मुंबई टाइम्स टीम
एखाद्याबरोबर असलेलं मैत्रीचं नातं तोडणं हे जणू ब्रेकअप समान असतं. ती कोणासाठीही ही गोष्ट सोपी नसते; कारण नातं तुटताना एकजण दुसऱ्यापेक्षा नक्कीच जास्त दुखावला जातो. मैत्री ही आयुष्यभर टिकते असं आपल्याला वाटत असतं; मात्र कधीकधी काही गोष्टी योग्य प्रकारे घडून येत नाहीत. मैत्रीमध्ये तुम्ही समोरच्याचा जास्त विचार करत असाल, कोणाचा अहंकार आड येत असेल, तुमचा वारंवार अपमान होत असेल किंवा मित्राच्या यशाचा तुम्हाला हेवा वाटत असेल, मैत्री तोडण्यामागे अशी अनेक कारणं असू शकतात. कारण काही असो, जर अशी मैत्री तुम्हाला तणावपूर्ण वाटत असेल, तर मन:शांतीसाठी तुम्हाला नात्याला पूर्णविराम द्यावा लागेल. कोणालाही नकारात्मक विचार प्रसृत करणारी मैत्री नको असते. खूप प्रयत्न करूनही तुमचं नातं टिकत नसेल, तर आनंदानं दूर जाणं हाच पर्याय आहे असं समजा. त्यासाठी काही पर्याय आजमावता येतील.
प्रत्यक्ष भेटून बोला- तुमची मैत्री खूप वर्षांपूर्वीची आहे; पण एकमेकांचा निरोप घेताना प्रत्यक्ष भेटा. तुम्ही एकत्र घालवलेल्या वर्षांना मान देत थोडासा वेळ काढलाच पाहिजे. अशी एखादी जागा शोधा तिथे तुम्ही मनातलं सगळं व्यक्त करू शकाल. अशा वेळी भावनाविवश व्हायला होतं, म्हणूनच ती जागा गर्दीपासून दूर असेल याची काळजी घ्या. हॉटेल्स ,रेस्तराँमधे कमी गर्दी असलेली वेळ निवडा.
भेटणं शक्य नसलं तर फोन करा- तुम्ही दोघं दूर असाल किंवा काही कारणास्तव भेटणं शक्य नसेल, तर फोन करून बोला. मोठे मेसेज करणं योग्य नाही. कितीही चांगला आणि मुद्देसुद मेसेज लिहिला, तरी तो संपूर्ण वाचला जाईलच याची शाश्वती नसते. पुन्हा त्यातून समोरचा नक्की काय अर्थ काढेल, हेही सांगता येत नाही. त्यापेक्षा एक वेळ ठरवा आणि चर्चा करा. तुम्हा दोघांना स्वतःची मतं व्यवस्थित मांडता येतील. आरोप, प्रत्यारोप होणार असतील, तर त्यावर उत्तरही देता येईल.
अबोला संपवू नका- तुम्ही दोघंही एकमेकांशी बऱ्याच काळापासून बोलत नसाल, तर तो अबोला संपवू नका. अबोल्यामुळे मैत्रीतून दूर जाणं सोपं होतं. तसं केल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत; पण हाच चांगला मार्ग होऊ शकतो. काही वर्षांनंतर तुम्ही त्या नात्यामधून बाहेर पडाल. आठवड्यातून तीनवेळा बोलत असाल, तर बोलणं हळूहळू कमी करा.
एकमेकांवर आरोप करू नका- मैत्री ही आनंदानं संपवायची असं तुम्ही एकदा ठरवलं, की शेवटच्या टप्प्यात एकमेकांवर आरोप करू नका. भूतकाळातील गोष्टी उकरून काढल्यामुळे मैत्रीचा शेवट काही वेगळाच ठरू शकतो. ज्या कारणांमुळे तुमचं जमलं नाही, त्यांवर चर्चा करा. समोरच्यापासून कारणं लपवू नका. त्यावर भाष्य करताना भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या.
आणखी एक संधी देऊन बघा- मित्र आणखी एक संधीची मागणी करत असेल, तर त्याचा एकदा विचार करा. तो खरोखर सकारात्मक असेल आणि नातं पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर एक संधी देऊन बघा. अशावेळी एखादी अडचण असल्यास, ती योग्य प्रकारे हाताळा. जुन्या मित्रांशी नव्यानं मैत्री करणं कठीण होऊ शकतं. ही मैत्री टिकेल याची काळजी घ्या.