आपण सारे रंगभेदाला कळत नकळत सहजपणे खतपाणी घालत असतो. गोऱ्या रंगाला हे शोभून दिसते, ते शोभून दिसते, असे म्हणताना आपण सावळ्या रंगावर अन्याय करतो आहोत, याचा पत्ताही नसतो. हीच मानसिकता जेव्हा समूहाद्वारे व्यक्त केली जाते, तेव्हा त्यातून रंगविद्वेष निर्माण होतो.
श्रद्धा चमके
'मी दोन कोटी रुपयांची जाहिरात नाकारली; कारण त्या जाहिरातीमुळे तरुण पिढी नकारात्मक विचार करेल,' दाक्षिणात्य अभिनेत्री पल्लवी साई हिने काही दिवसांपूर्वी ट्विट केलेले वाचण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला पल्लवीला एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी विचारण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला. हे ट्विट वाचले तेव्हा वाटले, पल्लवीने दोन कोटी रुपयांची जाहिरात खरेच केवळ तरुणाईच्या नकारात्मक विचाराला प्राधान्य देऊन नाकारली असेल? जाहिरात नाकारण्यामागे असे एकदम काय कारण झाले, असा माझ्यासह अनेकांना प्रश्न पडला सुरुवातीला. नंतर खरे कारण कळल्यावर तिच्याविषयीचा आदर वाढला. तिच्या ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव झाला.
पल्लवी म्हणते, 'एवढ्या पैशांचे मी काय करू? शूटिंग संपल्यावर मी घरी जाते. पोटभर जेवण करते. वाटले तर माझ्या कारमधून मस्त भटकून येते. यापेक्षा माझ्या गरजा फार मोठ्या नाहीत. मग एवढा पैसा मिळवून मी करू तरी काय, तेही तरुण पिढीच्या मनात नकारात्मक विचार निर्माण करून. मला दुसऱ्यांना आनंद द्यायला आवडते.' पुढे ती म्हणते, 'मी आणि माझी लहान बहीण (पूजा) आम्ही दोघी जेव्हा आरशासमोर उभे राहतो, तेव्हा माझ्यापेक्षा काहीशी सावळी असलेली पूजा एकदा माझ्या तोंडाकडे पाहते आणि नंतर स्वतःच्या तोंडाकडे. नंतर पूजा म्हणते तू एवढी गोरी कशी? मलाही तुझ्यासारखे गोरेपान व्हायचे आहे. मी तिला भरपूर फळे, भाज्या खात जा. तूही होशील गोरी, असा सल्ला दिला. पूजाला सांगितल्यानंतर तिने तेव्हापासून भरपूर फळे आणि भाज्या खाण्यास सुरुवात केली. खरे तर फळे, हिरव्या भाज्या तिला अजिबात आवडत नाहीत, तरीही गोरे होण्यासाठी ती निमूटपणे हे सगळे खात असते. मला आश्चर्य वाटले, की गोरेपान होण्यासाठी, भाज्या आवडत नसतानाही पूजा ते निमूटपणे खाते. गोरे होण्यासाठीच्या आकर्षणातून ती हे सर्व करीत आहे. आपल्या आवडीनिवडी बाजूला सोडून सगळेजण वाट्टेल ते करायला तयार असतात.'
पल्लवीची बहीण येथे एक निमित्त; पण सरसकट सगळ्यांची गोरेपणा मिळविण्यासाठी काहीही करायची तयारी असते. चित्रपटातील संवाद असो, गाणी असो, जाहिराती असो, वधूसंशोधनातील अटी असो, जिकडे तिकडे गोरेपणाला दिलेल्या महत्त्वामुळे, नकळत सावळ्या अथवा काळ्या रंगाच्या लोकांवर अन्याय केला जातो.
काही वर्षांपूर्वी पल्लवी साईप्रमाणेच नंदिता दास या ज्येष्ठ अभिनेत्रीनेही फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती. त्यानंतर नंदिता दास यांना अनेक मुलाखतींमध्ये त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मला अशी जाहिरात करण्यात अजिबात रस नाही, असे उत्तर दिले. नंदिता दास यांनाही सावळ्या रंगावरून अनेकदा सामना करावा लागला. नंदिता दास जेव्हा जेव्हा महाविद्यालयीन तरुणाईशी संपर्क साधत असत, तेव्हा तरुणी त्यांना प्रश्न विचारत, रंग गडद असतानाही तुम्ही सहजतेने कशा वावरता? यावरून समाजातील रंगाविषयीची मानसिकता लक्षात येते. गोऱ्या रंगाचा आजार आपल्या नसानसांत भिनला आहे.
रोजच्या जीवनात अनेक उदाहरणे पाहून जाणवते, की आपली मानसिकताच रंगाधीष्ठित आहे. कळत नकळत आपण सर्वजण रंगभेदाला सहजपणे खतपाणी घालत असतो. गोऱ्या रंगाला हे शोभून दिसते, ते शोभून दिसते, असे म्हणताना आपण सावळ्या रंगावर अन्याय करतो आहोत, याचा पत्ताही नसतो. हीच मानसिकता जेव्हा समूहाद्वारे व्यक्त केली जाते, तेव्हा त्यातून रंगद्वेष निर्माण होतो.
आपल्या देशात सर्वांना गोरी बायको हवी असते. त्यामुळे सावळा रंग असलेल्या मुली गोरे होण्यासाठी विशिष्ट क्रीम लावत असतात. ते क्रीम कसे फायदेशीर आहे, हे त्यांच्या आवडीचे हिरो-हिरॉइन्स जाहिरातीतून सातत्याने सांगत असतात. आजूबाजूचे मित्र-मैत्रिणी, नातेवाइक गोरे होण्यासाठी टीप्स देत असतात. गोरा रंग नेहमीच अग्रस्थानी असल्याने विवाहविषयक जाहिरातींपासून ते हिंदी सिनेमात हिरॉइन होण्यापर्यंत जो तो त्याचीच चर्चा करतो. गुणवत्ता असूनही केवळ गोरी त्वचा असल्यामुळे मानधनात डावे-उजवे झाल्याचे किस्से ऐकू येतात. वयाच्या तिशीनंतरही सुंदर ठेवणाऱ्या उत्पादनाच्या जाहिरातीत अनेक सावळ्या रंगाच्या मुलींना गोरे झालेले दाखवण्यात येते. सौंदर्य उत्पादनांच्याच कशाला, कोणत्याही जाहिरातीत मॉडेल गोरी असते. स्त्रियांसाठी असलेल्या उत्पादनांमध्ये स्त्रियांनी सुंदर म्हणजे गोरे असणे अपेक्षित असते. त्यामुळे गोरे होण्यात काही वावगे आहे, असे आपल्याला कधीच वाटत नाही. नकळत सर्वांच्या मनात गोरा रंग हवाहवासा होऊन बसला आहे.
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) संस्थेने २०१४ मध्ये केलेल्या नियमावलीत काळा रंग असणाऱ्या व्यक्ती कुरूप, दुःखी, उदास किंवा काळजीचे कारण असल्याचे दाखवण्यावर बंदी घातली होती. काळा रंग असणाऱ्या लोकांना दुय्यम स्थानी दाखविले जाईल, अशी कोणतीही जाहिरात दाखवू नये. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. तसा संदेश जाहिरातीतून जाता कामा नये. या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. अमुक-तमुक क्रीम लावा तुम्ही गोरे व्हाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला नोकरी शंभर टक्के मिळेल, असे सर्रास दाखविले जाते. प्रदर्शित होणाऱ्या सर्वाधिक जाहिराती फेअरनेस क्रीमच्या आहेत. शेकडो दशलक्ष डॉलर्सचे फेअरनेस क्रीम दर वर्षी विकले जाते. यावरून गोऱ्या रंगाला किती महत्त्व आहे, हे लक्षात येते. क्रीममुळे रंग तात्पुरता जरी गोरा झाला, तरी त्यामुळे गुणात्मक वाढ होणार आहे का? मग केवळ उत्पादन खपविण्यासाठी कपोतकल्पित कथानक तयार करून, तरुणाईच्या मनावर बिंबवल्या जातात. यातून सावळ्या रंगाच्या माणसांत स्वतःच्या रंगाबाबत न्यूनगंड निर्माण होतो. नेमका हाच विचार पल्लवी साईने केला आणि जाहिरात नाकारली.
तिच्या मते, तुमचा रंग गोरा कसा, असे आपण परदेशातील लोकांना विचारतो का? गोरा रंग त्या प्रदेशाचा आहे, जसा आपला सावळा. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील लोकांचा वेगळा रंग आहे. तेही खूप सुंदर दिसतात. पल्लवीने सांगितल्याप्रमाणे आपण ज्या प्रदेशात राहतो त्या हवामानाचा, मातीचा परिणाम त्या त्या वर्णावर होत असतो, म्हणून त्यांनी स्वतःला कमी का लेखायचे आणि मनात न्यूनगंड का बाळगायचा? उष्ण कटिबंधीय प्रदेशातील लोकांचा वर्ण काळा, सावळा असणार. तो ओढूनताणून गोरा करण्यात काय अर्थ आहे? तात्पुरते गोरा वर्ण जरी केला, तरी तो किती दिवस टिकणार आहे? आणि त्यामुळे हुशारीत नक्कीच वाढ होणार नाही.
रंगाधीष्ठित मानसिकतेमुळेच गोरा रंग असलेली व्यक्ती हुशार, प्रेंझेटेबल वाटते. तिच्यात आत्मविश्वास असतो, असे समजले जाते. त्या समजुतीतून सतत गोऱ्या रंगाविषयीची आसक्ती वाढत गेली. ही आसक्ती केवळ भारतातच आहे असे नाही, तर जगभरात ती दिसते. यथातथा सर्वत्र गोरा रंग प्रमाणभूत मानला जात असताना, लग्नाच्या बाजारपेठेत त्याची किंमत अधिकच वधारली आहे. सर्व बाबतीत सरस असूनही केवळ रंग सावळा असल्याने अनेकींना नकार पचवावे लागले आहेत. आपल्याला याचे फारसे नवल वाटत नाही; त्यामुळे विवाहसंस्थेत छायाचित्र देताना रंग थोडा उजळ दिसेल, याची काळजी घेतली जाते. मुलींप्रमाणे मुलग्यांनाही गोरा रंग हवाहवासा असतो; त्यामुळे त्यांच्यासाठीही फेअरनेस क्रीम आहेत. त्वचा स्वच्छ, तजेलदार दिसावी, आपण छान दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यात चुकीचे काहीच नाही. आपल्या देशाचा, संस्कृतीचा, इतिहासाचा अभिमान बाळगताना आपल्या वर्णाचा, रंगाचा अभिमान मात्र आपण दूर ठेवतो.
शिक्षणामुळे मुलींच्या लग्नाची काळजी करण्याचा काळ जरी मागे पडला असला, तरी लग्नासाठी गोरे होण्याची निकड तशीच राहिली आहे. काळा रंग आहे म्हणून अनेक मुलींना करिअरमध्ये उत्तम असूनही नोकरीच्या ठिकाणी, सासरी, समाजात नाकारले जाते. एवढेच काय चित्रपटात, होर्डिंग्जवर, जाहिरातींत गोऱ्या रंगाच्याच महिला दिसून येतात. हा वाढता वर्णद्वेष पाहून काही वर्षांपूर्वी 'वुमेन ऑफ अर्थ' या एनजीओने 'डार्क इज ब्युटीफूल' नामक अभियान सुरू केले. या एनजीओची संस्थापिका कविता इमन्यूएल म्हणतात, 'गोऱ्या रंगावरून आपला समाज पूर्वग्रहदूषित आहे. हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. याचा महिलांच्या आत्मविश्वासावर थेट परिणाम होतो. आज महिलांची संख्या प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. त्या आपल्या अधिकारांविषयी, हक्कांविषयी जागरूक झाल्या आहेत. स्त्री-पुरुष भेदाभेदावर त्या पेटून उठत आहेत, मग वर्णभेदावर का नाही?' याच विचारातून वर्णभेदाविरोधात त्यांनी अभियान सुरू केले. यासाठी महात्मा गांधीजींचा विचाराचा दाखला दिला. त्या म्हणतात, 'गांधीजी नेहमी म्हणत असत, कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करा. त्या विचारानुसार मी 'ब्लॅक इज ब्युटिफूल' अभियान काही वर्षांपूर्वी सुरू केले. या अभियानात नंदिता दासही नंतर सहभागी झाल्या. नंदिता यांनाही त्यांच्या आय़ुष्यात असे अनेक अनुभव आल्यामुळे त्यांनी या अभियानात सहभागी होऊन वर्णभेदावर जागृती करण्याचे ठरविले.' अगदी त्याप्रमाणेच पल्लवी साई हिने दोन कोटींची जाहिरात नाकारून समाजापुढे आदर्श निर्माण केला. इतरांना उपदेश करण्यापेक्षा पल्लवी साईने स्वतःपासून सुरुवात करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही जागरूकता वाढणे गरेजेचे आहे, तरच वर्णभेद कमी होईल. अन्यथा पल्लवीची बहीण पूजा हिच्याप्रमाणे अनेक तरुणी स्वत:चे आयुष्य रंग गोरा करण्यावरच उधळतील आणि मनात न्यूनगंड बाळगून राहतील. आपला रंग हीच आपली खरी ओळख, असे प्रत्येकाने मानल्यास फेअरनेस क्रीमचा पगडा एक दिवस नक्कीच कमी होईल.
Shraddha.chamke@timesgroup.com