म. टा. वृत्तसेवा, जामखेड जामखेड दुहेरी हत्याकांडाचा मूख्य सूत्रधार उल्हास माने, मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड व विजय आसाराम सावंत या तीन जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वरील तीनही आरोपींना यापूर्वी १० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. या दरम्यान चौकशीत दोन पिस्तूल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांना आरोपींकडून मिळाली आहे. गुरुवारी (१० मे) दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर केले असता, दुहेरी खुनात वापरण्यात आलेले पिस्तूल व त्याला लागणाऱ्या गोळ्या आरोपींनी कोठून आणल्या याचा व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील भोकरे यांच्या मदतीने अॅड. एस. एम. नागरगोजे यांनी न्यायालयासमोर केली. त्यानुसार जामखेडचे न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सपकाळ यांनी वरील तीनही आरोपींची पोलिस कोठडी १५ मे पर्यंत वाढविली. याच दरम्यान, आरोपी कैलास माने पोलिस कोठडीत आसताना आजारी पडल्याने औषधोपचारासाठी पूणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. परंतु, ७ मे रोजी पोलिस कोठडी संपूनही औषधोपचार सुरू असल्याने त्याला हजर न केल्याने गुरुवारी (१० मे) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या वेळी न्यायालयाच्या आवारात पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हत्याकांडातील तीन आरोपींना १५ मे पर्यंत कोठडी
म टा...
Maharashtra Times 11 May 2018, 4:00 am