पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निर्णय
म. टा. प्रतिनिधी, नगर
भारतीय जनता पक्षाने दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट देतील तर पक्षाची जिल्हा शाखा सेवाकार्य करेल, असा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची मुंबईत बैठक झाली. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. त्यामध्ये दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली आणि प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी दुष्काळी भागाला भेट देणार आहेत. चारा छावणीला भेट, गावातील पाणीटंचाईचा आढावा, सरकारी निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा, त्यातील अडचणी दूर करणे, अशी कामे केली जातील. आमदार निधीतून दुष्काळी भागात मदत करण्यासाठी सरकारी पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुष्काळग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन काम करणार आहेत.