अ‍ॅपशहर

महाजनांची शिष्टाई फोल; अण्णा आंदोलनावर ठाम

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत येऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकारतर्फे घेतलेल्या निर्णयांची माहिती देत उपोषण न करण्याची विनंती केली.

Maharashtra Times 15 Sep 2018, 1:20 am
म.टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna hazare firm on his protest
महाजनांची शिष्टाई फोल; अण्णा आंदोलनावर ठाम


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत येऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकारतर्फे घेतलेल्या निर्णयांची माहिती देत उपोषण न करण्याची विनंती केली. मात्र, सरकार केवळ आश्वासने देत असल्याचे सांगत हजारे यांनी ही विनंती फेटाळत आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी दोन ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी सरकारने प्रय़त्न सुरू केले आहेत. त्यासाठी महाजन राळेगणसिद्धीत आले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आपण आल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही स्वतंत्रपणे चर्चेचा तपशील जाहीर केला. महाजन यांनी सांगितले, 'हजारे यांच्या मागण्यांसंबंधी सरकार सकारात्मक आहे. त्यासंबंधी आतापर्यंत घेतलेल्या पूरक निर्णयांची माहिती हजारे यांना दिली. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी पूर्वीच निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय अन्य मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे हजारे यांनी उपोषण करू नये, अशी विनंती आम्ही त्यांना केली. आणखी काही मुद्दे असून त्यावरही चर्चा सुरू आहे. अण्णांच्या ६० ते ७० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण करणार नाहीत, अशी आम्हाला आशा वाटते.'

यासंबंधी हजारे म्हणाले, 'सरकारची ही जुनीच आश्वासने आहेत. त्यावर प्रत्यक्षात ठोस कार्यवाही होत नाही. एकीकडे सरकार पेट्रोस-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणत नाही, तर दुसरीकडे ठिबक सिंचनाच्या साहित्यावर जीएसटी आकारला जातो. हा कर १२ टक्केवरून चार टक्के करावा अशी आमची मागणी आहे. जेथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यास काय हरकत आहे? मात्र सरकार ठोस भूमिका घेत नाही. जुनीच आश्वासने दिली जात आहेत. महाजन यांनीही तेच मुद्दे तोंडी सांगितले, ठोस लेखी असे आश्वासन नसल्याने आपण यावर विश्वास ठेऊ शकत नाही. त्यामुळे दोन ऑक्टोबरपासून आंदोलन होणार हे नक्की.'

मुख्यमंत्र्यांनीही साधला संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजारे यांच्याशी संवाद साधला. महाजन यांनी त्यांचे हजारे यांच्याशी बोलणे करून दिले. त्यांनीही अण्णांच्या मागण्यासंबंधी चर्चा केली आणि वरिष्ठांना याची माहिती देणार असल्याचे सांगितले. ठोस आश्वासन मिळेपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी त्यांनाही सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज