अॅड. जाई वैद्य
प्रश्न : माझी पत्नी अतिशय संशयी आहे. ऑफिसला जायच्या-यायच्या वेळा ठरलेल्या असल्याच पाहिजेत, जरा उशीर झाला, तरी त्याची कसून चौकशी आणि शेवट भांडणात होत असे. मी कुठल्याही कारणाने कुठल्याही बाईशी बोललो, तरी ती कुजकटपणे सर्वांसमोर टोमणे मारायची. मी फोनवर कुणाशी काय बोलतो, यावरही नजर असायची. या जाचाला कंटाळून मी घटस्फोटाचा दावा केला. त्या दाव्याच्या उत्तरातही तिने माझ्यावर अनेक लफडी केल्याचे अंदाधुंद आरोप केले आहेत. मला घटस्फोट मिळेल का?
उत्तर : कुठल्याही पुराव्याशिवाय, निव्वळ संशयाच्या आधारावर विवाहबाह्य संबंधांचे बिनबुडाचे आरोप करणे हा कायद्याने 'मानसिक छळ' मानला जातो. जोडीदाराच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेणे त्याच्या/तिच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकते. घटस्फोटाच्या दाव्यात केलेले बिनबुडाचे विवाहबाह्य संबंधांचे आरोप घटस्फोट मिळवून देण्यास पुरेसे असतात. एवढेच नव्हे, तर तुमच्या दाव्याच्या उत्तरात जर तुमच्या पत्नीने तेच आरोप तुमच्यावर केले असतील, तर अप्रत्यक्षपणे तुमच्या दाव्यास पुष्टी दिल्यासारखे किंवा तुम्ही केलेले आरोप मान्य केल्यासारखेच आहे. दाव्याच्या प्रत्युत्तरात जरी खोटे आरोप केले, तरी तो 'मानसिक छळ' धरला जाऊ शकतो. प्रतिवादीने दाव्याच्या उत्तरात केलेले आरोप जर खोटे असल्याचे सिद्ध झाले, तरी देखील वादीस घटस्फोट मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या पत्नीने तिच्या उत्तरात तुमच्यावर अंधाधुंद खोटे आरोप केले असले, तर त्याचा तुम्हाला घटस्फोट मिळण्यास उपयोग होऊ शकतो का ते पाहावे; मात्र यासाठी प्रतिवादिने केलेले आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करायला हवे. प्रतिवादिला आरोप सिद्ध करता आले नाहीत म्हणजे ते खोटे असल्याचे सिद्ध झाले, असे समजता येत नाही, हे लक्षात घ्यावे. आरोप सिद्ध न करता येणे आणि आरोप खोटा असल्याचे सिद्ध होणे, यात फरक आहे. प्रतिवादीला आरोप सिद्ध करता आले नाहीत, तरी तिने केलेले आरोप खोटे, खोडसाळ, बदनामीकारक आणि द्वेषमूलक आहेत, हे सिद्ध व्हायला हवे. विवाहबाह्य संबंध अथवा व्यभिचार सिद्ध करणे कठीणच असते. त्याविषयी थेट पुरावा सहजी मिळत नाही. संशय येण्यापासून सुरुवात होत असली, तरी तेवढ्यावरून विनाआधार आरोप केल्यास ते न्यायालयात टिकत नाहीत. विवाहबाह्य संबंधांचा परिस्थितीजन्य पुरावाच बहुधा न्यायालयासमोर येतो; परंतु सर्वच घटना विवाहबाह्य संबंधांचा पुरावा होऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, दोघेजण हॉटेलात/चित्रपटाला/पार्टीला एकत्र गेले असल्यास, फक्त त्यावरून दोघांत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होईल असे नाही. दोघे जण जर एकत्र, एका घरात राहात असतील, तर त्यांच्यात विवाहबाह्य संबंध आहेत, असे मानण्यास वाव असतो. याशिवाय इतर परिस्थितीजन्य पुरावेही जर त्याचे निदर्शक असतील, तर आरोप सिद्ध झाला असे मानावे लागेल. हल्लीच्या मोकळ्या मैत्रीपूर्ण वातावरणात, विवाहबाह्य संबंधांचा संशय घेणे सहजशक्य झाले आहे; पण दर वेळी ते योग्यच असते असे नाही. केवळ दोन व्यक्तींच्या विचार भिन्नतेमधूनहि असा संशय घेतला जाऊ शकतो. एखाद्याचा स्वभाव मोकळा असू शकतो, एखाद्यास भरपूर मित्रमंडळी असू शकतात किंवा एखाद्याला व्यवसायानिमित्त सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात, पार्ट्यांना जावे लागते. याचा संबंध लगेच व्यभिचाराशी लावणे योग्य नाही. नुसत्या संशयाच्या आधारे जोडीदाराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याने तुम्हा दोघांचीही मनःशांती नष्ट होतेच, शिवाय वैवाहिक नातेही संपुष्टात येते. विवाहबाह्य संबंध वा व्यभिचाराच्या आरोपाचे शस्त्र हे दुधारी असते. कायद्यात ते फार काळजीपूर्वक वापरावे लागते, अन्यथा ते आरोप करणाऱ्यावर उलटू शकते.