जळगाव-सांगली विजयाचा जल्लोष; मनपा निवडणुकीतही सत्तेचा दावा
म. टा. प्रतिनिधी, नगर
जळगाव व सांगली महापालिकांच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व खासदार दिलीप गांधींसह त्यांच्या समर्थकांनी शनिवारी जोरदारपणे केला. या निमित्ताने शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जात असलेल्या शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष चौक परिसरात फटाके फोडून नागरिकांना लाडू भरवण्यात आले. 'जळगाव-सांगली झाँकी है-नगर अभी बाकी है' अशा घोषणा देत आगामी नगर मनपा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावाही या वेळी करण्यात आला.
जळगावमध्ये स्थानिक बडे नेते सुरेश जैन व सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून भाजपने महापालिकांची सत्ता मिळवली आहे. या विजयाचा आनंदोत्सव शहर जिल्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी येथे साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून व लाडू वाटून लक्ष्मी कारंजा चौक व चितळेरोड येथे जल्लोष करण्यात आला. गांधी मैदानातील भाजप कार्यालय ते चितळेरोड ते नवीपेठ अशी मिरवणूकही काढण्यात आली.
या आनंदोत्सवात भाजपाचे संघटन सरचिटणीस किशोर बोरा, नगरसेवक सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, महिला आघाडीच्या अध्यक्ष गीतांजली काळे, श्रीकांत साठे, अन्वर खान, नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, धनंजय जामगांवकर, विश्वनाथ पोंदे, नगरसेविका मालन ढोणे, प्रशांत मुथा, जगन्नाथ निंबाळकर, वसंत राठोड, रवींद्र बारस्कर, छाया राजपुत तसेच वंदना पंडित, लीला आग्रवाल, वैदेही जोशी, मीरा महाजनी, वाहिद कुरेशी, सचिन चोरडिया, संदीप पवार, नाना भोरे, मिलिंद भालसिंग, सागर कराळे, गोपाळ वर्मा, जालिंदर शिंदे, गणेश शिंदे, लक्ष्मीकांत तिवारी, संजय ढोणे, संगीता मुळे, शुभांगी साठे, किशोर कटोरे, अनंत रासने, आनंद बोथरा, सौरभ देवचक्के, विजय भालेकर, अभिषेक दायमा, वैभव जोशी, महेश हेडा, सुमित देवतरसे, संग्राम म्हस्के, रोशन गांधी, अभिजित चिप्पा, संतोष शिरसाठ, राजेंद्र ताकपेरे, हेमंत दंडवते, सतीश शिंदे, सागर गोरे, बंटी डापसे, मनेष साठे, नरेश चव्हाण, सुजित खरमाळे, किशोर वाकळे, प्रतीक बारसे, उमेश साठे, अविनाश साकला, कैलास गर्जे, बाबासाहेब भिंगारदिवे, शुभम फुलारी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपमधील खासदार गांधी गट व शहर शिवसेना यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. परस्परांवरील टीकेची एकही संधी दोन्ही बाजूंकडून सोडली जात नाही. या पार्श्वभूमीवर गांधी गटाने जळगाव-सांगली विजयोत्सवानिमित्त सेनेचे कार्यालय असलेल्या नेता सुभाष चौकात फटाके उडवून केलेला जल्लोष चर्चेचा विषय झाला.
--
नगरही जिंकणार : गांधी
या वेळी बोलताना खासदार गांधी म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र भाजपविरोधात वातावरण निर्माण झाले असतानाही जळगाव-सांगली महापालिका निवडणुकीत तेथील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला. जिकडे विकास असतो, तिथेच विजय मिळत असतो. या दोन्ही महापालिकांमधील विजयासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार संजय पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील यांचीही मेहनत आहे. 'जळगाव-सांगली झाँकी है-नगर अभी बाकी है' याच पद्धतीने नगरमधील महापालिकाही भारतीय जनता पक्ष एकहाती ताब्यात घेणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.