म. टा. प्रतिनिधी, नगर
अकरावीला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घेण्यासाठी सोमवारी (२४ जून) शेवटची संधी असणार आहे. सोमवारी ज्युनिअर कॉलेजांना प्रवेश अर्ज वाटप करण्यासाठी दिलेली मुदत संपत आहे. आता मंगळवारपासून (२५ जून) विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले प्रवेश अर्ज ज्युनिअर कॉलेजांमध्ये जमा करता येणार आहेत.
दहावीचा ऑनलाइन निकाल आठ जूनला जाहीर झाला आहे. दहावीला उत्तीर्ण व एटीकेटीमध्ये असणारे विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र आहेत. जिल्ह्यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया माध्यमिक शिक्षक विभागाच्या नियंत्रणाखाली १३ जून रोजी सुरू करण्यात आली. अकरावी प्रवेशाचे अर्ज वाटप करण्यासाठी कॉलेजांना २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी रविवार (२३ जून) रोजी कॉलेजांना सुट्टी आहे. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे, मात्र त्यांनी अद्यापपर्यंत प्रवेश अर्ज घेतलेला नाही, त्यांना सोमवारी अर्ज घेण्याची शेवटची संधी असणार आहे. प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी २५ ते २८ जून अशी मुदत देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज जमा करताना त्यासोबत दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याच्या दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला यांची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. २९ जून ते ३० जून दरम्यान विद्यालय स्तरावर अर्ज छाननी होणार आहे. १ जुलैला पहिली चेक लिस्ट प्रसिद्ध होणार आहे. या चेक लिस्टवर आक्षेप घेण्यासाठी व त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २ जुलै रोजी सकाळी दहा वाजता पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना ६ जुलैपर्यंत प्रवेश देण्यात येईल. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देखील जागा शिल्लक राहिल्यास ८ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.