अ‍ॅपशहर

हॅलो, मोबाईल हरवलाय? कित्येकांना फोन, पोलिसांच्या सरप्राईजनंतर 'त्या' लोकांनी आनंदाने उड्या मारल्या!

नागरिकांना आवाहन करून आपले मोबाईल परत घेऊन जाण्यास सांगितले. ओळख पटवून त्यांना ते परत करण्यात आले. नगर पोलिसांच्या विशेष मोहिमेचं सर्व नगरकर कौतुक करत आहेत.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2023, 9:26 pm
अहमदनगर : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. शिवाय अनेकदा पोलिसही याची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात. मात्र, अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, कोतवाली पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar police find out the stolen mobile phones and returned them to the citizens
अहमदनगर पोलिसांचं सरप्राईज


नगरच्या कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल शोधून काढून तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत.

कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल ही नागरिकांसाठी महत्वाचा विषय असतो. चोरी गेल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अनेकांचा महत्वाचा डाटाही जातो. त्यामुळे यासंबंधित नागरिकांच्या भावना वेगळ्या असतात. मोबाईलची कधी चोरी होते, तर कधी हरवतो. पोलिसांकडून दाखला मिळवून नवे सिमकार्ड मिळवून अनेक जण नवा मोबाईल सुरू करतात. असे असले तरी त्यांच्या दृष्टीने हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल तेवढाच महत्वाचा असतो. त्याचा शोध घेता येत नाही, तक्रारही नोंदवून घेतली जात नाही, यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचे मत खराब होते.

तर दुसरीकडे चोरांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटना वाढतच राहतात. हे ओळखून पोलिस निरीक्षक यादव यांनी यासाठी खास मोहीम राबविण्याचे ठरविले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना कामे वाटप केले. तांत्रिक मदत आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवंलब करून विशेष मोहिमेत त्यांनी बरेच मोबाईल परत मिळविण्यास यश मिळविले.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख