अ‍ॅपशहर

मंदिरांसाठी आंदोलन: आता तुषार भोसले अण्णांना भेटणार, पण भेट मिळेना

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हजारे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2021, 2:35 pm
म. टा. प्रतिनिधी, नगरः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हजारे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, हजारे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना अद्याप भेटीची वेळ मिळू शकलेली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna


तुषार भोसले नगरच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मंदिरे उघडण्याच्या आंदोलनासंबंधीही चर्चा होत आहे. याच विषयावर हजारे यांचीही भेट घेऊन चर्चा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार काही पदाधिकाऱ्यांनी हजारे यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. मात्र, हजारे नुकतेच प्रवास करून आले असून थकले आहेत. त्यांची प्रकृतीही ठीक नाही, त्यामुळे आज भेट होऊ शकणार नाही, असा निरोप देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नगरच्या मंदीर बचाव समितीने याच विषयावर हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी या आंदोलनाची माहिती त्यांनी हजारे यांना दिली होती. त्यांच्याशी चर्चा करताना हजारे यांनी दारूची दुकाने उघडली तर करोनाची भीती नाही आणि मंदिर उघडल्यावरच कशी भीती निर्माण होते, असा प्रश्न करून या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या भाजपच्या शंखनाद आंदोलनापासून हजारे दूरच राहिले होते.

या मुद्द्यावर हजारे सकारात्मक असल्याचे पाहून नगरच्या दौऱ्यावर आलेल्या भोसले यांनीही त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यकर्ते आणि प्रसार माध्यामांनाही त्यांनी हे बोलून दाखविले. त्यानुसार राळेगणसिद्धी कार्यालयात संपर्क साधण्यात आला. मात्र, हजारे यांची प्रकृती ठीक नसल्याने सध्या तरी ही भेट होऊ शकत नसल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे.

मंदिर बचाव समितीशी चर्चा करताना हजारे यांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला असला तरी हजारे यांनी स्वत: आंदोलन करण्याचा इशारा दिलेला नाही. शिवाय केवळ मंदिरेच नव्हे तर सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे हजारे यांना अपेक्षित आहेत. दारुची दुकाने उघडलेली चलतात, मग धार्मिक स्थळे का नको? मंदिरांमधून माणसे घडण्याचे संस्कार मिळतात, अशी हजारे यांची भूमिका असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले होते.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज