राहुरी : कांद्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बुधवारी राहुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
कांदा निर्यात बंदीविरोधात मगळवारी (१ ऑक्टोबर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ नगर-मनमाड राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलकांनी केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारविरोधी घोषणा देत निषेध केला होता. नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे (रा. टाकळीमिया), प्रकाश बाबासाहेब देठे (रा. खुडसरगाव) व इतर पाच ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रवीण मकासरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डी. बी. जाधव हे करीत आहेत. सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने दर कोसळले असून नुकसान होत असल्याने शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी संघटना सरकारचे लक्ष वेधण्यासाठी झटत असताना त्यांच्यावरच हेतुत गुन्हे दाखल केले जात असल्याने सत्ताधाऱ्यांविरोधीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.