अ‍ॅपशहर

अण्णा हजारे रिटायर होणार? कार्यकर्ते म्हणतात...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गावाच्या कामातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2020, 5:15 pm
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावकऱ्यांसमोरील एका भाषणाचा संदर्भ देत हजारे आता गावाच्या कामातून निवृत्ती घेणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून आणि सोशल मीडियातून सुरू झाल्या आहेत. मात्र, हजारे अशा पद्धतीने कधीच निवृत्ती घेणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. हजारे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Anna Hazare


नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामध्ये हजारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गावासाठी आपण केलेली आंदोलने, त्याना गावकऱ्यांची मिळालेली साथ याची काही उदाहरणेही त्यांनी सांगितली. आता गावातील अनेक तरुण कार्यकर्ते पुढे आले आहेत. त्यांनी गावासाठीचे काम नेटाने पुढे सुरू ठेवले आहे. पूर्वी अशा कामांसाठी गावकऱ्यांना माझ्या कुबड्या घ्याव्या लागत होत्या. आता कार्यकर्ते हिमतीने काम करताना पाहून आनंद वाटतो. त्यामुळे गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, असे हजारे म्हणाले होते.

दसरा मेळावा: गुन्हा दाखल झाल्यामुळं पंकजा मुंडे भडकल्या!

त्यावरून हजारे रिटायर होणार असल्याची चर्चा पसरली. मात्र, अनेक गावकरी आणि कार्यकर्त्यांना यात तथ्य वाटत नाहीत. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने औपचारिकपणे बोलताना हजारे यांनी हे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे ही निवृत्तीची घोषणा नाही, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. शिवाय हजारे स्वत:ला चळवळीतील कार्यकर्ता मानतात. त्यांच्या विचारानुसार कार्यकर्ता कधीही निवृत्त होत नसतो. त्यामुळे हजारे अशी कोणतीही निवृत्ती घेतील, याची अजिबात शक्यता नाही. यासंबंधी पसरत असलेल्या बातम्यांवर हजारे यांनी केवळ स्मितहास्य करून हेच संकेत दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

शिखर बँक प्रकरण: अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

बोलण्याच्या ओघात हजारे यांनी यापूर्वी अनेकदा यापुढे आंदोलन करणार नाही, आता बस्स झाले. आता लोकांनीच आंदोलने करावी, अशीही वक्तव्य केलेली आहेत. मात्र, तीही त्यांची निवृत्तीची घोषणा नव्हतीच. शिवाय त्यानंतरही त्यांनी आंदोलने आणि कार्यही सुरूच ठेवले आहे. लॉकडाउनच्या काळातही ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाच होता. त्याची राज्य सरकारलाही दखल घ्यावीच लागली. त्यामुळे नवरात्रीच्या समारोपावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना हजारे यांनी केलेले भाषण केवळ कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देण्यासाठी आहे. निवृत्ती घेणे अगर कोणावर जबाबदारी सोपविणारे मुळीच वाटत नाही, असेही कार्यकर्त्यांचे मत आहे.

वाचा: राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर अशोक चव्हाणांची टोलेबाजी
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज