अ‍ॅपशहर

भिंगारसह किल्ल्याच्या समस्या मार्गी लागणार

भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील चटई क्षेत्र वाढीच्या प्रश्नासह नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणाबाबत तातडीने कार्यवाहीची ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे.

Maharashtra Times 1 Jan 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhingar fort problem will solve
भिंगारसह किल्ल्याच्या समस्या मार्गी लागणार

भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील चटई क्षेत्र वाढीच्या प्रश्नासह नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणाबाबत तातडीने कार्यवाहीची ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे. भुईकोट किल्ला सुशोभिकरणाबाबत येत्या ५ जानेवारीला बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे व या सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजनासाठी स्वतः येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
नगरचे खासदार दिलीप गांधींसह भिंगारच्या शिष्टमंडळाने पुण्यात पर्रीकर यांची भेट घेऊन भिंगार कॅन्टोन्मेट हद्दीतील विविध समस्यांसह भुईकोट किल्ल्याचाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. यावर बोलताना पर्रीकर यांनी, भिंगारच्या समस्या सोडविण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तातडीने अहवाल पाठविण्याचे आदेश कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना दिले. भिंगार कॅन्टोंमेंटचा चटई क्षेत्राचा प्रश्न सोडविणार असून, ०.५ वरून ०.८ पर्यंत हे चटईक्षेत्र वाढवू तसेच कापूरवाडी तलावातील गाळ उचलण्याची परवानगीही लवकरच देऊ, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणाच्या मंजुरीबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव अद्याप संरक्षण खात्याकडे आला नसल्याने याबाबत येत्या ५ जानेवारीला मंजुरीबाबत अंतिम बैठक घेऊ, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर पर्रीकर यांनी समाधान व्यक्त केले व या किल्ल्याच्या सुशोभिकरण भूमिपूजनासाठी नगरला येण्याची ग्वाहीही दिली. राष्ट्रीय महामार्गासाठी भिंगारमध्ये सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामात जमिनी संपादित केलेल्या मालकांनाही योग्य मोबदला देण्यास परवानगी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. पुणे कॅन्टोंमेंट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडीअर रैना, ब्रिगेडीअर नायर, नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, भिंगार कॅन्टोंमेंट बोर्डाचे मुख्याधिकारी विनित लोटे, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, नगरसेवक सुवेंद्र गांधी, कॅन्टोंमेंट सदस्य शुभांगी साठे, भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष वसंत राठोड आदी यावेळी उपस्थित होते. भिंगारचे चटई क्षेत्र वाढविणे, कापूरवाडी तलावातील गाळ उचलण्याची परवानगी, बी.टी.आर. रोड नागरिकांकरिता खुला करणे, भिंगारसाठी नवीन पाण्याची पाईपलाईन, भिंगारमधील रस्ते डांबरीकरण, पथदिवे, भुयारी गटार व कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत केलेल्या येथील जागेच्या मालकांना मोबदला आदी प्रश्नांसह नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे सुशोभिकरण करून हा किल्ला नागरिकांकरिता पर्यटन स्थळ म्हणून खुला करण्याची मागणी गांधी यांनी केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज