कृषि अभियांत्रिकी पदवीधरांमध्ये नाराजी
म. टा. वृत्तसेवा, राहुरी
कृषि अभियांत्रिकी पदवी प्राप्त पदवीधरांचा राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या पदासाठी समावेश
नसल्याने पदवीधरांमध्ये नाराजी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कृषि अभियंत्यांचा समावेश करावा, अशी मागणी होत आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
मृद व जलसंधारण विभाग औरंगाबाद ( वाल्मी ) अंतर्गत जलसंधारण अधिकारी या पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात कृषि अभियांत्रिकी पदवीस स्थान नाही. मृद व जलसंधारण या पदवी अभ्यासक्रमात महत्वाचा विषय असून त्या अंतर्गत सिमेंट माती नालाबंधारे, कोल्हापूर बंधारे, वनराई गॉबियन बंधारे, पाझर तलाव, शेततळे, माथा ते पायथा संकल्पना, ढाळी कंपार्टमेंटचे बांध, समतल चर, मजगी आदी विषयांबाबत तांत्रिक संकल्पना आराखडा व बांधणी सलग्न विषयांचा सखोल अभ्यास केलेल्या कृषि अभियांत्रिकी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त दीपक संगला यांची समक्ष भेटही या विद्यार्थ्यानी घेतली. हिवरे बाजार येथील आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण क्षेत्रातील नामांकित वॉटर संस्थेनेही शिफारसपत्र देत पाठबळ दिले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.