जॉगिंग करीत गोळा केले प्लास्टिक; अधिकाऱ्यांचाही सहभाग
म. टा. प्रतिनिधी, नगर
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीदिनी बुधवारी नगरमध्ये 'स्वच्छता जागर' झाला. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भल्या सकाळी रस्त्यावरून जॉगिंग करीत रस्त्यांच्या कडेला पडलेले प्लास्टिक गोळा केले. शहरातील आठही रस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात आली. या निमित्ताने काही संस्थांनी प्लास्टिक मुक्तीवर पथनाट्येही सादर केली. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छता जनजागृती रॅलीही निघाल्या होत्या.
महापालिका प्रशासनाद्वारे बुधवारी (२ ऑक्टोबर) शहरातील आठ रस्त्यांच्या कडेला पडलेले प्लास्टिक संकलित केले गेले. यासाठी 'फ्लॉग रन' मोहीम हाती घेण्यात आली होती. व्यायामानिमित्त पळताना वा व्यायाम करताना रस्त्याच्या कडेला पडलेले प्लास्टिक नागरिकांनीही संकलित करून मनपा कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजता वाडिया पार्क क्रीडा संकुलाजवळील महात्मा गांधीजींच्या व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर फ्लॉग रन सुरू करण्यात आली. येथून जुनी महापालिका, पंचपीर चावडी, माळीवाडा, टिळक रस्ता या मार्गाने फ्लॉग रन झाली. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह उपायुक्त सुनील पवार व डॉ. प्रदीप पठारे व मनपा अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले होते. या मुख्य फ्लॉग रननंतर सावेडीतील भिस्तबाग चौक-पाइपलाइन रस्ता-एकवीरा चौक व टीव्ही सेंटर-कुष्ठधाम रस्ता-भिस्तबाग चौक या रस्त्यांवर, मध्य नगर शहरातील चौपाटी कारंजा-चितळे रस्ता-तेलीखुंट व माणिकचौक-कापड बाजार-तेलीखुंट, तसेच सिव्हील हॉस्पिटल-सर्जेपुरा-तेलीखुंट, रामचंद्र खुंट-तेलीखुंट-कापड बाजार, कोठी-महात्मा फुले चौक आणि केडगाव वेस ते देवी रोड या रस्त्यांवर ही प्लास्टिक संकलन मोहीम प्रभाग समित्यांद्वारे राबवण्यात आली. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे श्रमदानातून कचरा स्वच्छता मोहीमही झाली. फ्लॉग रन व श्रमदानातून स्वच्छता मोहिमेत संकलित झालेले प्लास्टिक मनपाच्या घंटागाड्यांतून सावेडी कचरा डेपोवर पाठवण्यात आले.
मनपाच्या शाळा व खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची स्वच्छता जनजागृती रॅली झाली. केडगाव, सावेडी, दिल्ली गेटसह विविध भागांत स्वच्छता संदेश लिहिलेले सेल्फी पॉइंट करण्यात आले होते. तेथे थांबून मोबाइलवर आपली छबी टिपण्यात तरुणाई दंग झाली होती. ठिकठिकाणी पथनाट्यांद्वारे स्वच्छता जागृती करण्यात आली. मनपाद्वारे नागरिकांना कापडी पिशव्यांचेही वितरण करण्यात आले.
.................