सारंग भाकरे
मागच्या लेखात आपण पारलैंगिकतेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविषयी लिहिताना तृतीयपंथींविषयी लिहिण्याचं टाळलं होतं. त्याला कारणही तसंच आहे. तृतीयपंथींना भारतीय संदर्भात एक मोठा इतिहास आहे. तृतीयपंथी कोण, तर जे स्त्रीही नाहीत आणि पुरुषही नाहीत ते. वात्सायनानं चौथ्या शतकात रचलेल्या 'कामसूत्रा'त अशा व्यक्तींचा 'तृतीयप्रकृती' म्हणून उल्लेख येतो. भारतीय पुराणकथांमधून आपल्या भेटीला येणाऱ्या, नृत्य, गायन या कलांमध्ये निपुण असलेल्या किन्नर या दैवीपुरुषांसोबत तृतीयपंथी आपला संबंध सांगतात.
तृतीयपंथींना किन्नर, अरवानी, अरुवाणी, जोगप्पा, नपुंसकुडु, मंगलमुखी, पावैया, खुसरा याही नावांनी ओळखलं जातं. किंबहुना सगळ्याच भारतीय भाषांमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र शब्द आहे. किन्नरांसाठी वापरात येणारा आणखी एक शब्द म्हणजे हिजडा. प्रचलित भाषेत त्याचा उपयोग एखाद्या शिवीसारखा होतं असला तरी, हिजडा शब्दाचा मूळ अर्थ फार वेगळा आहे. हिजडा हा शब्द 'हिज' या उर्दू शब्दापासून बनला आहे; ज्याचा अर्थ होतो देवाचा दूत. त्यामुळे जन्म, लग्न आदी प्रसंगांत हिजडा व्यक्तीनं येऊन आशीर्वाद देणं, त्याची दुवा घेणं फार महत्त्वाचं समजलं जातं. किन्नरांची स्वत:ची दैवते आहेत. कर्नाटकातली यल्लमादेवी आणि गुजरातमधली बहुचरामाता त्यांच्या प्रमुख देवता आहेत.
स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये न येणाऱ्या व्यक्तींची माहिती भारतीय समाजाला फार पूर्वीपासून होती. रामायणात एक खूप सुंदर कथा त्याविषयी येते. ती अशी- राम वनवासाला जायला निघतात. त्यावेळी दु:खावेगानं सारे अयोध्यावासी त्यांना सोबत करतात. भावनावेगाला आवर घालून साऱ्या स्त्री-पुरुषांनी अयोध्येत परत जावं, असं राम आवाहन करतात. चौदा वर्षांनी राम जेव्हा अयोध्येला परत येत असतात, तेव्हा अयोध्यावासी जेथून परतले, त्या जागी त्यांना एक मोठा मानव समूह त्यांची वाट बघत असलेला दिसतो. राम चौकशी करतात. त्यांना कळतं, थांबलेले हे सारे स्त्रीही नाहीत आणि पुरुषही. राम हे स्त्री-पुरुषांना परत जाण्याचा आदेश देतात. हा मानवसमूह तो आदेश स्वीकारू शकत नव्हता आणि रामासोबत वनवासातही जाऊ शकत नव्हता. म्हणून ते तिथंच वाट पाहत असतात. चौदा वर्षं. राम या साऱ्यांसह अयोध्येत प्रवेश करतात.
तृतीयपंथी वा किन्नर हा फार 'वेल ऑर्गनाइज्ड' समाज आहे. जशी आपल्या देशात कलेच्या क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरा आहे, तशीच गुरू-चेला परंपरा किन्नर समाजातही आहे. एक गुरू आणि त्याचा शिष्य परिवार असतो. शिष्यानं आपल्या गुरूची सेवा करत आयुष्य जगायचं, असं अभिप्रेत असतं. जो सर्वोत्तम शिष्य तो नंतर गुरूच्या गादीवर बसतो. शिष्य होण्यासाठी गुरूची रीत बांधावी लागते. अनेक किन्नर आपल्या पुरुषत्वाची खूण असलेले शिश्न, वृषण आदी अवयव कापून टाकतात. या अवयव कापून टाकण्याच्या क्रियेला 'निर्वाण' असं म्हटलं जातं. अर्थात निर्वाण हीच काही किन्नर होण्याची पूर्वअट नाही. निर्वाण करून घेणारी व्यक्ती आपल्या लैंगिक इच्छेचा त्याग करत असल्यानं तिच्याजवळ दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं. त्यामुळे किन्नर व्यक्तीचा आशीर्वाद जितका महत्त्वाचा मानला जातो, तितकाच त्याच्या शापाची लोकांना भीती वाटत असते.
किन्नर व्यक्तीची जी रूपरेखा आजच्या काळात आपल्या समोर उभी राहते, तशी इंग्रजपूर्व काळात नव्हती. किन्नर हा अतिशय शूर, लढवय्या, इमानदार आणि दरबारात मानाचं स्थान असलेला समाजघटक होता. इंग्रजपूर्व काळात 'स्टेट्स सिम्बल' ठरलेल्या जनानखान्याच्या रक्षणाची जबाबदारी किन्नरांची होती. पण पुढे इंग्रजी राजवट आल्यावर बादशाह्या बुडाल्या. जनानखाने बंद पडले. पुरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या अनेक नव्या कल्पना उदयाला आल्या. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्त्रैण पुरुषांना हीन स्वरूपात रंगवलं गेलं. भरीस भर इंग्रजी राजवटीत लादलेल्या नव्या कायद्यामध्ये तृतीयपंथी गुन्हेगार ठरले. त्यामुळे किन्नर समाजाची वेगानं अवनती सुरू झाली. पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही या समाजानं आपला लढा सुरू ठेवला. शेवटी २०१४मध्ये तृतीयपंथीयांना वेगळी लैंगिकता म्हणून ओळख मिळाली. त्यांना मूलभूत आणि नागरी हक्क असल्याचं मान्य करण्यात आलं. कायद्यानं जरी हक्क मिळाले असले तरी, जोपर्यंत आपला समाज ते हक्क मान्य करत नाही, तोपर्यंत किन्नरांचा लढा सुरूच राहणार आहे.