सोशल नेटवर्किंग साइटवर अॅक्टिव्ह असताना काही खडे येतातच. आपण ते वेचायचे आणि पुढे जायचे. दुर्लक्ष हा मार्ग माझ्यापुरता तरी उपयोगी पडतो.
सुचरिता
'तुम्हाला बौद्धिक साहचर्य हवे आहे ना? मग माझ्याशी लग्न करा. स्त्रीच कशाला हवी?' गुंड्याभाऊंचा हा बिनतोड तर्कशुद्ध सवाल आपल्याला खळखळून हसवून तर गेलाच; पण अंतर्मुखही करून गेला.
काय असते ही साहचर्याची ओढ? 'माझिया सारखे मिळो मला कोणी' ही धडपड कशाला? की निव्वळ शारीर आदिम प्रेरणा? ती असतेच. अमान्य करण्यात अर्थ नाही. राखेखाली दबलेल्या निखाऱ्यासारखी. धगधगत. एक फुंकरीची वाट बघत किंवा शांत; पण एवढेच पुरेसे नसते ना. ते जे अधिक थोडेसे काही, चेरी ऑन टॉप किंवा भुकेला भाकरतुकडा असते, त्याचा अव्याहत शोध चालू असतो.
ही आस विकता येऊ शकते, याचा शोध लावून बाजारात दुकान मांडणारा मार्कभाऊ हुशार तर खराच. त्याने फेसबुक जन्माला घातले. अगदी थोडक्या काळात त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले. या भस्मासुराची मोहिनी मोहिन्यांनाच इतकी पडली, की काय सांगावे. घरोघरी असतात या मूकमोहिन्या. यांना बोलता यायचे; पण ऐकणार कोण? आभाळाखालच्या प्रत्येक विषयावर यांना मते असायची. मतदान करता यायचे, मांडायची सोय नव्हती. मतामतांतराची देवघेव, खंडनमंडन यातली मजा अनुभवण्यासाठी जीव तळमळायचा. एक फेसबुक काय आयुष्यात आले, दाबल्याकोंडल्या गेलेल्या भावनांचा हा ज्वालामुखी फेसबुकच्या कुमारीभूमीवर चंडप्रतापी वेगाने उफाळून वर आला. लिहित्या, वाचत्या आयाबायांना हे जे साधन मिळाले, त्याचे काय करू नि काय नको, असे झाले. मनातले सगळे येथे ओकून टाकायची घाई झाली. समविचारी हाताच्या आधाराने हे एकाकी हेलपाटलेले जीव सावरू लागले. कविता, लेख, शास्त्र, सेक्स, रेसिपी, इतिहास, भूगोल, राजकारण ते समाजकारण अशा म्हणाल त्या विषयावर चावडीवरच्या गप्पा रंगू लागल्या. कुठल्या भिंतीवर रांगोळी, कोठे नृत्यनाट्य, तर कोठे वादविवाद झडू लागले. जगणे जिवंत झाले.
गोष्टी या आणि इतक्याच राहत्या, तर काही बिनसत नव्हते; पण समाजाने कष्टपूर्वक राखलेल्या लक्ष्मणरेषा या आभासी जगाने पुसल्या. मग नवे रामायण, महाभारत रचले गेले. कुणाच्या मनाचा, तर कुणाच्या मेंदूचा कब्जा घेतला गेला. फसवणुकींचे नवे अध्याय घडले.
मत मांडायला जशी भिंत, तसे मन मांडायला इनबॉक्स दिला. वैयक्तिक संवाद साधण्यासाठी सोय उपलब्ध झाली. सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी जगासमोर उघड मांडायच्या नसतात. खासगीपणा हवा असतो. भीती वाटते. लोक अघोरी टीका करतात, खिल्ली उडवतात, कधी कावळ्याच्या झुंडी टोच्या मारून जीव घेतात. अशा वेळी हा एकास एक संवाद करण्यासाठी इनबॉक्स बरा पडतो.
'यहाँ कहानी में ट्वीस्ट आया!' आपण वॉलवर काही लिहितो. एखादा अनुभव, निरीक्षण, विचार, असे काहीही. वाचणाऱ्यांना ते पटते. हेच, हेच मलाही सांगायचे होते, मी देखील अनुभवले हो, असे सांगणारे कोणी चॅटबॉक्समध्ये येते. आपण बोलतो. ऐकतो. सहानुभूती दर्शवतो. जमल्यास काही सल्ला, उपाय सुचवतो. उभयपक्षी सगळे आलबेल असते. छान मैत्री (?) वगैरे होते.
पण चॅटबॉक्स ही गोष्ट इतकी बदनाम झाली, ती काय उगाच? आपल्या समाजात स्त्रीपुरुषांच्या एकत्र, मोकळेपणाने वागण्याबोलण्याला कधीही परवानगी नव्हती. येथे तशा मर्यादा नसल्याने धरण फुटून पुराचे पाणी बॉक्समध्ये रोरावत शिरले. संपूर्ण अनोळखी बाई बोलते, थेट संवाद होतो, हे थ्रिल काही आगळेच. 'बाई तुम्ही किती छान लिहिता,' येथून सुरुवात होते. मग प्रगती होते, 'बाई तुम्ही कित्ती छान दिसता. तुमचे मन किती किती सुंदर आहे. (ते कसेकाय दिसते बुवा?) पुढचे स्टेशन गाठायचे की नाही, हे गाडी जाणे, रूळ जाणे.
काही जण असे ताकाला जाऊन भांडे लपवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. 'से यस ऑर से नो,' असा खडा सवाल करतात. 'आगे जाव,' म्हटले की तातडीने आगे जातात. घाणेरडी चित्र, फोटो पाठवतात. एकदा एकाने बरीच रंगीत चित्रे, स्वतःचे दोन व्हॉट्सअॅप नंबर आणि खडा सवाल पाठवला. मान्य नसल्यास तुम्हीच पुढे जा म्हणाले. शेवटी 'जय श्रीराम' लिहिले होते. या सत्कार्यात त्यांना ईश्वरी मदत हवी होती बहुतेक. त्याला मनातल्या मनात सांगितले, की या कौसल्या मातेला माफ कर बाबा. मग एक तीन खोल्यांची सदनिका, अर्थात ब्लॉक देऊन टाकला.
यावर प्रतिक्रिया म्हणून काही स्त्रिया फार चिडतात. मत स्वातंत्र्य प्रत्येकीला आहेच. स्क्रीन शॉट टाकून वेशीवर जाहीर फाशी देतात. मग दोहो बाजूंनी फौजा मैदानात उतरतात. धुमश्चक्री, राळगाळ उडवून चकमक थांबते. 'J1 झाले का,' ही राष्ट्रीय ओपनिंग लाइन म्हणून जाहीर व्हावी. व्हॉट्सअॅप नंबर द्या, हे व्दितीय पारितोषिकपात्र वाक्य. 'और बोलो,' हे त्यानंतर.
सगळेच काळे कधीच नसते. खूप प्रामाणिक मैत्री नातीसुद्धा जुळतात. यात सन्माननीय मित्रांची बाजू बरोबर असू शकेल. कधी असतेही. मी या काठावरून चित्र पाहते आहे, इतकेच. आईने सांगितलं होते, 'रस्त्यावरून जाताना मान खाली, नजर खाली.' हा फंडा जुनाट आहे, माझ्यासारखा; पण दुर्लक्ष हा मार्ग माझ्यापुरता उपयोगी पडतो. फेसबुक देऊ करत असलेल्या छान मैत्रीकडे पाहून मी हा कचरा नजरेआड करते. दुसऱ्या कोणी काय करावे, हे कसे सांगू?
यावर मी लिहिलेली ही एक पोस्ट,
फेसबुकीय मैत्रीण. कोणाची तरी रिक्वेस्ट स्वीकारते. सद्गृहस्थ संवाददेवघेवघनकुपिकेत येऊन धन्यवाद म्हणतात. ताबडतोब. येथून एक अंगठा जातो. या अंगठ्याने पल्याडच्या ओथंबून आलेल्या प्रेमळ ढगाला भोक पडते. ताबडतोब. धुवांधार वर्षा सुरू होते. ताबडतोब.
'तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. तुला काहीही दुःख असेल, तर मला सांगू शकतेस. हा माझा नंबर. कधीही व्हॉट्सअॅप कर. शेअर करू शकतेस.'
मैत्रीण भांबावून गेली. तिला सांगितले, की एका वाक्यात हवा काढ. त्याला सांग, 'मला काहीही दुःख नाही. नवरा खूप प्रेम करतो. मायेने सांभाळतो. लाड करतो. खूप खूप चांगला आहे. मी अतिशय आनंदात, सुखात आहे.' विषय संपला. त्यानंतर मात्र पेंटहाउस फेकून मार. ताबडतोब.
टीप : अनुभव खरोखर मैत्रिणीचाच आहे.
आहे हे असे आहे किंवा मला दिसते आहे. तांदळात खडे असायचेच. तितके वेचून फेकू आणि काय?