जिल्ह्यात ७१ बोगस डॉक्टरांवर कारवाई
म. टा. प्रतिनिधी, नगर
आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात सध्या वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अशा ७१ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे; मात्र, कारवाईनंतरही काही डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय थाटल्याच्या तक्रारी आल्यानंतर अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, तसेच डॉक्टरांविरुद्ध सुरू असलेली मोहीम आणखी तीव्र करण्यात यावी, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि दक्षता समितीची बैठक झाली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत, विलास जगदाळे, कारभारी गरड, डॉ. रजनीकांत पुंड, अशोक शेवाळे, अतुल कुऱ्हाडे, शिवाजी साळुंखे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी याआधीही मोहिमा आखल्या होत्या. तरीदेखील ही समस्या मिटलेली नाही. आरोग्य विभागाचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचण्याआधीच डॉक्टर तेथून गायब होत असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना याआधीही आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची समस्या मिटलेली नाही. या बैठकीत बोगस डॉक्टरांचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर मात्र अशा डॉक्टरांविरोधात मोहीम आधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या. फळे कृत्रिमरित्या पिकवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दाही सदस्यांनी या बैठकीत उपस्थित केला. त्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून फळांचे नमुने जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात ४५ इथेलीन चेंबर्स असल्याने आता अशा प्रकारे फळे कृत्रिमरित्या पिकवण्याचे प्रकार कमी झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होतील. त्यामुळे या कारखान्यांकडून ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टीव टेप्स लावण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होईल, यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यातील काही ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना त्रास होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर सिव्हिल सर्जन यांनी आढावा घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना पालवे यांनी दिल्या. सध्या खरीप हंगाम सुरू असून काही भागात जाणीवपूर्वक खतांचा तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात कृषी विकास अधिकारी आढावा घेतील; मात्र, जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.