अ‍ॅपशहर

घेतला वसा समाजभानाचा

आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरुन जगणारी तरुणाई समाजासाठीही काही करु पाहतेय. स्वत:मधली कौशल्यं, सळसळत्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करत त्यांनी काही ‘मिशन’ हाती घेतलंय. अशाच काही हरहुन्नरी ग्रुप्सची माहिती ‘मुंटा’ तुमच्यासमोर ठेवतोय.

Maharashtra Times 12 Jan 2018, 3:56 am
आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरुन जगणारी तरुणाई समाजासाठीही काही करु पाहतेय. स्वत:मधली कौशल्यं, सळसळत्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करत त्यांनी काही ‘मिशन’ हाती घेतलंय. अशाच काही हरहुन्नरी ग्रुप्सची माहिती ‘मुंटा’ तुमच्यासमोर ठेवतोय. चला, त्यांच्या पाठीवर शाबासकीची एक थाप जरुर देऊ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम social work groups in india
घेतला वसा समाजभानाचा


अनोखी ‘व्हिजन’
अंधत्वावर मात करत शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिजन’ ग्रुप खूप मोलाचं काम करतो आहे. संदेश भिंगार्डे या तरुणानं सुरू केलेल्या या उपक्रमात प्रज्ञा पटेल, ऋतुजा शिंदे, अभय पाटील, पवीथ्रा रामस्वामी, मृणाली खोपकर हेदेखील सहभागी झाले. परीक्षा काळात लेखनिक म्हणून काम करताना आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ब्रेल लिपीत सध्या फारसं अभ्यासाचं साहित्य उपलब्ध नसल्यानं, अंध विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी ऑडिओ लायब्ररी बनवण्याचं काम व्हिजन ग्रुपनं सुरू केलंय. या लायब्ररीमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टीची पुस्तक आणि विविध कादंबऱ्यांचाही समावेश असेल. अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय. विद्यार्थ्यांमधल्या सुप्त कलागुणांसाठी ‘द लँटर्न’ हा कार्यक्रम देखील केला जातो.

किनाऱ्यांची सफाई
सोशल सर्व्हिस अभ्यासक्रम करणारे तुषार वारंग, बालाजी सगर, विशाल सोडिये, बॅनीटा डिसोझा, कोमल घाग यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिलं आहे. मुख्यत: समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी हा ग्रुप नेटानं काम करत असतो. काही संस्थांच्या साथीनं अनेक समुद्रकिनाऱ्यांवर साफसफाई मोहिम ते राबवत असतात. तरुणांना सोशल मीडियाच्या भुलभुलैय्यापासून थोडं लांब नेऊन त्यांना पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ते झटत आहेत.

पथनाट्यातून जागृती
पथनाट्यांतून एखादा संदेश प्रभावीपणे देता येतो. म्हणूनच रुईया कॉलेजच्या एनएसएसचा ग्रुप वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर पथनाट्यं सादर करत असतो. नैराश्याच्या भरात होणाऱ्या तरुण-तरुणींच्या आत्महत्या, एड्स, हुंडा या विषयांवर त्यांनी पथनाट्यांचं सादरीकरण केलं आहे. काय करावं आणि काय करू नये हे काहीशा मनोरंजक पद्धतीनं लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. काही गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन तिथे दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांसमोर त्यांनी पथनाट्यांचं सादरीकरण केलं आहे. यातून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास मदत होते, असं ते म्हणतात.

एक ‘संवाद’ असाही
चार मित्रांनी एकत्र येऊन २००९ साली ‘मैत्री संवाद’ या नावाचा एक ग्रुप सुरू केला. मनोज आहेर, उमेश खाडे, संतोष नाईक आणि विक्रम घाग अशी या चौघांची नावं. समाजासाठी काहीतरी भरीव काम करावं यासाठी या ग्रुपची स्थापना झाली. 'मैत्री संवाद'कडून ग्रामीण भागात आज मोठ्या प्रमाणावर समाजकार्य केलं जात आहे. कॉलेजमध्ये शिकणारे अनेक तरुण-तरुणी, तसंच नोकरी करणारेही अनेक जण ‘संवाद’साठी काम करत आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं यासाठी ते प्रयत्नशील असतात. यासोबतच पर्यावरणरक्षण, सेंद्रिय शेती या गोष्टींची माहिती देखील या ग्रुपतर्फे दिली जाते.

शुभम पाटील, अजय उभारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज