गेली पंधरा वर्षे दिव्यांगांसाठी कार्यरत असणारी अहमदनगर मधील अनामप्रेम संस्था दिव्यांगांसाठी चाकोरी आणि पठडीबाहेरचे पथदर्शी कार्य करीत आहे. येत्या १५ आणि १६ डिसेंबर २०१९ रोजी संस्थेच्या सत्यमेव जयते ग्राम (निंबळक) येथे डॉ. प्रकाश शेठ दिव्यांग सक्षमीकरण केंद्र, गौरांग अंध शाळा अशा सहा प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. या निमित्ताने 'अनामप्रेम'च्या वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत...
-प्रा. डॉ. दया अतुल जेठे (भोर)
.............
अनामप्रेम संस्था २००५ पासून सक्रिय झाली. समाजातील अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे काम संस्था करते. सेवेची गरज असलेल्या प्रत्येक क्षेत्रात विश्वस्त भावनेतून, निःस्वार्थ सामूहिक कार्य करणाऱ्या संस्था या समाजाच्याच पाठबळावर उभ्या व्हाव्यात, हा विचार स्नेहालय संस्थेचा जीवनधर्म. स्नेहालय संस्थेच्या या व्यापक दृष्टीतून दिव्यांगासाठी अनामप्रेम विकसित झाले. विशेष गरजयुक्त किशोरवयीन मुला-मुलींच्या पुनर्वसनाचे प्रश्न जटील होते. त्यातून अनामप्रेमच्या वाटचालीस दिशा मिळाली.
स्नेहालय अहमदनगर चाइल्ड लाइन हा उपक्रम बालहक्क रक्षणासाठी चालविते. त्यात कार्यरत अनिल गावडे, मंजिरी तांबे, दीपक बुरम यांनी अनामप्रेमची स्थापना आणि प्रारंभिक विकासात योगदान दिले. दिव्यांग पुनर्वसनाच्या कामात सेवेप्रमाणेच संशोधनही आवश्यक होते. अनामप्रेमच्या मागील १५ वर्षांच्या सेवाकामात त्यामुळे जुन्याच प्रश्नांवर नवी, अभिनव उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला. दिव्यांग सेवेच्या प्रचलित पठडीपेक्षा वेगळे सेवाप्रकल्प विकसित झाले. यामध्ये दिव्यांगांचे हिंमतभवन वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, नोकरी प्रशिक्षण केंद्र, अंध बालकांची अभिनव शाळा, सर्व समाजाच्या संवेदना जागृत करणारा जाणिवांचा गाणी हा कार्यक्रम, असे प्रकल्प सुरू झाले.
मागील वाटचालीतील शेकडो यशोगाथा अनामप्रेमच्या अस्सल कामाची साक्ष देतात. तीन वर्षांपूर्वी सांगली न्यायालयाच्या आदेशाने एका चिमुकल्यासह एक २० वर्षांची मूकबधीर मुलगी अनामप्रेममध्ये दाखल झाली. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व संस्थांनी ही गुंतागुंतीच्या प्रकरणातील मुलगी स्वीकारण्यास नकार दिला होता. गुन्हेगारी टोळी आणि देहव्यापारासाठी मुली पुरवणाऱ्या दलाल टोळीने तिला अक्षरशः जखडले होते. दिसायला अत्यंत सुंदर, गोरीपान असणाऱ्या या अनाथ मुलीला तिच्या सख्ख्या बहीण आणि मेव्हण्याने थोड्या दिडक्यांसाठी अवघ्या १५ व्यावर्षीच देहव्यापारात लोटले होते. ती अल्पवयीन असल्यापासून तिला तीन वर्षे सांगली येथील कुंटणखान्यात डांबून ठेवण्यात आले होते. तिची कथा शहारे आणणारी होती. मूकबधीर असल्याने तिच्याशी सांकेतिक भाषेत संवाद करावा लागला. कार्यकर्ते हा संवाद करायला तयार होते; परंतु तिला हा संवाद येत नव्हता. अल्पवयीन असताना झालेल्या लैंगिक अत्याचाराने तिला अकाली मूल झाले. त्यात तिला अनेक व्याधी जडल्या. मानसिक दृष्टीने ती नैराश्याची शिकार झाली होती. त्यामुळे तिचे मूल सांभाळणे तिच्या आवाक्याबाहेर गेले होते. या स्थितीमुळे ती आणि बाळ दोघेही पिळून निघाले. बाळ अगतिक होते. अनामप्रेमने या दिव्यांग मातेला आणि बाळाला स्वीकारले. या मुलीला संवाद करता येत नव्हता. हे एक मोठे आव्हान होते. अनामप्रेमने या माय-लेकराला मायेची ऊब दिली. आपलेपण दिले. आई मूक असल्याने बाळालाही बोलता येत नव्हते. यातूनच एक प्रेरक कहाणी तयार झाली. अनामप्रेमने या बाळाला स्वीकारले. आपल्या वेदना शब्दाने व्यक्त करू न शकल्याने या मुलीची जास्त परवड झाली होती. या मूकबधीर मुलीला सर्वोपचार देऊन पूर्णतः निरोगी करण्यात आले.
त्यानंतर तिचे लग्न एका सुशिक्षित, सुसंस्कृत, संपन्न आणि समजूतदार परिवारातील समवयस्क आणि अनुरूप मुलाशी थाटाने करण्यात आले. या माय-लेकरांसाठी अनामप्रेमने चार वर्षे संयम आणि कल्पकतेने काम केले. एक सुस्थिर जीवन या अत्याचारित-अपंग मुलीला मिळाले. हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.
पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्प क्षेत्रातील एका कुटुंबातील दोन बालकांची कथा अशीच. या बाळांचे आई-वडील अपघातात गेले. चिमुकले भाऊ-बहीण एकटे पडले. शेती होती, पण नातेवाइकांनी ती लगेच बळकावली. मुलांना घराबाहेर काढले. पुण्यातील स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त शुभांगी कोपरकर यांनी हे समजल्यावर पुढाकार घेऊन या भावंडांना अनामप्रेमपर्यंत सुरक्षित पोहोचविले. यातील मुलीचा रस्त्यावर अपघात झाला. तिला अपंगत्च आले. काळाने हैव आणि दैव दोन्ही नेले. यातील भाऊ दुर्दैवाने पुढे व्यसनी झाला. बहिणीला अपंगत्व आल्याने चक्क निघून गेला. अजून त्याचा शोध जारी आहे. बहीण अपंग, शिवाय तिला दुर्धर (कधीही बरा न होणारा असा प्राणघातक) आजार आहे. त्यामुळे तिची विशेष काळजी संस्था घेते. मागील सात वर्षे अनामप्रेम तिच्यासाठी अहोरात्र झटते. नव्या भविष्यासाठी तिला उमेद देते. ही अपंग मुलगी नुकतीच १० वी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षण आणि तिच्या विवाहासाठी अनामप्रेमने नियोजन केले आहे.
अशाच दिव्यांगांच्या अक्षरशः शेकडो यशोगाथा अनामप्रेमच्या अस्सलपणाची साक्ष देतात. हे अनुभव आपल्याला कधी भावूक, क्रोधित तर कधी प्रेरित करतात. कायद्याच्या भाषेत शासकीय धारणेत दुर्दैवाने सर्व दिव्यांग एकाच छत्राखाली नाहीत. प्रत्यक्षात प्रत्येक अपंगत्वाचे प्रश्न वेगवेगळे आहेत; परंतु तरी सर्वांची ऊपेक्षा आणि अवहेलनेची वेदना समान आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि यातून लगेच थेट नोकरी देण्याचा अभिनव प्रयोग संस्थेने यशस्वी केला. अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींना आर्थिक स्वावलंबी करण्याचा अनामप्रेमचा उद्देश आहे. त्यासाठी अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींसाठी हिंमतभवन हे वसतिगृह निःशुल्क चालवते. यामध्ये १२५ अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुले-मुली राहतात. या सर्वांचे पालकत्व अनामप्रेम पेलते. तंत्रज्ञानाच्या युगात संगणक शिक्षणाची गरज आहे. या विशेष, दिव्यांग युवकांसाठी संस्थेने आनंद संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून संगणक शिक्षणाची सोय केली. स्मार्टफोन प्रत्येकाकरिता उपलब्ध आहे. पूर्णतः वाय-फाय वसतिगृह आहे. अनामप्रेमची मुले-मुली स्वबदलासाठी आधुनिक तंत्रज्ञान निपुणतेने वापरत आहेत.
सरकारी नोकरीत चार टक्के राखीव जागा दिव्यांगांना आहेत. त्याद्वारे व्यापक पुनर्वसन शक्य आहे. हे ओळखून अनामप्रेमच्या कार्यकर्त्यांनी भारतातील पहिले मराठी भाषेतील स्पर्धा परीक्षा ब्रेल मासिक प्रकाशवाटा सहा वर्षांपूर्वी सुरू केले. ब्रेलवाचक-स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १२५० पेक्षा जास्त अंध मुला-मुलींना या मासिकाचा उपयोग होतो. अनेक अंधवाचक प्रकाशवाटा मासिकाची स्पर्धा परीक्षेकरिता तयारी करीत असतात. प्रत्येक अंकाची वाट उत्सुकतेने पाहत असतात. मराठी ब्रेल प्रकाशवाटा मासिक गरज पूर्ण करीत असताना हिंदी भाषेतील स्पर्धा परीक्षा साहित्याची मागणी अनामप्रेमकडे होऊ लागली. त्यासाठी ऑडिओ बुक सुरू झाले.
आज उद्योगक्षेत्रात नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. बेरोजगार अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींनी स्वतःला सिद्ध केल्यास नोकऱ्या मिळू शकतात. गुणवत्तापूर्ण माणूसबळ तयार करण्यासाठी अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींसाठी अनामप्रेमने चार वर्षांपूर्वी नोकरी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. युथ फॉर जॉब या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राने ५५० पेक्षा जास्त बेरोजगार अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींना कंपनी उद्योगक्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. अनामप्रेम दरवर्षी उपवर अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींसाठी वधूवर मेळावा, जयपूर फुट कॅम्प आदी कार्यक्रमांचे आयोजन करते. यामधून संस्थेत निवासी नसणाऱ्या गरजू दिव्यांगांना मदत पोहोचवण्याचा अनामप्रेमचा प्रयत्न आहे. भविष्यात शिक्षण घेणाऱ्या ५०० दिव्यांग मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना आणि या समाज घटकांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. अंध व अस्थिव्यंग बालकांसाठी यंदा जून २०१७ पासून गौरांग अभिनव शाळा सुरू झाली आहे. या शाळेत २४ विशेष बालके शिकत आहेत. बहुतांश शारीरिक आव्हानग्रस्त कार्यकर्त्यांचा संघ शाळा संचलनात असल्याने अशा बालकांना शिक्षण अनुकरणातून, स्वानुभवातून देणे शक्य झाले आहे. सत्यमेव जयते ग्राम हा प्रकल्प अनामप्रेम संस्थेने २०१४ मध्ये सुरू केला. या प्रकल्पात निवासी दिव्यांगांना विविध रोजगाराच्या संधी अनामप्रेमने सुरू केल्या आहेत. कपडा बँकेच्या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका बाजारात अनामप्रेम आठवडा बाजारात कपडा बाजार उपक्रम राबवते. यातून दिव्यांगांना रोजगार आणि व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण मिळत आहे. सत्यमेव जयते ग्राम येथे अंध आणि अस्थिव्यंग बालकांसाठी गौरांग अभिनव शाळा नव्या अध्यापन पद्धती आणि संशोधनात्मक पद्धतीने ही शाळा शिक्षण प्रयोग करीत आहेत. संगीतमय प्रकल्प प्रकाशगान संगीतरजनी मंच अनेक कलाकारांना व्यावसायिक कलाकार म्हणून स्थान मिळवून देत आहे. दिव्यांगांचा गायन-वादन याचा हा कार्यक्रम आजवर ६०० पेक्षा अधिक प्रयोगाने अनुभवाने दर्जेदार होत आहे.
कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ निरपेक्ष कार्यकर्त्यांच्या श्रमावर आणि अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींचा प्रत्यक्ष कामातील सहभाग, यावर अनामप्रेम संस्था विकसित झाली, होत आहे. स्क्रॅप बँक, वाढदिवस-स्मृतीभोजन दाते, इंधन दाते, अत्यल्प कंपनी सहयोग, छोट्या-छोट्या देणगीदारांच्या मदतीवर अनामप्रेमचे संचालन होते. भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या प्रकाशवाटा, प्रकाशवाणी मासिकाच्या निर्मितीत वाढ करण्यासाठी, पुढील पाच वर्षांत अजून अधिक २०० लाभार्थ्यांची सोय, तसेच १२ वी नंतर पदवीक्षम अंध-अस्थिव्यंग-मूकबधीर-अपंग मुला-मुलींसाठी शिक्षण प्रशिक्षणाची सोय, संशोधनात्मक अभ्यासातून शारीरिक आव्हान सुसह्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.
पुणे येथे आपले वसतिगृह आवश्यक आहे, हे अनेक मुलांशी बोलल्यावर लक्षात आले. स्नेहालयच्या शारदा बालभवनची जागा कात्रज येथे उपलब्ध होती. अनामप्रेमने येथे शारदा अंध मुलांचे वसतिगृह सुरू केले आहे. येथे २२ अंध मुले राहत असून, ती पुण्यातील विविध महाविद्यालयांत शिकत आहेत. सामाजिक काम करणे म्हणजे खूप पैसे आणि आजच्या या सीएसआरच्या धांदलीत हे काम न अडकता श्रम करणाऱ्या कार्यकर्ते आणि अनेकविध निधी संकलनाचे मार्ग आजमवणारे अनामप्रेम आहे. आम्ही कपडा बँक उपक्रम चालवतो. यामध्ये वापरयोग्य कपडे आम्ही गोळा करतो. आठवडा बाजारात नेऊन हे कपडे विकले जातात. यातून निधी आणि माणसे गोळा केली जातात. स्क्रॅप बँक हा एक नवोपक्रम अनामप्रेम चालवत आहे. यामध्ये अगदी जुनी पेपर रद्दी, भंगार समाजातून गोळा करीत असतात. मागील १० वर्षांपासून आपण हा निधी संकलनाचा उपक्रम चालवत असून, येथे दर महिन्याला आज ४० हजार रुपयांची उलाढाल होते. यातून अनामप्रेमच्या एका वसतिगृहाचा अन्नधान्य खर्च भागण्यास मदत होत आहे. याशिवाय दैनिक कामाचा व्याप व गरज वाढत आहे. आगामी काही वर्षांत अनामप्रेम शाळा आणि दिव्यांग लोकांचा वृद्धाश्रम अत्याधुनिक स्वरूपाचा उभा करीत आहे. याकामी भरीव मदत, मार्गदर्शन आणि श्रम देणारे हात अनामप्रेमला आवश्यक आहेत.
(संस्थेचा पत्ता : अनामप्रेम, स्नेहालयमागे, गांधी मैदान, अहमदनगर. संपर्क : ९०११०२०१७४)
...............