अ‍ॅपशहर

अतिक्रमणविरोधी कारवाईत अर्धे गाव झाले जमीनदोस्त, गावकरी म्हणतात...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात प्रशासनानं केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत जवळपास अर्धे गाव जमीनदोस्त झाले आहे.

Edited byगणेश कदम | Lipi 10 Jan 2022, 10:38 am
अहमदनगर: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील गायरानावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने एक दोन नव्हे तर तब्बल सव्वाशेहून अधिक घरे जमीनदोस्त करण्यात आल्याने अर्धे गावच होत्याचे नव्हते झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Dhondwadi, Kopargaon
धोंडवाडीतील अतिक्रमणांवर बुलडोझर


कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे १३३ कुटुंबांनी गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पक्की घरे उभारली होती. काहींनी तर आलिशान बंगले देखील बांधले होते. यात काही कुटुंब ५० वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्यास होती. मात्र या अतिक्रमणाच्या विरोधात गावातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली. गायरान जमिनी नियमित करता येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने धोंडेवाडीतील तब्बल ४५० ते ५०० लोकवस्ती असलेली १३३ घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली आहेत.

वाचा: कमाल झाली! बिबट्या गायीला घाबरला, कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला!

आम्हाला न्यायलायचा आदेश मान्य आहे. मात्र गावातील दोन गटांचे भांडण आणि काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आमच्यावर ही वेळ आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. काही कुटुंब भूमिहीन असून शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी या कुटुंबांनी केली आहे. मात्र दोन तीन पिढ्या वास्तव्य केलेली घरे डोळ्यासमोर पाडली जात असताना अनेकांना गहिवरून आले होते.
वाचा: जळगाव, भुसावळमधील नगरसेवकांची बंडखोरी भाजपच्या जिव्हारी, गिरीश महाजन म्हणाले...

दोन गटातील भांडणांमुळे हा विषय न्यायालयात गेला आणि त्याचा फटका सव्वाशेहून अधिक कुटुंबांना बसला अशी चर्चा गावात आहे. मात्र या प्रकारणातील याचिकाकर्ते वाल्मिक वाकचौरे यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ही अतिक्रमणे बेकायदेशीर होती. त्यामुळे मी न्यायालयात गेलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज