खासदार डॉ. विखेंचे अभिनेत्री सय्यद यांना स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, नगर
'नगर तालुक्यातील गुंडेगावच्या सभेत 'देखणा माणूस' शब्द मी उच्चारला आहे. पण यामुळे कोणाला दुःख झाले असेल तर हे शब्द मी मागे घेतो', असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी येथे दिले. 'देखणी महिला किंवा स्त्री असा शब्दप्रयोग मी त्या भाषणात केला नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो', असेही त्यांनी सांगितले.
गुंडेगाव (ता. नगर) येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना विखे यांनी 'देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे', असे वक्तव्य केले होते. त्याला सय्यद यांनी आक्षेप घेतला व यावर नगर येथे बोलताना डॉ. विखेंनी माफी मागितली नाही तर महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. त्यावर डॉ. विखेंनी सोमवारी स्पष्टीकरण केले. 'मी देखणा माणूस असा शब्दप्रयोग केला होता, देखणी महिला असे म्हटलो नव्हतो. माता-भगिनींविषयी मला आदर आहे, तसे संस्कार माझ्यावर आहेत. एवढ्या वर्षांच्या राजकारणात माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर संस्कार नाहीत, असा आरोप कधीच झाला नाही. देखणा माणूस आमचे कार्यकर्ते बाळासाहेब हराळ हेसुद्धा असू शकतात. तेही स्मार्ट आहेत. जीन्स घालून फिरत असतात; मात्र, माझ्या भाषणामुळे कोणाला दु:ख झाले असेल तर मी माझे ते शब्द मागे घेतो. आपण हे दीपालीताईंना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो. स्त्री जातीचा किंवा कोणाच्या नावाचाही उल्लेख आपण केला नव्हता; मात्र, आपल्या शब्दामुळे कोणाला दु:ख होत असेल तर ते मागे घेण्याचा मोठेपणा आम्ही दाखवितो,' असे ते म्हणाले.
मलाच तो अधिकार
'साकळाई योजनेबाबत खासदार म्हणून वक्तव्य करण्याचा अधिकार मलाच आहे. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या योजनेसाठी तीनवेळा बैठका घेतल्या आहेत. पण, मला या श्रेयवादातही पडायचे नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या योजनेच्या सर्वेक्षण कामासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे व त्या कामाच्या वर्कऑर्डरही येत्या एक-दोन दिवसांत निघणार आहेत', असे डॉ. विखे यांनी आवर्जून स्पष्ट केले.
--
निवडणुकीनंतर उड्डाणपूल पिलर
नगर शहरातील उड्डाणपुलाचा किमान एकतरी पिलर (खांब) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी उभा राहील, असा दावा डॉ. विखेंनी मागे केला होता. मात्र, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना, 'विधानसभा निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आत असा पिलर उभा राहील', असे स्पष्ट केले. 'या पुलासाठी काही खासगी जागांचे संपादन करून त्यावर 'उड्डाणपूल आरक्षण' टाकण्याच्या नगर रचना विभागाच्या प्रक्रियेला वेळ लागला आहे. सुमारे ८० जागांचे हे भूसंपादन आहे. या प्रक्रियेनंतर व संबंधित जागेच्या उताऱ्यावर उड्डाणपुलाचे आरक्षण पडल्यावर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने नुकतेच सुमारे १८ कोटी रुपयेही महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम होणारच आहे', असेही त्यांनी स्पष्ट केले.
--