आमदार जगतापांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा; दयनीय नागरी सुविधांबाबत नाराजी
म. टा. प्रतिनिधी, नगर
'कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरे, बंद पथदिवे, मोकाट कुत्री व अशा अन्य नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या उदासीन धोरणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडू शकते, अधिकाऱ्यांचा असा मनमानीपणा यापुढे चालणार नाही,' असा स्पष्ट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. तसे स्पष्ट पत्र त्यांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिले. येत्या २६ रोजी महापालिकेत आंदोलनाचा इशाराही त्यांनी यात दिला.
स्टेशन रोड परिसरातील प्रभाग १५ मधील नागरी समस्या तसेच येथील ड्रेनेज सुविधेसह काटवन खंडोबा रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनीही आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अस्वच्छतेबद्दल नाराजी
शहरात स्वच्छता व दैनंदिन सुविधांचा अभाव असल्याची नाराजी जगताप यांनी व्यक्त केली. 'शहरातील अनेक प्रमुख रस्ते अस्वच्छ आहेत, अनेक वसाहतींतून दैनंदिन कचरा उचलला जात नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हे ढीग लवकर उचलले जात नसल्याने त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत साथीचे आजार पसरून त्यामुळे त्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे,' असा दावा जगताप यांनी या पत्रात केला आहे. याशिवाय 'शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरे फिरताना वा काही ठिकाणी रस्त्याच्या मध्ये बसलेली दिसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते व छोटे-मोठे अपघातही होत आहेत. तशात शहर व उपनगरातील ८० टक्के पथदिवे बंद आहेत. या विभागाचे कामकाज पाहण्यासाठी सक्षम अधिकारी नाहीत. हे कमी म्हणून की काय, शहरात मोकाट कुत्र्यांचीही समस्या मोठी असून, या कुत्र्यांमुळे मध्यंतरी काही भीतीदायक घटना घडल्याने शहरात फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे,' असेही म्हणणे जगतापांनी मांडले आहे.
चर्चा व सूचनांकडे दुर्लक्ष
'कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरे, बंद पथदिवे, मोकाट कुत्री या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या समस्या त्यांच्या निदर्शनासही आणल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याच्या सूचनाही केल्या आहेत,' असेही जगताप यांनी यात स्पष्ट केले आहे. 'पण याबाबत कार्यवाही करणे दूरच, पण अधिकाऱ्यांनी साधी पाहणी करून वा यंत्रणेकडून समस्यांची साधी माहितीही घेतलेली नाही. अधिकाऱ्यांच्या या उदासीन धोरणाने शहरातील नागरिकांचे आरोग्य व जीव धोक्यात आला आहे. तसेच त्यांना रस्त्याने फिरणेही मुश्किल झाले आहे. पण नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडू शकते व अधिकाऱ्यांचा असा मनमानीपणा यापुढे चालणार नाही,' असा इशाराही दिला आहे.
--
येत्या मंगळवारी आंदोलन
आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील नागरी समस्यांबाबत तातडीने उपाययोजना महापालिकेने केल्या नाहीत तर येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) महापालिकेत आयुक्तांच्या दालनात नागरिकांसमवेत अभिनव पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहितीही तातडीने देण्याचे स्पष्ट केले आहे.
--