मी आणि मालिका
इतर महिला कलाकारांनी जेथे माती, उन्हामुळे मालिका सोडली होती, त्याच मातीत 'मिश्री मौसी' पाय घट्ट रोवून उभी होती. चिखल, माती, ऊन कशा-कशाचीच पर्वा न करता मी काम करत राहिले. डोक्यावरून हंडा नेतानाही तो भरलेला असायचा. मी इतकी टॅन झाले होते, की कपाळावरची बिंदीही त्वचेवर उमटली होती; पण भूमिकेशी तडजोड करणे मला मान्य नव्हते.
शुभांगी गोखले
दूरदर्शनचा तो सुवर्णकाळ. मी एका प्रसिद्ध मालिकेसाठी दिग्दर्शकाला साहाय्य करीत होते. दुसऱ्या दिवशी मालिकेतील हिरॉइनची एंट्री होणार होती. ती लूना चालवत येते आणि चारचाकी बंद पडलेल्या हिरोला लिफ्ट देते, असा तो सीन होता. त्या अभिनेत्रीने आयत्या वेळी लूना चालविण्यास नकार दिला आणि त्या मुख्य पात्रासाठी माझी निवड झाली. ध्यानीमनी नसताना माझा मालिका प्रवेश झाला. ती मालिका म्हणजे मोहन गोखले अभिनीत 'मि. त्यागी'. हा अनुभव माझ्यासाठी खूप सुखद आणि चांगली सुरुवात असणारा होता. त्यानंतर 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये मला सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. सदाशिव अमरापूरकर यांनी ज्योतिबा फुले यांची भूमिका केली होती. या अतिशय वेगळे महत्त्व असणाऱ्या मालिकेचा एक छोटासा का होईना भाग झाल्याबद्दल मला समाधान आहे. त्यानंतर छोट्या-मोठ्या भूमिका मी करत राहिले. 'डॅडी समझा करो'मधून माझा मालिका प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्याआधी गाजलेल्या 'इधर उधर' या मालिकेच्या सेटवरच 'डॅडी'चे शूटिंग सुरू होतं. त्यातील गाजलेल्या कलाकारांचे नाव त्या सेटशी जोडले गेले होते. 'ही रत्नाजींची (रत्ना पाठक) खोली,' अशा प्रकारे बोलले जायचे. तेव्हा मी निर्धार केला, आपले कामही असे व्हायला हवे, की आपले पात्रही अजरामर झाले पाहिजे. त्या ध्यासाने मी काम केले आणि 'बुआ'चे पात्र लोकप्रियही झाले. त्यानंतरच्या काळात 'दौलत' या देबू देवधर यांच्या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली. तो अनुभवही समृद्ध करणारा होता. हल्ली जमीनदार कुटुंबातील स्त्रिया भरजरी पोशाखात, दागदागिन्यांनी मढलेल्या दाखवितात; मात्र दौलतमध्ये वास्तवाच्या जवळ जाणारी माझी वेशभूषा होती. माझ्या संपूर्ण अभिनयप्रवासात हे तत्त्व मी नेटाने जपले. त्या मालिकेतील एक आठवण विशेष आहे. कोल्हापूरला त्याचे शूटिंग सुरू होते. प्रतीक्षा लोणकर आणि माझ्यावर एक प्रसंग पहाटेच्या वेळी चित्रीत करायचा असल्याचे अचानक ठरले. तेथे पोहोचेपर्यंतच्या प्रवासात ते मोठे संवाद आम्ही अक्षरशः गिळले आणि वन टेक वन शॉट तो प्रसंग चित्रीत झाला. आताच्या काळात आपली इतर व्यवधाने बाजूला ठेवून सलगतेने, झोकून देऊन काम करणारे कलाकार दुर्मिळच. त्यामुळेच मग दृश्ये परिणामकारक न होता तुटक तुटक जाणवतात.
