अ‍ॅपशहर

व्हर्च्युअलचाच आधार का?

आपल्या समोर असलेल्या व्यक्तीसोबत संवाद न साधता व्हर्च्युअल दुनियेतच सगळे रमू लागलेत. मग कधी नैराश्य आल्याने किंवा भावनांची मनात कोंडी झाल्याने कठोर पाऊल उचललं जातं आणि त्यावेळीही सोशल मीडियाचा आधार घेतला जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

शब्दुली कुलकर्णी | Maharashtra Times 18 May 2017, 2:28 am
आपल्या समोर असलेल्या व्यक्तीसोबत संवाद न साधता व्हर्च्युअल दुनियेतच सगळे रमू लागलेत. मग कधी नैराश्य आल्याने किंवा भावनांची मनात कोंडी झाल्याने कठोर पाऊल उचललं जातं आणि त्यावेळीही सोशल मीडियाचा आधार घेतला जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what is depression
व्हर्च्युअलचाच आधार का?


गेल्या काही दिवसांपासून रोहन खूप उदास होता. मोठ्या उत्साहानं त्यानं सुरू केलेलं स्टार्टअप चालत नव्हतं. कमी वयात आलेलं हे अपयश पचवता न आल्याने त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. मनातली ही घालमेल त्यानं आधी मित्र-मैत्रिणींसमोर मांडली. पण बहुतेकांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही. अखेर नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या रोहननं फेसबुकवर, ‘मी आत्महत्या करणार आहे’ अशी पोस्ट टाकली. विशेष म्हणजे या पोस्टला पुढच्या दहा-पंधरा मिनिटांतच भरपूर लाइक्स मिळाल्या. दरम्यान रोहन आत्महत्येचं पाऊल उचललं.

रोहनचं हे एक उदाहरण झालं. पण अशीच काही उदाहरणं आपल्या आजुबाजूला घडत असतात. ‘ढोलताशे’ सिनेमाचे निर्माते अतुल तपकीर यांनीही नुकतंच असंच पाऊल उचललं. अपयश आणि विस्कटलेलं खासगी आयुष्य यामुळे हे पाऊल उचलत असल्याचं अतुलनं त्याच्या एफबी पोस्टमध्ये म्हटलं होतं. याआधी दीपक कुमार या इंजिनीअरनं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या सगळ्या प्रकाराचं फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंगही केलं. या सगळ्यांच्या बाबतीतलं एक साम्य म्हणजे निराशेनं ग्रासलेलं असताना, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी समोर कुणीच नसल्यानं त्यांनी अखेर सोशल मीडियाचा आधार घेतला.

आपल्या समोर असलेल्या व्यक्तीसोबत संवाद न साधता व्हर्च्युअल दुनियेतच सगळे रमू लागलेत. मग कधी नैराश्य आल्याने किंवा भावनांची मनात कोंडी झाल्याने कठोर पाऊल उचललं जातं आणि त्यावेळीही सोशल मीडियाचा आधार घेतला जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे माणसाच्या भावना बोथट झाल्या असल्याचं दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा असा सल्लाही दिला जातोय.

सोशल मीडिया हे सध्या सगळ्यांच्या हातातलं खेळणं झालंय. नैराश्याने ग्रासलेल्या माणसाला त्याच्या भावना कोणासमोर तरी मांडायच्या असतात. मग सोशल मीडियाचा पर्याय निवडला जातो. पण या माध्यमात तितकंसं गांभीर्य राहिलेलं नाही. तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती तुम्हाला काही सांगू इच्छित असेल तर त्याला जरुर मदतीचा हात द्या.
डॉ. सागर मुंदडा, मनोचिकित्सक

मनाची झालेली कोंडी, व्यथा कोणासमोर तरी मांडायची असते. पण तो आधार, मदतीचा हात कोणीच द्यायला नसतं. म्हणून सोशल मीडियावर अशाप्रकारे भावना व्यक्त केल्या जातात. पण मनातली घालमेल मांडण्यासाठी सोशल मीडिया हे व्यासपीठ नव्हे. याचा वापर शक्य तितका मर्यादीत असावा.
सोनली पाटणकर, रिस्पॉन्सिबल नेटिझम

लाइक्सचा संवेदनाशून्य खेळ
सोशल मीडियावर कुणी मदत मागणारा मेसेज किंवा पोस्ट टाकली तर त्याची आधी खिल्ली उडवली जाते किंवा अगदी भावनाशून्य मनाने ती पोस्ट लाइक केली जाते हे चित्र हल्ली सर्रास बघायला मिळतं. इतक्या गंभीर गोष्टींनाही लाइक करण्याला काय म्हणावं, असा प्रश्न विचारला जातोय. कुणी काय पोस्ट केली आहे आणि आपण त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे, असं तज्ज्ञ म्हणतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज