महिलांचे पाणी वाहतुकीसाठीचे श्रम कमी होणार
म. टा. प्रतिनिधी, नगर
उन्हाळ्यात डोक्यावर हंडे घेऊन दूरवर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिलांचा त्रास कमी करण्यासाठी अकोले तालुक्यात बिनचाकाच्या गाड्याचा वापर केला जात आहे. लाकडापासून तयार करण्यात आलेला हा गाडा बैलांच्या सहाय्याने ओढला जातो. यामुळे महिलांचे कमी होण्यास मदत झाली आहे.
बैलगाडी तयार करणे अगर विकत घेणे, या आदिवासांनी परवडत नाही. शिवाय छोट्या कामांसाठी उपयुक्त ठरणारे आवजार म्हणून असा बिनचाकाचा गाडा तयार केला जात असल्याचे आढळून येते. हा लाकडी गाडा तयार करण्यासाठी जांभूळ, खैर सादडा, बाभूळ, पाणी वाहतूक; तसेच लाकूडफाटा, वजनी वस्तू नेण्यासाठी ही या गाड्याचा उपयोग केला जातो.
अकोले तालुक्यातील डोंगराळ आणि आदिवासी भागातील महिला व माणसे पाण्यासाठी चारही दिशा भटकत असतात. पिण्याचे आणि जनावरांचे पाणी हा प्रश्न त्यांच्यासाठी नित्याचा झाला आहे. रोज पाण्याच्या शोधात जनता दूर खोल नाल्यात असलेल्या पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. निसर्गाने जसे या भागात भरपूर पाऊस दिला. तसे पाणीही दिले. मात्र, ते पाणी हिरावूनही घेतले आहे. प्रचंड उतार असलेल्या जमिनी, डोंगराळ भाग यातून पडलेले पावसाचे पाणी पावसाळ्यातच निघून जाते. अशा परिस्थिती उन्हाळ्यात पाणी वाहतुकीचा महिलांनाच त्रास सहन करावा लागतो. पाणी वाहण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी तयार केलेला पाणी वाहण्यासाठीचा बिनचाकाचा लाकडी गाडा आता सर्वत्र पाणी वाहताना दिसत आहे. पाणी गावापासून दूर असल्याने डोक्यावर वाहनेही शक्य नाही. आदिवासी भागातील लोक बहुतेक करून झापावर, वाड्या वस्त्यावर, शेतावर राहिला गेलेली आहे. त्याठिकाणी दैनंदिन लागणारे पाणी आणि जनावरांसाठी लागणारे वाहतुकीस मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यावर मार्ग म्हणून बैलजोडीच्या सहाय्याने गावठी पद्धतीने तयार केलेल्या बिनचाकाच्या गाड्यावर ड्रममध्ये पाणी भरून ते घरोघरी नेले जाते.
कोट
महिलांचे श्रम कमी करण्यासाठी हा गाडा नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. अशा कलाकारांना शोधून त्यांचा कौशल्य विकास करण्याची गरज आहे. गावोगावी असे भन्नाट इंजिनियर आपल्याला सापडतात, जे परिस्थितीवर मात करून त्यांच्या पातळीवर असे विविध अवजारे, वस्तू तयार करत असतात.
-जितीन साठे, बायफ विभागीय अधिकारी, नाशिक