म. टा. प्रतिनिधी, नगर
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत आता नव्याने २२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांची निवड आधीच करण्यात आली होती. यामध्ये नगर जिल्ह्यातील तीन गावांचा समावेश आहे.
राज्यातील ग्रामीण भागात राज्य व केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध सरकारी योजना गावांमध्ये राबविण्यात येत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत केली आहे. या समितीकडून गावांची निवड केली जाते. या समितीस पहिल्या टप्प्यात शंभर गावे निवडण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार गेल्या आठ वर्षांत समितीने ७६ गावांची निवड केली होती. त्यानंतर आता पुन्हा २२ गावांची निवड केली. या गावांना या योजनेत आता समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील तीन गावे आहेत. कर्जत तालुक्यातील परीटवाडी, राहुरी तालुक्यातील वरवंडी व दिग्रस, तसेच पारनेर तालुक्यातील भाळवणी या गावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागपूर, नाशिक, वर्धा, परभणी, पुणे, चंद्रपूर, जालना, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रायगड आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी एक, सातारा व बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तसेच यवतमाळ जिल्ह्यातील चार गावांचा समावेश आहे.