त्यापुढील काळात माझ्याकडे 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका आली. माझ्या आजवरच्या अभिनय वाटचालीत ही मालिका मैलाचा दगड म्हणता येईल. दिग्दर्शक केदार शिंदे यांची संकल्पना खूपच स्पष्ट आणि नावीन्यपूर्ण होती. या वेळी पुन्हा एकदा झीरो पोझिशनवर येऊन मी नव्याने सुरुवात करायचे ठरविले. असे करायला मला नेहमी आवडते. एक प्रेक्षक म्हणून खटकत असलेल्या मालिकांमधील गोष्टी मला टाळायच्या होत्या. केदारनेही मला बरेच स्वातंत्र्य दिले होते. तू या प्रसंगी काय करशील, असेही तो मला विचारे. अगदी संवाद लिहिण्याची मोकळीकही त्याने मला दिली. हे सगळे खूप छान जुळून आले. काही आठवड्यांतच ही मालिका लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली. 'श्यामल' या माझ्या पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. याचे प्रमुख कारण म्हणजे श्यामल आपली वाटायची. ती काठापदराच्या चकचकीत साड्या किंवा भरजरी दागिने घालणारी नव्हती, तर ती अस्सल गृहिणी होती. ती तशी वाटावी, यासाठी मी श्यामलच्या वेशभूषेतही आवर्जून लक्ष घातले. नव्याकोऱ्या साड्या नेसायला स्पष्ट नकार दिला. त्यासाठी मी माझ्या मावशीच्या साड्या औरंगाबादहून मागविल्या. केदारच्या आईच्या, माझ्या आईच्या, मैत्रिणींच्या साड्या मी नेसल्या. माझे साधे; पण वैशिष्ट्यपूर्ण ठिपक्यांचे ब्लाउज श्यामलला अगदी साजेसे होते. केशभूषेच्या बाबतीतही माझे सेटवरच गाजलेले भांडण आहे. माझे केस व्यवस्थित चापून बसवलेले असावेत, असे आमच्या हेअर स्टायलिस्टचे म्हणणे होते. त्याउलट माझी एखादी बट सैलसर किंवा थोडीशी विस्कटलेली असायची. मला श्यामलचे तसेच दिसणे वास्तवाला धरून वाटायचे. तेच नेपथ्याचे. श्यामल एका प्रसंगात कपाट उघडताना दिसणार होती. त्या वेळी काही क्षण का होईना, कपाटातील कपडे प्रेक्षकांना दिसणार होते; त्यामुळे कपाटात कपडे लावून ठेवावेत, असे सांगण्यात आले. ड्रेसदादाने त्या कपाटात आबांचे कुर्ते लावले होते. मला मात्र नुसते कपडे रचलेले पटले नाहीत. श्यामल आणि शेखरच्या खोलीमध्ये आबांचे कपडे नसावेत, या कारणाने मी त्याला विरोध केला. एका स्त्री आपले कपाट जसे लावेल, तसे ते मला हवे होते. त्यातल्या त्यात खास साड्या वर हँगरला लटकवलेल्या, त्याच्या खाली घड्या घातलेल्या साध्या साड्या आणि खाली घरातील कपडे, शेखरचा एखाद-दुसरा शर्ट, असे छान कपाट मी स्वतः लावून घेतले. त्या प्रसंगानंतर किती कटकट असते हिची, असेही माझ्याबाबतीत म्हटले जाऊ लागले. हरकत नाही; पण मला कामात अचूकता हवी असते, हे नक्की.
या मालिकेची सगळी टीमच जमून आली होती. एकमेकांच्या आयुष्यातील काही प्रसंग क्लिक व्हायचे आणि एपिसोडमध्येही मग त्याचा अंतर्भाव केला जायचा. या सगळ्याचे सार म्हणजे या मालिकेचे यश होते. अजूनही यू-ट्यूबवर प्रेक्षक या मालिकेचे भाग पाहतात, ही याचीच पावती आहे.
माझी गाजलेली आणखी एक व्यक्तिरेखा म्हणजे 'लापतागंज' मालिकेतील मिश्री मौसी. हे पात्र उत्तरेकडील होते. मराठी कलाकारांच्या हिंदी उच्चारांवर नेहमी टीका होते. त्यामुळे सामान्यपणे त्यांना हिंदीतही मराठी पात्रेच ऑफर होतात. ही भूमिका त्यासाठीच माझ्यासमोर एक आव्हान होते. 'ये मराठी है, घाटी है,' असले शेरे मला ऐकायचेच नव्हते. आपण आपले नाणे वाजवायचेच असा मी निर्धारच केला. शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये एका संपूर्ण गावाचा सेट उभा केलेला होता. मिश्री मौसी खेड्यातील वाटणे महत्त्वाचे होतं. मी मातीत पाय घालणार नाही, पायाला चिखल लागलेला चालणार नाही, स्कीन टॅन होईल, असे एरवी महिला कलाकारांकडून केले जाणारे नखरे मी अजिबात केले नाहीत. इतर महिला कलाकारांनी जेथे माती, उन्हामुळे मालिका सोडली होती, त्याच मातीत मिश्री मौसी पाय घट्ट रोवून उभी होती. चिखल, माती, ऊन कशाकशाचीच पर्वा न करता मी काम करत राहिले. डोक्यावरून हंडा नेतानाही तो भरलेला असायचा. मी इतकी टॅन झाले होते, की कपाळावरची बिंदीही त्वचेवर उमटली होती; पण भूमिकेशी तडजोड करणे मला मान्य नव्हते. या मेहनतीचे मला फळ मिळाले आणि ही मिश्री मौसी प्रेक्षकांच्या नुसतीच पसंतीस उतरली नाही, तर लोकप्रिय झाली. माझा भाषेचा लहेजा, स्थानिक भाषेची जाण, याला दाद मिळाली. प्रेक्षकांना हे पात्र एवढे अस्सल वाटले, की मी मूळची उत्तर भारतीयच आहे आणि गोखले नामक मराठी माणसाशी लग्न केले आहे, अशी चर्चाही ऐकायला मिळाली. अजूनही या पात्राचा उल्लेख आवर्जून केला जातो. सुरुवातीला सहा महिने नियोजित असलेली ही मालिका सुमारे सहा वर्षे चालली. देशाच्या सुमारे ८० टक्के भागात या हिंदी मालिकेच्या निमित्ताने पोहोचता आले. प्रतिभावान लेखक अश्विनी धीर यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करता आले.
मराठी आणि हिंदी मालिका करताना काही बाबतींत फरक जाणवतो. मराठी मालिका अद्यापतरी वास्तवदर्शी आहेत, किंबहुना तसा प्रयत्न तरी करत आहेत. हिंदीत त्या तुलनेत कट कारस्थाने, नाट्यमयता, चकचकीतपणा अधिक आहे. हिंदीत 'हम है ना' नावाची एक मालिका मी केली. आई आणि मुलाच्या नात्यावर बेतलेले हे कथानक होते. आई हे सर्वस्व असणारा तो मुलगा होता. यातील प्रमुख अशी आईची भूमिका मला मिळाली. काही दिवसांनी ही मालिका मूळ गाभा विसरून कट कारस्थाने आणि भडकपणाकडे झुकली; कारण माझ्याबरोबरचे इतर सगळे हिंदी मालमसालावाले होते. आपण हे का करतो आहोत, असेही मला एका क्षणी वाटू लागले होते.
माझी अलीकडेच प्रदर्शित झालेली मालिका 'काहे दिया परदेस'मधील गौरीची आईही लोकप्रिय झाली. तिचेही वास्तवाच्या जवळ जाणे प्रेक्षकांना भावले. प्रत्यक्ष आयुष्यात एका मुलीची आई असणे हेही भूमिका साकारताना अर्थातच कळत-नकळत कामी आले. पहिल्या रीडिंगच्या वेळेस मी माझा मोठ्या बाह्यांचा खणाचा ब्लाउज आणि काठापदराची मराठमोळी साडी नेसूनच गेले आणि अजय मयेकरला म्हटले, की हाच माझा लूक असेल. त्यानेही हसून संमती दिली आणि टिकली फक्त जरा छोटी करा, अशी सूचना दिली. येथेही पुन्हा मानेवर अंबाडा असावा, यावरून केशरचनाकार आणि माझे मतभेद झाले होते. अंबाड्याचा छानसा विग किंवा उंचवटा दिलेले केस, हे निश्चितच त्या पात्राला शोभणारे नव्हते. मी अंबाड्याला स्पष्ट नकार दिला. या वयातील बहुतांश स्त्रिया वापरतात, तशी आडवी क्लिप लावण्यावर मी ठाम होते. साडीही माझी मीच नेसणार असे सांगितले. जेणेकरून ती ड्रेप केलेली नव्हे, तर नेसलेली आणि खरीखुरी वाटेल. त्यामुळे माझी केशभूषा आणि वेशभूषा मीच डिझाइन केलेली होती. ती मुंबईकर नोकरदार स्त्री दिसायला हवी होती. तसा मी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
असाच एक वेगळा प्रयत्न 'अगं बाई अरेच्चा'च्या वेळेस मी केला होता. त्याच वेळेस 'टिपरे'चेही शूटिंग सुरू होतं. 'टिपरे'मधील माझ्या लुकच्या संपूर्ण विरुद्ध असा लूक 'अगं बाई अरेच्चा'मध्ये होता. ती व्यक्तिरेखा ट्रॅव्हल एजन्सी चालविणाऱ्या उद्योजिकेची होती. साडी आणि चष्मा असा काहीसा लूक आधी ठरविण्यात आलेला होता; मात्र मला ते पटले नाही. मी थेट पार्लर गाठून बॉयकटच करूनच सेटवर पोहोचले. तो लूकच शेवटी सगळ्यांनी निवडून निश्चित केला आणि साडी रद्द होऊन ब्लेझर आले.
आतापर्यंतच्या मालिकाप्रवासात कसदार पात्रे उभे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, त्यामुळेच न पटणाऱ्या अनेक भूमिकांना नकारही दिला. भविष्यातही अनेकविध पैलू समोर आणणाऱ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहीन.
शब्दांकन : श्रद्धा सिदीड
इतर महिला कलाकारांनी जेथे माती, उन्हामुळे मालिका सोडली होती, त्याच मातीत 'मिश्री मौसी' पाय घट्ट रोवून उभी होती. चिखल, माती, ऊन कशा-कशाचीच पर्वा न करता मी काम करत राहिले. डोक्यावरून हंडा नेतानाही तो भरलेला असायचा. मी इतकी टॅन झाले होते, की कपाळावरची बिंदीही त्वचेवर उमटली होती; पण भूमिकेशी तडजोड करणे मला मान्य नव्हते.
शुभांगी गोखले
दूरदर्शनचा तो सुवर्णकाळ. मी एका प्रसिद्ध मालिकेसाठी दिग्दर्शकाला साहाय्य करीत होते. दुसऱ्या दिवशी मालिकेतील हिरॉइनची एंट्री होणार होती. ती लूना चालवत येते आणि चारचाकी बंद पडलेल्या हिरोला लिफ्ट देते, असा तो सीन होता. त्या अभिनेत्रीने आयत्या वेळी लूना चालविण्यास नकार दिला आणि त्या मुख्य पात्रासाठी माझी निवड झाली. ध्यानीमनी नसताना माझा मालिका प्रवेश झाला. ती मालिका म्हणजे मोहन गोखले अभिनीत 'मि. त्यागी'. हा अनुभव माझ्यासाठी खूप सुखद आणि चांगली सुरुवात असणारा होता. त्यानंतर 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये मला सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. सदाशिव अमरापूरकर यांनी ज्योतिबा फुले यांची भूमिका केली होती. या अतिशय वेगळे महत्त्व असणाऱ्या मालिकेचा एक छोटासा का होईना भाग झाल्याबद्दल मला समाधान आहे. त्यानंतर छोट्या-मोठ्या भूमिका मी करत राहिले. 'डॅडी समझा करो'मधून माझा मालिका प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्याआधी गाजलेल्या 'इधर उधर' या मालिकेच्या सेटवरच 'डॅडी'चे शूटिंग सुरू होतं. त्यातील गाजलेल्या कलाकारांचे नाव त्या सेटशी जोडले गेले होते. 'ही रत्नाजींची (रत्ना पाठक) खोली,' अशा प्रकारे बोलले जायचे. तेव्हा मी निर्धार केला, आपले कामही असे व्हायला हवे, की आपले पात्रही अजरामर झाले पाहिजे. त्या ध्यासाने मी काम केले आणि 'बुआ'चे पात्र लोकप्रियही झाले. त्यानंतरच्या काळात 'दौलत' या देबू देवधर यांच्या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली. तो अनुभवही समृद्ध करणारा होता. हल्ली जमीनदार कुटुंबातील स्त्रिया भरजरी पोशाखात, दागदागिन्यांनी मढलेल्या दाखवितात; मात्र दौलतमध्ये वास्तवाच्या जवळ जाणारी माझी वेशभूषा होती. माझ्या संपूर्ण अभिनयप्रवासात हे तत्त्व मी नेटाने जपले. त्या मालिकेतील एक आठवण विशेष आहे. कोल्हापूरला त्याचे शूटिंग सुरू होते. प्रतीक्षा लोणकर आणि माझ्यावर एक प्रसंग पहाटेच्या वेळी चित्रीत करायचा असल्याचे अचानक ठरले. तेथे पोहोचेपर्यंतच्या प्रवासात ते मोठे संवाद आम्ही अक्षरशः गिळले आणि वन टेक वन शॉट तो प्रसंग चित्रीत झाला. आताच्या काळात आपली इतर व्यवधाने बाजूला ठेवून सलगतेने, झोकून देऊन काम करणारे कलाकार दुर्मिळच. त्यामुळेच मग दृश्ये परिणामकारक न होता तुटक तुटक जाणवतात.
त्यापुढील काळात माझ्याकडे 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका आली. माझ्या आजवरच्या अभिनय वाटचालीत ही मालिका मैलाचा दगड म्हणता येईल. दिग्दर्शक केदार शिंदे यांची संकल्पना खूपच स्पष्ट आणि नावीन्यपूर्ण होती. या वेळी पुन्हा एकदा झीरो पोझिशनवर येऊन मी नव्याने सुरुवात करायचे ठरविले. असे करायला मला नेहमी आवडते. एक प्रेक्षक म्हणून खटकत असलेल्या मालिकांमधील गोष्टी मला टाळायच्या होत्या. केदारनेही मला बरेच स्वातंत्र्य दिले होते. तू या प्रसंगी काय करशील, असेही तो मला विचारे. अगदी संवाद लिहिण्याची मोकळीकही त्याने मला दिली. हे सगळे खूप छान जुळून आले. काही आठवड्यांतच ही मालिका लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली. 'श्यामल' या माझ्या पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. याचे प्रमुख कारण म्हणजे श्यामल आपली वाटायची. ती काठापदराच्या चकचकीत साड्या किंवा भरजरी दागिने घालणारी नव्हती, तर ती अस्सल गृहिणी होती. ती तशी वाटावी, यासाठी मी श्यामलच्या वेशभूषेतही आवर्जून लक्ष घातले. नव्याकोऱ्या साड्या नेसायला स्पष्ट नकार दिला. त्यासाठी मी माझ्या मावशीच्या साड्या औरंगाबादहून मागविल्या. केदारच्या आईच्या, माझ्या आईच्या, मैत्रिणींच्या साड्या मी नेसल्या. माझे साधे; पण वैशिष्ट्यपूर्ण ठिपक्यांचे ब्लाउज श्यामलला अगदी साजेसे होते. केशभूषेच्या बाबतीतही माझे सेटवरच गाजलेले भांडण आहे. माझे केस व्यवस्थित चापून बसवलेले असावेत, असे आमच्या हेअर स्टायलिस्टचे म्हणणे होते. त्याउलट माझी एखादी बट सैलसर किंवा थोडीशी विस्कटलेली असायची. मला श्यामलचे तसेच दिसणे वास्तवाला धरून वाटायचे. तेच नेपथ्याचे. श्यामल एका प्रसंगात कपाट उघडताना दिसणार होती. त्या वेळी काही क्षण का होईना, कपाटातील कपडे प्रेक्षकांना दिसणार होते; त्यामुळे कपाटात कपडे लावून ठेवावेत, असे सांगण्यात आले. ड्रेसदादाने त्या कपाटात आबांचे कुर्ते लावले होते. मला मात्र नुसते कपडे रचलेले पटले नाहीत. श्यामल आणि शेखरच्या खोलीमध्ये आबांचे कपडे नसावेत, या कारणाने मी त्याला विरोध केला. एका स्त्री आपले कपाट जसे लावेल, तसे ते मला हवे होते. त्यातल्या त्यात खास साड्या वर हँगरला लटकवलेल्या, त्याच्या खाली घड्या घातलेल्या साध्या साड्या आणि खाली घरातील कपडे, शेखरचा एखाद-दुसरा शर्ट, असे छान कपाट मी स्वतः लावून घेतले. त्या प्रसंगानंतर किती कटकट असते हिची, असेही माझ्याबाबतीत म्हटले जाऊ लागले. हरकत नाही; पण मला कामात अचूकता हवी असते, हे नक्की.
या मालिकेची सगळी टीमच जमून आली होती. एकमेकांच्या आयुष्यातील काही प्रसंग क्लिक व्हायचे आणि एपिसोडमध्येही मग त्याचा अंतर्भाव केला जायचा. या सगळ्याचे सार म्हणजे या मालिकेचे यश होते. अजूनही यू-ट्यूबवर प्रेक्षक या मालिकेचे भाग पाहतात, ही याचीच पावती आहे.
माझी गाजलेली आणखी एक व्यक्तिरेखा म्हणजे 'लापतागंज' मालिकेतील मिश्री मौसी. हे पात्र उत्तरेकडील होते. मराठी कलाकारांच्या हिंदी उच्चारांवर नेहमी टीका होते. त्यामुळे सामान्यपणे त्यांना हिंदीतही मराठी पात्रेच ऑफर होतात. ही भूमिका त्यासाठीच माझ्यासमोर एक आव्हान होते. 'ये मराठी है, घाटी है,' असले शेरे मला ऐकायचेच नव्हते. आपण आपले नाणे वाजवायचेच असा मी निर्धारच केला. शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये एका संपूर्ण गावाचा सेट उभा केलेला होता. मिश्री मौसी खेड्यातील वाटणे महत्त्वाचे होतं. मी मातीत पाय घालणार नाही, पायाला चिखल लागलेला चालणार नाही, स्कीन टॅन होईल, असे एरवी महिला कलाकारांकडून केले जाणारे नखरे मी अजिबात केले नाहीत. इतर महिला कलाकारांनी जेथे माती, उन्हामुळे मालिका सोडली होती, त्याच मातीत मिश्री मौसी पाय घट्ट रोवून उभी होती. चिखल, माती, ऊन कशाकशाचीच पर्वा न करता मी काम करत राहिले. डोक्यावरून हंडा नेतानाही तो भरलेला असायचा. मी इतकी टॅन झाले होते, की कपाळावरची बिंदीही त्वचेवर उमटली होती; पण भूमिकेशी तडजोड करणे मला मान्य नव्हते. या मेहनतीचे मला फळ मिळाले आणि ही मिश्री मौसी प्रेक्षकांच्या नुसतीच पसंतीस उतरली नाही, तर लोकप्रिय झाली. माझा भाषेचा लहेजा, स्थानिक भाषेची जाण, याला दाद मिळाली. प्रेक्षकांना हे पात्र एवढे अस्सल वाटले, की मी मूळची उत्तर भारतीयच आहे आणि गोखले नामक मराठी माणसाशी लग्न केले आहे, अशी चर्चाही ऐकायला मिळाली. अजूनही या पात्राचा उल्लेख आवर्जून केला जातो. सुरुवातीला सहा महिने नियोजित असलेली ही मालिका सुमारे सहा वर्षे चालली. देशाच्या सुमारे ८० टक्के भागात या हिंदी मालिकेच्या निमित्ताने पोहोचता आले. प्रतिभावान लेखक अश्विनी धीर यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करता आले.
मराठी आणि हिंदी मालिका करताना काही बाबतींत फरक जाणवतो. मराठी मालिका अद्यापतरी वास्तवदर्शी आहेत, किंबहुना तसा प्रयत्न तरी करत आहेत. हिंदीत त्या तुलनेत कट कारस्थाने, नाट्यमयता, चकचकीतपणा अधिक आहे. हिंदीत 'हम है ना' नावाची एक मालिका मी केली. आई आणि मुलाच्या नात्यावर बेतलेले हे कथानक होते. आई हे सर्वस्व असणारा तो मुलगा होता. यातील प्रमुख अशी आईची भूमिका मला मिळाली. काही दिवसांनी ही मालिका मूळ गाभा विसरून कट कारस्थाने आणि भडकपणाकडे झुकली; कारण माझ्याबरोबरचे इतर सगळे हिंदी मालमसालावाले होते. आपण हे का करतो आहोत, असेही मला एका क्षणी वाटू लागले होते.
माझी अलीकडेच प्रदर्शित झालेली मालिका 'काहे दिया परदेस'मधील गौरीची आईही लोकप्रिय झाली. तिचेही वास्तवाच्या जवळ जाणे प्रेक्षकांना भावले. प्रत्यक्ष आयुष्यात एका मुलीची आई असणे हेही भूमिका साकारताना अर्थातच कळत-नकळत कामी आले. पहिल्या रीडिंगच्या वेळेस मी माझा मोठ्या बाह्यांचा खणाचा ब्लाउज आणि काठापदराची मराठमोळी साडी नेसूनच गेले आणि अजय मयेकरला म्हटले, की हाच माझा लूक असेल. त्यानेही हसून संमती दिली आणि टिकली फक्त जरा छोटी करा, अशी सूचना दिली. येथेही पुन्हा मानेवर अंबाडा असावा, यावरून केशरचनाकार आणि माझे मतभेद झाले होते. अंबाड्याचा छानसा विग किंवा उंचवटा दिलेले केस, हे निश्चितच त्या पात्राला शोभणारे नव्हते. मी अंबाड्याला स्पष्ट नकार दिला. या वयातील बहुतांश स्त्रिया वापरतात, तशी आडवी क्लिप लावण्यावर मी ठाम होते. साडीही माझी मीच नेसणार असे सांगितले. जेणेकरून ती ड्रेप केलेली नव्हे, तर नेसलेली आणि खरीखुरी वाटेल. त्यामुळे माझी केशभूषा आणि वेशभूषा मीच डिझाइन केलेली होती. ती मुंबईकर नोकरदार स्त्री दिसायला हवी होती. तसा मी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
असाच एक वेगळा प्रयत्न 'अगं बाई अरेच्चा'च्या वेळेस मी केला होता. त्याच वेळेस 'टिपरे'चेही शूटिंग सुरू होतं. 'टिपरे'मधील माझ्या लुकच्या संपूर्ण विरुद्ध असा लूक 'अगं बाई अरेच्चा'मध्ये होता. ती व्यक्तिरेखा ट्रॅव्हल एजन्सी चालविणाऱ्या उद्योजिकेची होती. साडी आणि चष्मा असा काहीसा लूक आधी ठरविण्यात आलेला होता; मात्र मला ते पटले नाही. मी थेट पार्लर गाठून बॉयकटच करूनच सेटवर पोहोचले. तो लूकच शेवटी सगळ्यांनी निवडून निश्चित केला आणि साडी रद्द होऊन ब्लेझर आले.
आतापर्यंतच्या मालिकाप्रवासात कसदार पात्रे उभे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, त्यामुळेच न पटणाऱ्या अनेक भूमिकांना नकारही दिला. भविष्यातही अनेकविध पैलू समोर आणणाऱ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहीन.
शब्दांकन : श्रद्धा सिदीड