अ‍ॅपशहर

अण्णांची पत्रे बेदखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिलेला असला तरी केंद्र सरकारने अद्याप त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही.

Maharashtra Times 26 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna hajares letters to centre not recognised
अण्णांची पत्रे बेदखल


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिलेला असला तरी केंद्र सरकारने अद्याप त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. दिल्लीत आंदोलनासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही तसेच हजारे यांनी आतापर्यंत लिहिलेल्या पत्रांनाही उत्तरे दिलेली नाहीत. दरम्यान, हजारे यांच्या जनजागृती दौऱ्याचा पहिला टप्पा आता आता संपला असून जानेवारीत दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रमुख मुद्यांवर हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासाठी सध्या ते जनजागृतीसाठी विविध राज्यांचा दौरा करीत आहेत. उत्तर प्रदेशातील संभल येथील सभेत बोलताना हजारे यांनी आपले हे आंदोलन शेवटचेच असून प्राण गेला तरी चालेल मात्र, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले आहे.

हजारे मागील पंधरा दिवसांपासून विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आतापर्यंत त्यांनी आसाम, उडीशा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांत सभा घेतला आहेत. त्यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा संपला असून मंगळवारी ते पुन्हा राळेगणसिद्धी येथे येणार आहेत. त्यानंतर जानेवारीत दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि फेब्रुवारीत हरयाणा, राजस्थानमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.

आंदोलनापूर्वी आणि आंदोलनाची घोषणा केल्यानंतर हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा पत्रे लिहिली आहेत. त्यांना सरकारकडून काहीही उत्तर आलेले नाही. पंतप्रधान, गृहमंत्री, दिल्लीचे पोलिस आयुक्त यांना पत्र पाठवून दिल्लीत आंदोलनासाठी परवानगीही मागण्यात आली आहे. त्याला आता तीन आठवडे झाले; मात्र, त्या पत्रालाही अद्याप काहीही उत्तर आलेले नाही. राज्य सरकारने हजारे यांना जवळ करण्याचे धोरण घेत राळेगणसिद्धीमध्ये काही उपक्रम राबविले, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राळेगणसिद्धीमधील कार्यक्रमाला हजेरी लावली; मात्र, दिल्लीतील सरकारकडून हजारे यांची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

राळेगणसिद्धी येथे जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेल आणि अन्य प्रचार कार्याचे काम वेगाने सुरू केले आहे. अन्य राज्यांतून कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हजारे यांच्या कार्यलयाशी संपर्क साधून आंदोलनाचे नियोजन करीत आहेत. विविध प्रचार साहित्याच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी सामान्य कार्यकर्त्यांचा याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज