगल आहे; पण उपलब्ध नाही. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. तू माझ्या हद्दीत शिरकाव करू नकोस, असे संदेश मला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने पोहचविता आले नसते, तर या ओळखीच्या शहरात अनोळखी संकटांनी घेरले असते आणि आत्मसन्मान टिकला नसता. एक मुलगी, तीदेखील सिंगल आणि एका अनोळखी शहरात, हा वेगळाच विषय होतो. हा विषय असतो चर्चेचा आणि संधीचा. कोणीतरी काहीतरी पाहतो आणि त्याचे काहीच्या काही ऐकू येऊ लागते. अशामुळे सिंगल व्यक्ती एकाकी होऊन जाते.
मला आयुष्यभर सिंगल नक्कीच राहायचे नव्हते आणि सगळीकडून येणाऱ्या दबावामुळे कोणाचीतरी निवड करून त्या नात्यामधे सिंगल उरायचे नव्हते. आपल्या लोकांना हे नाते फार आवश्यक वाटते. ते फक्त नावाला असले, त्या दोघांत काहीही धागे विणलेले नसले, तरी चालतात. मला योग्य निवड करण्यासाठी वेळ हवा होता. हा वेळ माझाच होता आणि माझ्याच आयुष्याकडून तो मी मागत होते, तरीही लोकांची दखल थांबत नव्हती. असा वेळ ज्याचा त्याला शांतपणे द्यावा आणि एखाद्याच्या खासगी आयुष्यात दखल देणे थांबवावे, एवढे साधे गणित लोक का विसरतात, हे आजही समजत नाही.
लग्नाचे कुठवर आले आहे? लाडू कधी देणार? या प्रश्नांनी कंटाळा आला होता. दहावीनंतर घरी बसलेल्याला तेच प्रश्न आणि उच्च शिक्षण घेऊन करिअर करणाऱ्यालाही तेच. एकाच्या लग्नाच्या लाडूची बुंदी पार फॅमिली कोर्टापर्यंत सांडली, तरी तो मला वेळेत लग्न करायचा सल्ला देत होता. वेळेत लग्न, म्हणजे कोणत्या वेळेत आणि ही वेळ ठरवणारे तुम्ही कोण? अशा उलटसुलट प्रश्नांनी माझी पाठ २०१६पर्यंत पुरवली. मी या सगळ्या प्रश्नांना पुरून उरले. आपले कुटुंब सोबत असेल, तर अशा प्रकारच्या गोष्टी खूप त्रासाच्या होत नाहीत. साथ नसेल, तर नैराश्यात गेलेल्या सिंगल्सनाही मी पाहिले आहे. या शहराने पदवीबरोबरच दिलेल्या 'सिंगल' या शिक्क्यानेही खूप सारे अनुभव दिले. पुढे याच गच्च भरलेल्या शहराने आयुष्याचा जोडीदारही दिला. जुलै २०१७मध्ये मी दहा वर्षांचा वकिलीचा आणि मनमुराद-बेधडक-बिंधास्तपणे जगलेल्या पुणे शहरातील त्या सिंगलपणाचा अनुभव घेऊन साथीदारासह अमेरिकेत आले. एक वर्षात तरी येथे कोणी कोणाच्या आयुष्यात हस्तक्षेप करताना दिसले नाही. एखादा सिंगल आहे, की कमिटेड, याची फिकीर त्यांना नसते. लग्नासारखी गोष्ट यांच्यासाठीही आपल्याइतकीच पवित्र आहे. येथे कोणी कोणाच्या राहणीमानावरून निष्कर्ष काढत नाही, की कामावरून हलके मानत नाही. आपण खाणे-पिणे आणि कपड्यांबाबत बाहेरच्या देशातील सभ्यता पाळतो. एखाद्याच्या आत्मसन्मानाची गोष्ट येते, तेव्हा मात्र १०० वर्षे मागे जातो. आजही माझ्या मित्रयादीत असणाऱ्या अनेक जणी मला त्यांच्या बऱ्या-वाईट प्रसंगी हाक देतात. एका सिंगलचे दुःख कधीकाळी सिंगल राहिलेलीच समजू शकते. आज या अनोळखी देशात काम करताना आणि नवीन ओळखी करून घेताना पुण्यामध्ये राहताना, सिंगल असताना कमावलेल्या त्या आत्मविश्वासातच वावरते.