मंत्री पाटील यांचा आरोप; नगरला मेळावा उत्साहात
म. टा. प्रतिनिधी, नगर
'भाजपने आतापर्यंत माणसे आयात करून व पैसे वाटून निवडणुका जिंकल्या आहेत. आता त्यांनी पैसे न वाटता निवडणूक लढवून दाखवावी', असे आव्हान शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. 'शिवसेना वटवृक्ष असून, आमच्या झाडावर वाढलेला भाजप हा वेल आहे, पण ही वेल आम्हालाच गिळंकृत करायला निघाली आहे', अशी टीकाही त्यांनी केली.
बोल्हेगाव येथे अक्षय कातोरे यांच्या सेना प्रवेशानिमित्त झालेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सभागृह नेते गणेश कवडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, संजय शेंडगे, अशोक बडे, आशा बडे, सागर बोरुडे, संभाजी कदम, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
'भाजपला काश्मीरमध्ये 'पीडीपी' चालते, इतर राज्यातसुद्धा कुणीही चालते, पण ३० वर्षांपासून शिवसेनेशी असलेली युती चालत नाही, पण शिवसेना काँग्रेसच्या काळात घाबरली नाही. शिवसेना हा नुसताच पक्ष नसून विचार आहे व विचार कधी संपत नसतो. तुमच्या (भाजप) पाच पिढ्या आल्यातरी शिवसेना संपणार नाही', असे सांगून पाटील म्हणाले, 'राज्यात काँग्रेस संपली, राष्ट्रवादी काँग्रेस संपली तर विरोधी पक्षनेते हे याच जिल्ह्याचे असून पोराला खासदार करण्यासाठी ते उद्या भाजपमध्येही जातील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घोटाळे बाहेर काढू म्हणून दम द्यायचा मग हे सगळे गप्प बसतात. विखेंना डोळा मारला की ते खाली बसतात', असा टोलाही पाटील यांनी मारला. 'नगरमधील दादागिरी व गुंडगिरीविरोधात शिवसेना लढत असून, पुन्हा शिवसेनेचा महापौर करायचा असल्याने नेते व कार्यकर्त्यांनी कामाला लागा', असे आवाहनही त्यांनी केले.