म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेत नगर जिल्ह्यात ६८ लाख १४ हजार रोपे लागवड करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत २१ कोटी ८९ लाख रोपे लागवड करण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत रोपे लागवड करण्यात येणार आहे.
यंदा राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेस १ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यासाठी १ कोटी १७ लाख ६३ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. यामध्ये नगर व संगमनेर वन विभाग आणि सामाजिक वनीकरण या तीन विभागांस ६२ लाख तर अन्य सरकारी विभागांना ५५ लाख ६३ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या विभागांकडून रोपे लागवड केली जात आहे.
रोपे लागवड केल्यानंतर याबाबत माहिती ऑनलाइन द्यावी लागणार आहे. जिल्ह्यात १० जुलैपर्यंत वन विभाग आणि अन्य सरकारी विभागांकडून १३ लाख ७० हजार रोपे लागवड करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मोहिमेत सरकारी विभाग पिछाडीवर राहिले आहेत. राज्यभरात आतापर्यंत २१ कोटी ८९ लाखांपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यंदा वृक्ष लागवड मोहीम सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोपांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही.