अ‍ॅपशहर

भाजपने खडसेचा राजीनामा फेटाळावा; जोरदार मागणी

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse Resignation) यांचा राजीनामा भारतीय जनता पक्षाने फेटाळायला हवा, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. त्याला कारणही तसेच आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2020, 7:23 am
अहमदनगर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली आहे. त्यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेतच. मात्र, राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या नेटकऱ्यांनीही या प्रकरणात वेगळ्याच कारणाने उडी घेतली आहे. खडसे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका असल्याने तो फेटाळण्यात यावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Khadse


वाचा: मोदींच्या भाषणानंतर शिवसेनेनं उपस्थित केली 'ही' शंका

नेटकरी म्हणतात हेच राजीनामा पत्र इंग्रजीत असते तर त्यातील चुकांची चर्चा झाली असती. मात्र, मराठी शुद्धलेखनाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. राजकारण्यांनाही त्याचे काही देणेघेणे नसल्याचे वातावरण आहे. आपले राजीनामापत्र राज्यभर व्हायरल होणार, हे ठावूक असताना ते बिनचूक करणे खडसे यांना महत्वाचे का वाटले नाही? असा प्रश्न उपस्थित करून नेटकऱ्यांनी यासाठी नेत्यांच्या सहायकांना जबाबदार धरले आहे. अनेक नेत्यांचे सहायक, त्यांचे सोशल मीडिया हँडलर शुद्धलेखनाकडे लक्ष देत नाहीत. नेत्यांचे दोन ओळीचे राजीनामापत्र जर बिनचूक होत नसेल तर इतरांनी यातून काय बोध घ्यावा? त्यामुळे या चुकांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वेगळा संदेश देण्यासाठी राजीनामा फेटाळण्यात यावा, असे मतही काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वाचा: आव्हाड की वळसे? राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार

अहमदनगरमधील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी खडसे यांच्या राजीनामापत्रातील चुका लक्षात आणून दिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, हे राजीनामा पत्र जर इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन दुर्लक्षित असते. मीही अनेक शब्द चुकतो पण दोन ओळींच्या राजीनामा पत्रात किती चुका असाव्यात? प्रती शब्द प्रति असा हवा, वैयक्तीक शब्द वैयक्तिक असा हवा, प्राथमीक शब्द प्राथमिक हवा, ऑक्टोबरवर टिंब दिलाय तो नको, महसुल शब्द महसूल असा हवा, कृषीमंत्री शब्द कसा लिहावा? विधानसभा हे जोडून हवे.

या पोस्टवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. काहींना चुका अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे तर काहींनी अशा चुका काढणेच अयोग्य असल्याचे म्हटले आहे. व्याकरणाच्या चुकांमुळे हे पत्र भाजपा अध्यक्षांनी नाकारून परत करावे व अचूक पत्र ११ वेळा लिहिण्याची शिक्षा करून नंतरच पत्र पाठवावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. राजकारण्यांच्या शुदधलेखनाच्या चुका शोधण्यासोबतच त्यांच्या कामातील चुकाही शोधल्या पाहिजेत, असेही मत व्यक्त झाले आहे. तर कोणी राज्यपालांच्या पत्रातही शुद्धलेखनाच्या चुका असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज